तमाशा परंपरेतील ‘हिरा’

महाराष्ट्राची पारंपरिक लावणी कला गावागावांतील कानाकोपऱ्यांत कशी वास करते आहे, हे हिराबाई कांबळे यांच्यामुळे पुन्हा प्रकाशात आले. सध्याचा बदललेला लावणीचा बाज, दिवसेंदिवस येणारी आधुनिकता, शिवाय चित्रपटांतील नवे सादरीकरण यामुळे मूळ लावणीचे प्रकार अस्तंगत झाल्यात जमा आहेत, पण हिराबाईंच्या रूपाने हा पारंपरिक लावणी प्रकार अजूनही जिवंत आहे.
sampadkiy
sampadkiysakal

नाममुद्रा

जयवंत चव्हाण

महाराष्ट्राची पारंपरिक लावणी कला गावागावांतील कानाकोपऱ्यांत कशी वास करते आहे, हे हिराबाई कांबळे यांच्यामुळे पुन्हा प्रकाशात आले. सध्याचा बदललेला लावणीचा बाज, दिवसेंदिवस येणारी आधुनिकता, शिवाय चित्रपटांतील नवे सादरीकरण यामुळे मूळ लावणीचे प्रकार अस्तंगत झाल्यात जमा आहेत, पण हिराबाईंच्या रूपाने हा पारंपरिक लावणी प्रकार अजूनही जिवंत आहे. हिराबाई पारंपरिक गवळणी आणि वगनाट्यामध्ये टाक्या (म्हणणी), छक्कड स्वतःच्या पहाडी आवाजात गात असत. तमाशा कला जिवंत राहावी यासाठी त्या आजही प्रयत्नशील आहेत.

सध्या त्या ९३ वर्षांच्या आहेत आणि मुलांना तमाशाबाबत मार्गदर्शन करीत असतात. आयुष्याच्या संध्याकाळी त्यांना महाराष्ट्र शासनाचा विठाबाई नारायणगावकर जीवनगौरव पुरस्कार मिळाला असला, तरी यानिमित्ताने त्यांच्या कलेची नोंद घेतल्याचा आनंद त्यांना आहे. हिराबाई मूळच्या सांगली जिल्ह्यातील तासगावच्या. १९६० पासून म्हणजे गेली चाळीस वर्षे पारावरच्या तमाशा फडात स्वतःच्या पारंपरिक गायकीने आणि अभिनयाने त्यांनी तमाशा कला जोपासली.

पारंपरिक तमाशाचे आद्य प्रसारक, विनोदसम्राट जयवंतराव सावळजकर यांच्यासह तमाशासम्राट शामराव पाचेगावकर यांनी १९६० मध्ये तमाशा फड सुरू केला. हे दोघेही कलावंत आपापल्या कलेत निपुण होते. त्यामुळे तमाशासृष्टी तब्बल ३२ वर्षे या फडाने जणू गाजवली. या तमाशाची पारंपरिक टाक्या आणि गायकीची बाजू हिराबाईंनी सांभाळली होती. हिराबाई गायनाबरोबरच अभिनयातही पारंगत होत्या. १९६० ते १९९२ या काळात हिराबाईंनी पारंपरिक गायिका, नृत्यांगना आणि अनेक वगनाट्यांतील प्रमुख भूमिका साकारल्या. राजा हरिश्चंद्र, चंद्रकेतू मुबारक, चंद्रमोहन, लाला पठाण, पाथर्डीचे राजे, कहाणी सत्यवतीची, पुनर्जन्माची महती, जिवंत मुलगी अशा अनेक वगनाट्यांत त्यांच्या प्रमुख भूमिका होत्या आणि तत्कालीन काळात त्या गाजल्याही.

नायिकेची भूमिका साकारताना वगांच्या टाक्या त्या स्वतःच्या पहाडी आवाजात सादर करीत असत. १९९२ मध्ये त्यांचे पती श्यामराव पाचेगावकर यांचे निधन झाले. या घटनेचा त्यांचे सहकारी जयवंतरावांना मोठा धक्का बसला. चाळीस वर्षांचा जोडीदार निघून गेल्यामुळे ते तमाशातूनच बाहेर पडले; मात्र यामुळे हा नामांकित तमाशा फड बंद पडला हे हिराबाईंच्या जिव्हारी लागले.

त्या काळात हिराबाईंवर पाच मुलांचे संगोपन करण्याचीही जबाबदारी होती; पण पारंपरिक कला संपतेय हे त्यांना पाहवेना. कला जिवंत राहिली पाहिजे या निश्चयाने त्यांनी आपला मोठा मुलगा बबन आणि मुलगी लता यांना पारंपरिक गवळणी, छक्कड, सवाल-जबाब, शिलकार पोवाडे आणि म्हणणीपूर्ण वगनाट्याचे धडे द्यायला सुरुवात केली. वडील श्यामराव यांच्यासारखाच पहाडी आवाज लाभलेला बबन उत्तम सरदारकी आणि गायकी करू लागला. त्याला लता साथसंगत करू लागली.

प्राथमिक शाळेत असणारी लंका आणि जयासिंग ही मुलेही तमाशा कलेकडे आकर्षित झाली. दुसऱ्या फडात नोकरी करण्यापेक्षा स्वतःचा पारावरचा तमाशा फड निर्माण करण्याचा निर्णय हिराबाईंनी घेतला; परंतु अल्पावधीतच मोठा मुलगा बबन याचे आकस्मिक निधन झाले. मुलाच्या निधनाने खचून न जाता हिराबाईंनी जयसिंगला सरदारकी करण्याचा सल्ला दिला. हिराबाईंनी स्वतः आत्मसात केलेली पारंपरिक तमाशा कला आणि गायकी जयसिंग, लता आणि लंकाला शिकवली.

गेल्या तीस वर्षांपासून त्यांचा तमाशा फड पश्चिम महाराष्ट्रात पारंपरिक तमाशा फड म्हणून कार्यक्रम करतो आहे. त्यासाठी हिराबाई मुलांच्या पाठीमागे खंबीरपणे उभ्या आहेत. आजही त्या मुलांना पारंपरिक दुर्मिळ गवळणी, छक्कड, सवाल-जवाब, म्हणणीपूर्ण रजवाडी वगाचे धडे देत असतात. त्यांच्या तमाशा फडास राज्यात अनेक ठिकाणी कला सादर करण्याचा बहुमान मिळतो. हिराबाईंच्या पहाडी आवाजाने निर्माण झालेली तमाशाची ही परंपरा आजही जिवंत राहिली आहे...

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com