पहाटपावलं : जागर मानसिक स्वास्थ्याचा

Raja-Akash
Raja-Akash

‘पहाटपावलं’मध्ये माझी लेखमाला सुरू होऊन एक वर्ष झालं. वाचकांकडून मिळणाऱ्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे माझा लिहिण्याचा उत्साह वाढला. अनेक लोक भेटतात, फोनवर बोलतात, मेसेज करतात, ‘लेख वाचून आमच्या व्यक्‍तिमत्त्वात खूप फरक पडला,’ असं सांगतात. अनेक जण विश्‍वासानं स्वत:च्या समस्या मांडतात. त्यांच्या समस्यांची उत्तरं अप्रत्यक्षपणे विविध लेखांमधून मांडलेली आहेत. या लेखांमधून काही मुद्दे विस्ताराने लिहिले; पण काही विषयांबाबत केवळ प्राथमिक स्वरूपाची माहिती लिहिली, ज्यांनी त्या गोष्टी उपयोगात आणल्या, त्यांना फायदा झाला. काही मुद्दे विस्ताराने मांडले नाहीत, त्यामागे विशिष्ट हेतू होता. सुरुवातीला या विषयाची ओळख करून देणं, हा हेतू या लेखांतून बऱ्याच प्रमाणात सफल झाला. खरं पाहिलं, तर मानसशात्र हा अत्यंत महत्त्वाचा विषय. कुठलंच क्षेत्र आज असं नाही, की ज्याचा मानसशास्त्र विषयाची संबंध नाही. असं असतानाही हा विषय विद्यापीठाच्या व शालेय अभ्यासक्रमांमधून दुर्लक्षित का राहतो, हा गंभीर प्रश्‍न आहे. 

आपण आपल्या शारीरिक स्वास्थ्याबाबत इतके जागरुक असतो की लहानशी इजा झाली तरी पटकन डॉक्‍टरांना भेटतो, औषधे घेतो, विश्रांती घेतो; पण मानसिक स्वास्थ्याबाबत आपण इतके जागरूक आहोत काय? प्रत्येक व्यक्‍तीच्या आयुष्यात अनेकदा असे प्रसंग येतात, की त्यामुळे ती व्यक्ती अस्वस्थ होते, मनावर प्रचंड ताण येतो. आयुष्यात महत्त्वाच्या प्रसंगी नेमका निर्णय घेता येत नाही. कुणाशी तरी बोलावं, मन हलकं करावं असं वाटतं. सतत अपयश येतं. नातेसंबंधांमघ्ये तणाव येतात, भविष्यात आपलं कसं होईल याची चिंता वाटते, भूतकाळातील चुकांची खंत वाटते. नैराश्‍य येतं, आत्महत्या करावीशी वाटते. अचानक एखाद्या क्षणी आयुष्य उद्‌ध्वस्त झालंय असं वाटतं. अशा असंख्य समस्या प्रत्येकाच्या जीवनात कधी ना कधी येतात. अशा वेळी त्याला हवा असतो दिलासा, विश्‍वास, आधार, मदतीचा हात, त्याला समजून घेणारं कुणी तरी. पण असं त्याच्या आजूबाजूला कुणीच नसतं. तो घरच्यांशी संवाद साधू शकत नाही, मित्रांना सांगू शकत नाही, कुणाला सांगितलं तर त्या व्यक्‍तीला टाळलं जातं, त्याची चेष्टा केली जाते. तो नाटक करतोय असं म्हटलं जातं. मनाला अस्वस्थ करणाऱ्या समस्यांची उत्तरं असतात मानसशास्त्रात. या विषयाचा जाणकार प्रत्येक गावागावांत निर्माण झाला, तर त्या गावाचं मानसिक स्वास्थ्य निकोप राहायला मदत होईल. मानसशास्त्र फक्‍त मानसिक समस्या सोडवण्यासच मदत करतं, असं मुळीच नाही. आयुष्यात प्रगती करण्याकरिता, व्यक्तिमत्त्वामधील सामर्थ्य वाढविण्यासाठीही हा विषय मदत करू शकतो. या विषयाची ही विधायक बाजू मांडण्याचा प्रयत्न या लेखांमधून मी केला आणि तो निश्‍चितच यशस्वी झाला, असं मी म्हणू शकतो.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com