जीवनातील बदलांचं अंतरंग

जीवनातील बदलांचं अंतरंग

स्वातंत्र्याच्या उंबरठ्यावर जन्मलेली,  बैलजोडीच्या साह्याने विहिरीतील  पाणी उपसून शेत भिजलेलं पाहणारी, पाटी-पेन्सिल खडू-फळा हे विश्व असलेली, कल्पनेवर आधारित ‘चंद्रावर स्वारी’ ही कादंबरी संपूर्ण वाचलेली आणि पृथ्वी गोल आहे हे सिद्ध करणारी कारणं पाठ केलेली - आमची पिढी. त्यानंतर दशकभरातच मानवाचं चंद्रावर पडलेलं पाऊल पाहून ‘प्रत्यक्षाहुनि प्रतिमा उत्कट’ या न्यायानं कल्पना प्रत्यक्षात अवतरलेली आणि अंतराळातून मिळालेल्या छायाचित्रांतून पृथ्वी गोल आहे, याचा निर्णायक पुरावा हाती लागल्याची अनुभूती घेणारीही आमचीच पिढी! ‘हिंदी-चिनी भाईभाई’ म्हणत चीननं केलेलं आक्रमण आणि त्यानंतर दशकभरातच स्वयंपूर्ण होत जगाच्या नकाशावर बांगला देश निर्मितीची गौरवास्पद कामगिरीही आम्हीच अनुभवली. आज क्षेपणास्त्र सज्ज होत, चंद्राचाच काय मंगळाचाही वेध घेणारी यानं, उपग्रहांची यशस्वी उड्डाणं आम्ही  अनुभवत आहोत.

ऐंशी-नव्वदीच्या दशकात संगणकयुग आणि त्यामागोमाग उदात्तीकरण- खासगीकरण-जागतिकीकरणाची लाट, त्यातून सामाजिक-शैक्षणिक-औद्योगिक- सर्वच क्षेत्रांत निर्माण झालेली नवीन अर्थव्यवस्था आणि त्यातही देशानं घेतलेली झेप पाहणारे भाग्यवान आम्हीच. याच काळात हळुहळू इंटरनेट, मोबाईल, ई-मेलमुळे ‘द डेथ ऑफ डिस्टन्स’ - अंतर ही संकल्पना आकुंचित होत गेली. बटणं दाबली की हजारो मैलांवरील व्यक्तीशी समोरासमोर संवाद करण्याचीही किमया साधली गेली. हे सारं कमी म्हणून की काय ग्रंथालय, थिएटर...सारं जगच हातातल्या मोबाईलमध्ये समाविष्ट झालं. प्रत्येक क्षेत्रातील बाजारपेठांच्या स्पर्धांमुळे जाहिरात युग अवतरलं आणि त्यातून वस्तू आकर्षित करण्याच्या नादात कल्पकतेचा आणि कलात्मकतेचा संगम होत गेला. टाचणी, वेष्टणं असोत वा यंत्रे, इमारती, सर्वांमध्ये सुलभता आली आणि सौंदर्यदृष्टी बहरत गेल्याचेही साक्षीदार आम्हीच!

‘चेन्ज इज द ओन्ली कॉन्स्टंट’ - आयुष्यात फक्त बदल हीच संकल्पना शाश्वत आहे, असं म्हटलं जातं. मानवाच्या अस्तित्वापासून- भटक्‍या स्थिरावल्यापासून बदल घडत आहेत. तेव्हापासून प्रत्येक पिढी बदलाच्या कॅनव्हासवर आपलं अस्तित्व राखून रंग भरत आली आहे. काळाच्या ओघात धरतीच्या पोटात दडलेल्या संस्कृती असोत, प्राचीन गडकिल्ले, काताळावरील शिल्पे किंवा अजंठा- वेरूळसारख्या निर्मिती, हे सारं त्याचंच प्रतीक. बदलांचे रंग, रूप, गंध प्रत्येकाला- अभ्यासक, व्यावसायिक, लेखक, रंगकर्मी, समाजशास्त्रज्ञ - साऱ्यांनाच आपापल्या भावविश्वाप्रमाणे भावले आणि रेखाटले गेले, अनादीकाळापासून.

हे खरं असलं तरी आज चिंता आहे बदलांच्या गतीची. गेल्या शतकात बदल घडत गेले संथगतीनं, पण आता त्यांचं वादळ घोंगावत आहे. आजपर्यंत बदल मानवनिर्मित यंत्रांद्वारे होत गेले. आता त्याची जागा यंत्रमानव घेऊ पाहात आहे. त्यातून कौशल्याची अन्‌ सक्षमतेची परिभाषा आणि परिमाणं बदलत आहेत. भविष्यात प्रत्येक क्षेत्रांना ते कसं व्यापतील याचा अंदाज बांधणंही कठीण झालं आहे. असे बदल मनात चिंता निर्माण करणारच! पण कशाला करायची चिंता? बदलांना सामोरे जाण्यासाठी काळाला अभिप्रेत असे नावीन्यपूर्ण अभ्यासक्रम साकारणार आणि त्यातून सक्षम मनुष्यबळाची गरज भागत जाणार. आपली नातवंडं संगणक, मोबाईलचा वापर कसा करतात ते पाहा. नवीन पिढीही उलगडत जाणाऱ्या कॅनव्हासवर रंग भरण्यास सिद्ध असल्याचंच हे लक्षण. असे हे बदलांचे अंतरंग. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com