
स्वाती देशपांडे
shabdapremi@gmail.com
आपल्या गुंतवणुकीची नौका हेलकावे खाऊ लागली, तर विचलित न होता आपण कसे निर्णय घेतो, यावर बरंच काही अवलंबून असतं. शेअर बाजारात गुंतवणूकदारांचं ज्ञान, योग्य कंपनीची निवड करण्याचं कौशल्य याबरोबरच त्यांच्या मानसिकतेलाही प्रचंड महत्त्व असतं. तसंच, आपल्या प्रश्नांची उत्तरं बाजाराशी संबंधित अभ्यासपद्धतीत सापडू शकतात.
दोन मनं
एक आपलं जणू आप्त
दुसरंही आपलंच
पण काहीसं त्रयस्थ, दूरस्थ
एका कवितेच्या या ओळींमधलं ते ‘दुसरं’ मन मला स्वतःला अनेक वेळा अनुभवायला मिळालं आहे; पण शेअर बाजारात काम करत असताना मात्र, ते दूरस्थ, त्रयस्थ न राहता चांगलं अधीमधी लुडबुडायला येत राहतं. कमी-अधिक फरकाने तुम्हा मंडळींनादेखील याचा अनुभव आला असेल... आता साधं उदाहरण बघा ना.
आपण एखाद्या कंपनीचा शेअर घेतो. त्यात इच्छित नफा मिळाला, की मस्तपैकी विकून टाकावा असं आपल्या ‘पहिल्या’ मनाने ठरवलेलं असतं; पण योग्य वेळ येताच नेमकी या ‘दुसऱ्या’ची लुडबुड सुरू होते.
‘‘थांब जरा, काय घाई आहे विकायची? कालच नाही का अमुकतमुक चॅनेलवर ऐकलं होतं, की इथून अजून २० टक्के तरी वर जाईल हा शेअर म्हणून?’’ झालं!! मग काय, दोघांचं द्वंद्व सुरू! समजा शेअरचा भाव खरंच वर गेला, तर मग लगेच ‘दुसऱ्या’चं नाक वर! पण दर वेळी भाव वरच कसा जाईल? पुढच्या एखाद्या खेपेस शेअर नफ्यात विकण्याची वेळ आली, की पुन्हा या दोघांचं युद्ध चालू होतं.
एव्हाना त्या झकाझकीत तो शेअर खाली यायला लागलेला असतो. १०० रुपयाला घेतलेला तो १५० रुपयांचं दर्शन घेऊन १२० रुपयांपर्यंत घसरलेला असतो. आता ‘पहिल्या’ला वाटायला लागलेलं असतं, की ‘१२० तर १२०, काहीतरी नफा तर आहे ना!’
पण पुन्हा ‘दुसरा’ हजर. ‘कालपरवापर्यंत १५० ला होता आणि आता १२० ला विकणार? थांब जरा!’ असं करत करत शेअर आपल्या खरेदीभावाच्या खाली गेला, तर मात्र दोघांची ‘बोलती’ बंद होऊन जाते आणि आपण दिङ््मूढ होऊन ‘जे जे होईल, ते ते पाहात राहतो.’
साधारण १९९०च्या दशकात शेअर बाजारात गुंतवणूक करायला लागले, तेव्हा सुरुवातीच्या काळात मला हा अनुभव बरेचदा येत गेला अन् हळूहळू लक्षात येऊ लागलं, की जोवर आपण या ‘दुसऱ्या’ला लगाम घालत नाही, तोवर गुंतवणुकीवरच्या परताव्यात नियमितपणा येणं अवघड आहे.