अवकाश कचऱ्याचे वास्तव

dr prakash tupe
dr prakash tupe

भारताच्या ‘मिशन शक्ती’च्या यशानंतर पुन्हा एकदा अवकाश कचऱ्याचा मुद्दा उपस्थित केला जात आहे. या अवकाश कचऱ्याच्या प्रश्‍नाचा ऊहापोह...

भा रताने अंतराळात एक अनोखा प्रयोग गेल्या आठवड्यात यशस्वीरीत्या पार पाडला. ‘मिशन शक्ती’ या प्रयोगात अंतराळातील आपल्याच एका उपग्रहास क्षेपणास्त्राच्या साह्याने नष्ट केले गेले. भारताचा ‘मायक्रोसॅट’ नावाचा ७४० किलो वजनाचा उपग्रह २७४ किलमीटर उंचीवरून फिरत होता. आपल्या संरक्षण खात्याने २७ मार्च रोजी ११ वाजता उपग्रहभेदी क्षेपणास्त्राच्या साह्याने तीन मिनिटांत त्याला नष्ट केले.
‘मिशन शक्ती’मुळे समस्त भारतीयांना आनंद झाला, तरी पाकिस्तानसह जगातील अनेक देशांना भारताची ही कृती पसंत पडली नाही. याला प्रमुख कारण ठरले ते म्हणजे उपग्रहाच्या स्फोटामुळे त्याचे शेकडो लहान-मोठे तुकडे झाले व ते अंतराळात प्रचंड वेगाने पृथ्वीभोवती फिरू लागते आहेत. अशा या तुकड्यांमुळे म्हणजे ‘स्पेश डेब्रीमुळे’ भावी अंतराळ मोहिमांना व पृथ्वीभोवती फिरत असलेल्या आंतरराष्ट्रीय अवकाशस्थानकातील अवकाशयात्रींच्या जिवाला धोका पोहचू शकतो, असे काही जण म्हणत आहेत.

अमेरिकेच्या ‘नासा’ या अवकाश संस्थेच्या प्रमुखांनी भारताच्या ‘मिशन शक्ती’बाबत ‘टेरिबल टेरिबल’ म्हणून कांगावा सुरू केला. त्यांच्या मते भारताच्या उपग्रहांचे चारशेपेक्षा जास्त तुकडे निर्माण झाले. त्यातील ६० तुकडे १० सेंटीमीटरपेक्षा मोठ्या आकाराचे असल्याने ते धोकादायक आहेत. एवढेच नव्हे, तर २४ तुकडे आंतरराष्ट्रीय अवकाशस्थानकाच्या कक्षेच्या एका टोकाजवळ पोहचलेत. यामुळे स्थानकास व त्यातील अवकाशयात्रींना धोका निर्माण झाला आहे. भारताने मात्र अमेरिकेचा हा दावा खोटा असल्याचे म्हटले आहे. कारण, भारताने नष्ट केलेला उपग्रह अवघ्या ३०० किलोमीटर उंचीवर होता व अवकाशस्थानक ४०० किलोमीटर उंचीवरून फिरत आहे. तसेच, आपल्या उपग्रहाचे तुकडे पुढील काही आठवड्यांत पृथ्वीवर कोसळून नष्ट होतील. जगभरातील सर्व देश अंतराळयाने प्रक्षेपित करताना यापेक्षा जास्त कचरा अंतराळात सोडत असतात.

अंतराळयानाचे युग सुरू होऊन आता साठ-पासष्ट वर्षे लोटली आहेत. सुरवातीच्या काळात अमेरिका व रशिया यांच्यामध्ये अंतराळातील प्रभुत्वासाठी तीव्र स्पर्धा होती. कालांतराने इतर देशदेखील अंतराळयानाच्या प्रवासात उतरले. आजमितीस तीस हजारांवर मानवनिर्मित वस्तू अंतराळात सोडल्या गेल्याने तेथे प्रदूषण झाले आहे. काही उपग्रह बंद पडले आहेत. काहींच्या कक्षा ढासळल्या, काही खिळखिळे होऊन तुटून गेले आहेत. यामुळे अंतराळात ‘अवकाश कचऱ्या’चे प्रदूषण वाढत आहे. यामध्ये भर पडत आहे ती प्रक्षेपणावेळी वापरल्या गेलेल्या रॉकेट्‌सच्या भागांची, नट-बोल्ट, यानावरची आच्छादने, सौरपंख्यांचे भाग, अवकाशयात्री वापरत नसलेल्या वस्तू यांची. हा सर्व कचरा ताशी २८००० किलोमीटर वेगाने पृथ्वीभोवती फिरत आहे. अंतराळातील कमी उंचीवरचा कचरा फारसा धोकादायक नसतो. कारण, कालांतराने पृथ्वीच्या वातावरणात शिरून घर्षणाने पेटून तो नाहिसा होतो. मात्र, दहा सेंटीमीटरपेक्षा जास्त मोठ्या आकाराचे तुकडे धोकादायक ठरू शकतात. हे कण बंदुकीच्या गोळीच्या वेगापेक्षा जास्त वेगाने यानावर किंवा उपग्रहावर आपटल्यावर ते निकामी होऊ शकतात. सध्या अंतराळात पाच लाखांपेक्षा जास्त कण आहेत, की ज्यांची माहिती गोळा करण्याची गरज आहे. रडार किंवा दुर्बिणींच्या साह्याने या कचऱ्यावर लक्ष ठेवले जात आहे. अमेरिकेच्या ‘स्पेस सर्व्हिलन्स सिस्टीम’च्या माहितीनुसार बारा-तेरा कोटी छोटे कण व कचरा अंतराळात फिरत असून, त्यांचा आकार एक सेंटीमीटरपेक्षा लहान आहे. मात्र, धोकादायक असे १० सेंटीमीटरपेक्षा मोठ्या आकाराचे ३४ हजार कण असून, त्यांच्यावर लक्ष ठेवले जात आहे. तसेच निकामी अशा सहा हजार उपग्रहांवरदेखील नजर ठेवली जात आहे. अंतराळातील प्रदूषण निर्माण करणाऱ्या वस्तू त्यांच्या कक्षेतून खाली पृथ्वीकडे ढकलणे किंवा तेथेच नष्ट करून प्रदूषण कमी करण्याचा शास्त्रज्ञ विचार करीत आहेत. जपानी शास्त्रज्ञ तर कचरा गोळा करण्यासाठी आगळीवेगळी जाळी अंतराळात सोडण्याच्या प्रयत्नात आहेत.

भारताच्या आधी ‘मिशन शक्ती’पूर्वी जवळजवळ साठ वर्षांपूर्वी अमेरिकेने या प्रकारचा प्रयोग केला होता. रशियाने १९६३ मध्ये, तर चीनने २००७ मध्ये त्यांचा एक उपग्रह क्षेपणास्त्राने फोडला होता. चीनच्या उपग्रहाचे ३२००० छोटे तुकडे झाले होते, तर ३३०० मोठे तुकडे झाले होते. तसेच, चीनने भारतापेक्षा जास्त उंचीवर उपग्रह फोडला होता. त्याचवेळी निर्माण झालेल्या तुकड्यांनी गेल्या बारा वर्षांत कुठलेही नुकसान केलेले नाही. अमेरिका, रशिया व चीनने प्रत्येकी तीन-चार हजार मोठे तुकडे अंतराळात निर्माण केले आहेत. मात्र, तुलनेत भारताचे अवघे ८० तुकडे अंतराळात फिरत आहेत. ही सर्व आकडेवारी पाहता बड्या राष्ट्रांचा आपल्या ‘मिशन शक्ती’ प्रयोगाला होणारा विरोध, हा काही वेगळ्याच कारणांमुळे असावा, असे वाटते. मात्र, हेही लक्षात घ्यायला हवे, की भारताच्या या प्रयोगामुळे इतर अनेक देशांनी हाच प्रयोग केल्यास अंतराळात प्रदूषण वाढत जाईल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com