Indian Economy : भारत २०२५ पर्यंत चौथी अर्थव्यवस्था ; जी-२० शेर्पा व निती आयोगाचे माजी सीईओ अमिताभ कांत यांचा विश्वास

जगातील सर्वांत वेगवान अर्थव्यवस्था म्हणून भारतीय अर्थव्यवस्था ओळखली जात असून, विविध आर्थिक आघाड्यांवरील उत्तम कामगिरीमुळे २०२५ पर्यंत ती जपानला मागे टाकून ती जगातील चौथी सर्वांत मोठी अर्थव्यवस्था होईल, असा अंदाज भारताचे जी-२० शेर्पा आणि निती आयोगाचे माजी सीईओ अमिताभ कांत यांनी व्यक्त केला.
Indian Economy
Indian Economysakal

नवी दिल्ली : जगातील सर्वांत वेगवान अर्थव्यवस्था म्हणून भारतीय अर्थव्यवस्था ओळखली जात असून, विविध आर्थिक आघाड्यांवरील उत्तम कामगिरीमुळे २०२५ पर्यंत ती जपानला मागे टाकून ती जगातील चौथी सर्वांत मोठी अर्थव्यवस्था होईल, असा अंदाज भारताचे जी-२० शेर्पा आणि निती आयोगाचे माजी सीईओ अमिताभ कांत यांनी व्यक्त केला.

भारतीय अर्थव्यवस्था सध्या जगातील पाचव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था असून, त्याआधी अमेरिका, चीन, जर्मनी आणि जपानचा क्रमांक लागतो. भारतीय अर्थव्यवस्थेने २०२२ मध्ये ब्रिटनला मागे टाकले आहे. अवघ्या एका दशकापूर्वी, भारतीय अर्थव्यवस्था जगातील अकराव्या क्रमांकावर होती. सध्या, भारताचा ‘जीडीपी’ अंदाजे ३.७ लाख कोटी रुपये इतका आहे, असेही कांत यांनी नमूद केले.

भारतीय अर्थव्यवस्थेने २०१३ पासून २०२४ पर्यंत जगातील पाचव्या सर्वांत मोठ्या अर्थव्यवस्थेकडे भारताची वाटचाल झाली आहे. विक्रमी जीएसटी संकलन, गेल्या तीन तिमाहीत आठ टक्क्यांहून अधिक जीडीपी वाढ, २७ विविध देशांशी भारतीय चलन रुपयामध्ये व्यापार आणि चलनवाढ नियंत्रण यामुळे ही वाटचाल यशस्वी होण्यास मदत झाली असल्याचे कांत यांनी सांगितले.

भारतासह ब्राझील, इंडोनेशिया, दक्षिण आफ्रिका आणि तुर्कीए पाच उदयोन्मुख देशांच्या अर्थव्यवस्थेबाबत २०१३ मध्ये मॉर्गन स्टॅन्लेच्या एका विश्लेषकाने ‘फ्रॅजाईल फाइव्ह’ हा शब्द वापरला होता. या देशांच्या अर्थव्यवस्थेची स्थिती तेव्हा चांगली नव्हती, याचा उल्लेख करून अमिताभ कांत यांनी पुढील काळात भारताने केलेल्या आर्थिक प्रगतीचा आढावा घेतला.

भारतीय अर्थव्यवस्थेत स्टील, सिमेंट आणि वाहन उत्पादन क्षेत्राने दुहेरी अंकी वाढ नोंदवली असून, डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधांमध्ये भारत जागतिक आघाडीवर आहे. देशातील ई-व्यवहार १३४ अब्जांपर्यंत वाढले आहेत, जे सर्व जागतिक डिजिटल पेमेंटच्या ४६ टक्के आहेत; जन धन, आधार आणि मोबाईल ट्रिनिटी अंतर्गत उघडलेल्या खात्यांमध्ये सध्याची शिल्लक २.३२ लाख कोटींहून अधिक आहे. वर्ष २०१३-१४ आणि २०२२-२३ मधील सरासरी वार्षिक चलनवाढ २००३-०४ आणि २०१३-१४ मधील ८.२ टक्क्यांवरून पाच टक्क्यांपर्यंत खाली आली असल्याकडेही कांत यांनी लक्ष वेधले.

प्रमुख अर्थव्यवस्थांमध्ये समावेश

‘जीडीपी’ वाढीचा स्थिर अंदाज, कमी होणारी महागाई, केंद्र सरकारच्या पातळीवर राजकीय स्थिरता आणि केंद्रीय बँकेचे प्रशंसनीय पतधोरण, या सर्वांनी अलीकडच्या तिमाहीत भारतीय अर्थव्यवस्थेला वेगवान प्रगती करण्यात मोठे योगदान दिले आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या ताज्या जागतिक आर्थिक अंदाजानुसार, भारत २०२४ मध्ये प्रमुख अर्थव्यवस्थांमध्ये सर्वांत वेगाने वाढणारा देश राहणार आहे. भारताच्या वाढीचा अंदाज ६.५ टक्क्यांवरून ६.८ टक्क्यांवर नेला आहे. भारताची अर्थव्यवस्था २०२२-२३ मध्ये अनुक्रमे ७.२ टक्के आणि २०२१-२२ मध्ये ८.७ टक्के वाढली, असेही अमिताभ कांत यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com