पहाटपावलं : उमलत्या कळ्या

Raja-Akash
Raja-Akash

मधुरा आठवीची विद्यार्थिनी. दिसायला देखणी. बाल्यावस्थेतला हूडपणा पुरता गेलेला नाही. तिच्या आईच्या मोबाईलवर अवेळी मिस्ड कॉल येऊ लागले. घरच्यांचा तिच्यावरच आरोप- ‘तूच काहीतरी केलं असशील, तूच कुणाला नंबर दिला असशील म्हणूनच तो फोन करतोय. सांग कोण आहे तो?’ मधुराचा खरेतर कशाशीच संबंध नाही. हे मिस्ड कॉल कोण करतं, का करतं, यातलं तिला खरंच काही कळत नाही. प्रेमात पडणं, फ्लर्टिंग यातलंही काही कळत नाही. पण या फोनमुळे मधुरावरची बंधनं वाढू लागली. तिच्या प्रत्येक हालचालीकडे सर्व जण संशयाने बघू लागले. तिच्या फिरण्यावर बंधनं आली. प्रेमानं वागणारी, लाड करणारी आई तिच्याशी अचानक शत्रूसारखी वागू लागली. मधुरा गोंधळून गेली, अंतर्मुख झाली. आपल्याशी कुणी चांगलं वागत नाही, घरच्यांना आपण नकोसे झालो आहोत, असं तिला वाटू लागलं.

याचा परिणाम तिच्या अभ्यासावर झाला आणि हुशार मधुरा दोन विषयांत नापास झाली. मुलं वयात आल्यानंतर पालकांचं वागणं बदलतं. एकीकडे मुलांमध्ये शारीरिक, मानसिक, भावनिक बदल होतात. त्या बदलांशी कसं जुळवून घ्यायचं याची जाण त्यांना अजून आलेली नसते. हे उमलणं आनंदानं स्वीकारण्याऐवजी पालक गोंधळून जातात, मौन पाळतात. स्पष्टपणे समजावून सांगण्याऐवजी गोपनीयता पाळतात. यातून मुलांची जिज्ञासा वाढते. ज्या प्रश्‍नांची उत्तरं घरातून मिळत नाहीत, ती आपल्या मित्र-मैत्रिणींकडून मिळवू लागतात. ज्यात चुकीच्या गोष्टीच जास्त असण्याची शक्‍यता असते.

एकीकडे ही मुलं पालकांपासून दुरावण्याची शक्‍यता असते, त्याच वेळी बाहेरचं कुणीतरी प्रेमानं वागत सहानुभूती दाखवतं, काळजी घेऊ लागतं आणि ही मुलं त्या व्यक्‍तीमध्ये गुंततात. यातून मुलं, विशेषत: मुली जास्तच भरकटत जातात आणि ही गंभीर समस्या होते. काळजीपोटी या विषयावर पालकांना मोकळेपणी कुणाशी बोलताही येत नाही. कारण कुटुंबाची बदनामी होईल ही भीती असते आणि यातून मार्गही काढता येत नाही. पालक व मुलांचा जो संवाद आज चालतो तो केवळ अभ्यासाबाबत असतो. इतर विषयांवर पालकांना मुलांशी बोलण्याची गरज वाटत नाही. मुलांच्या आवडीनिवडी, खेळ, शाळेतल्या गमतीजमती, त्यांचे आवडते टीव्हीचे कार्यक्रम, आवडते खेळाडू, नट-नट्या, वर्तमानपत्रातील त्या वयाच्या मुलामुलींशी संबंधित चांगल्या-वाईट बातम्या  यासारख्या विषयावर कुटुंबात संवाद झाला, तर कुमारवयातील बदलांविषयी पालक मुलांमध्ये जाण वाढवू शकतात. कुमारवयातील मुलांबद्दल चुकीच्या गोष्टी बाहेरून कळतात, तेव्हा त्यांना रागावू नये. उलट त्यांना विश्‍वासात घेऊन सामोपचाराने चर्चा करून मार्ग काढावा. अशा गोष्टींमध्ये बऱ्याचदा त्यांचा दोष नसतोदेखील, पण पालक दोषी ठरवतात, तेव्हा मात्र केवळ पालकांना धडा शिकवण्यासाठी म्हणून मुलं त्या गोष्टी मुद्दाम करू लागतात व त्यात गुंतत जातात, भरकटत जातात. हे टाळायचं असेल तर आपल्यावरील जबाबदारी जास्त आहे, याचं भान पालकांनी ठेवायला हवं.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com