अकरावी प्रवेश प्रक्रियेत 'द्विलक्ष्यी'चे महत्त्व

FYJC_Admission
FYJC_Admission

दहावीच्या निकालानंतर बहुतांश विद्यार्थ्यांची अकरावीसाठी शाखा आणि विषयाची निवड ठरलेली असते. अकरावीला सक्तीच्या विषयांबरोबरच ऐच्छिक, पुरेशी माहिती नसलेला, पण विद्यार्थ्यांना फायद्याचा असलेला 200 गुणांचा विषय म्हणजे 'बायफोकल' (द्विलक्ष्यी अभ्यासक्रम).

'द्विलक्ष्यी' हा विज्ञान शाखा आणि काही ठराविक महाविद्यालयांत वाणिज्य शाखेसाठीही उपलब्ध आहे. प्रवेश पाहिजे असलेल्या महाविद्यालयात 'द्विलक्ष्यी'चे कुठले विषय उपलब्ध आहेत (उदा. संगणक, इलेक्‍ट्रॉनिक्‍स, इलेक्‍ट्रिकल, सिव्हिल इत्यादी.) याबद्दल चौकशी करावी. या विषयासाठी ऍडमिशन फी व्यतिरिक्तही फी भरावी लागते. 

कसा मिळतो प्रवेश? 
1) ज्या विद्यार्थ्यांनी पार्ट-1 मध्ये "द्विलक्ष्यी' विषयासाठी Yes (हो) असा पर्याय दिला आहे, विज्ञान शाखेत प्रवेश घ्यायचा आहे, पण जीवशास्त्र विषय नको आहे. त्यांना "द्विलक्ष्यी' विषयाला आपल्या पसंतीच्या महाविद्यालयात आरक्षण आणि गुणवत्तेनुसार प्रवेश घेता येतो. येत्या 27, 28 जून रोजी शून्य फेरीत हे प्रवेश दिले जाणार आहेत. शून्य फेरीमध्ये प्रवेश घेतला की विज्ञान आणि "द्विलक्ष्यी'चा प्रवेश निश्‍चित होतो आणि विद्यार्थी केंद्रीय प्रवेश निश्‍चित होऊन प्रक्रियेतून बाहेर पडतो.

2) अनेक विद्यार्थ्यांनी पार्ट-1 फॉर्म भरताना "द्विलक्ष्यी' हा पर्याय दिलेला नसतो. मात्र "द्विलक्ष्यी'ला प्रवेश घ्यायचा असल्यास पार्ट-2 मध्ये (बायफोकल कॉलेज -30) हा पर्याय द्यावा. विज्ञान शाखेत ज्या महाविद्यालयात प्रवेश घ्यायचा आहे, त्या महाविद्यालयात "द्विलक्ष्यी'च्या उपलब्ध जागांवर आरक्षण आणि गुणवत्तेनुसार प्रवेश घेता येतो.
3) इन हाउस, तसेच व्यवस्थापन कोट्यातून "द्विलक्ष्यी'ला प्रवेश घेता येतो. 

'द्विलक्ष्यी' कशासाठी? 
1) 'द्विलक्ष्यी'चे विषय उदा. संगणक, इलेक्‍ट्रॉनिक्‍स, इलेक्‍ट्रिकल, सिव्हिल इत्यादी, यापैकी एका विषयाला प्रवेश घेता येतो. हा विषय पुढे इंजिनिअरिंगला घेणाऱ्या विषयाचा किंवा BCA, B.Sc (कॉम्प्युटर, इलेक्‍ट्रॉनिक्‍स)ला प्रवेश घेताना मजबूत पाया ठरतो.
2) "द्विलक्ष्यी' विषय 200 गुणांचा आहे. शंभर गुणांचे प्रात्यक्षिक+100 गुणांची लेखी परीक्षा आहे. विषय 200 गुणांचा असल्यामुळे विद्यार्थ्यांचा एका विषयाचा अभ्यास कमी होतो. हा विषय घेतला तर अकरावी, बारावीला इंग्रजी, पदार्थविज्ञान, रसायनशास्त्र, गणित, द्विलक्ष्यी विषय (English+PCM+Computer science or electronics etc) व्यतिरिक्त पाच विषयांचा अभ्यास करावा लागतो. दरवर्षी 200 पैकी 200 गुण मिळवणारे बरेच विद्यार्थी असतात.
3) महत्त्वाचे म्हणजे, बारावीचा बदलत्या अभ्यासक्रम आणि पेपर पॅटर्नमुळे खूप मुलांना रसायनशास्त्र विषयात 50 पेक्षा कमी गुण मिळतात. त्यामुळे "सीईटी'मध्ये चांगले गुण असूनसुद्धा त्यांना इंजिनिअरिंगला प्रवेश घेता येत नाही. मात्र "द्विलक्ष्यी' विषय असेल, तर रसायनशास्त्राऐवजी "द्विलक्ष्यी'चे गुण गृहीत धरले जातात आणि इंजिनिअरिंग प्रवेशासाठी मार्ग खुला होतो. दरवर्षी अनेक विद्यार्थी या पद्धतीने प्रवेश घेतात. हा नियम फक्त इंजिनिअरिंग प्रवेशासाठी लागू होतो.
4) "द्विलक्ष्यी' विषयात शंभर गुणांचे प्रात्यक्षिक असल्याने एकूण टक्केवारी चांगली वाढते.
5) "द्विलक्ष्यी' विषय जास्त प्रमाणात प्रात्यक्षिकांवर आधारित असल्याने, विषयाची सर्व तयारी महाविद्यालयातच होते. या विषयाचा अतिरिक्त क्‍लासची आवश्‍यकता भासत नाही.
6) जे विद्यार्थी जेईई/आयआयटीचा अभ्यास करतात, त्यांना एका विषयाचा अभ्यास करायचा ताण कमी होतो.
7) तसेच ज्या विद्यार्थ्यांचा दहावीपर्यंत टेक्‍निकल हा विषय असतो, त्यांच्यासाठी "द्विलक्ष्यी' प्रवेशात काही प्रमाणात आरक्षण आहे. 

अकरावी आणि बारावी अभ्यासक्रमात अधिक गुण मिळवण्याची संधी 'द्विलक्ष्यी' विषयामुळे मिळते. बारावीनंतरच्या अभ्यासक्रमाची पूर्वतयारी होते. पीसीएम ग्रुप ठेवण्याची इच्छा असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही मोठी सुवर्णसंधी आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com