शब्देविण संवादु...

आजूबाजूला नजर टाकून उत्तर द्यायचे झाल्यास संख्यात्मकदृष्ट्या अधिक लोक हे सारे मिळवण्यासाठीच धावतात हेच सत्य आहे.
human strives throughout his life to achieve something in life
human strives throughout his life to achieve something in lifeSakal

- डॉ. शेफाली भुजबळ

जीवनात काहीतरी मिळवावे, या हेतूने माणूस आयुष्यभर प्रयत्नशील राहतो. वयाच्या विशिष्ट टप्प्यांवर चालण्याऐवजी तो धावतोदेखील. या धावण्यातून त्याच्या हाताला काय लागते? पैसा-पत-प्रसिद्धी असे सारे एका बाजूला मिळते; पण फक्त हे मिळवण्यासाठीच त्याची ही धावाधाव सुरू असते का?

आजूबाजूला नजर टाकून उत्तर द्यायचे झाल्यास संख्यात्मकदृष्ट्या अधिक लोक हे सारे मिळवण्यासाठीच धावतात हेच सत्य आहे. धावताना धाप लागते, ऊर धपापतो; तरीही धावणे संपत नाही. एक दिवशी बोलावणे आले की मग सगळे काही संपते.

धावपळ करून त्याने जे काही मिळवलेले असते त्यातले कणभरदेखील त्याच्या वाट्याला येत नाही. याचा अर्थ केव्हातरी एकदा समजून घेतला पाहिजे. या सगळ्यापलीकडे कुठलीतरी अज्ञात शक्ती आहे, जी आपल्याला नुसती जाणवली तरीदेखील आपलं आयुष्य ऊर्जेने उजळून निघतं. तीच ऊर्जा इतरांनाही प्रेरक ठरते.

अनेक लोक त्या ऊर्जेच्या दिशेने जातात. त्यालाच ‘स्पिरीच्युॲलिटी’ म्हणजे ‘अध्यात्म’ असा शब्द वापरला जातो. त्यामध्ये संवाद ही प्रक्रिया फार महत्त्वाची असते. या मार्गावर सुरुवातीला जो संवाद होतो तो बाह्य जगताशी संबंधित असतो.

त्यालाच आपण ‘अनुभवणे’ असे म्हणतो आणि तेथून पुढे मग जो संवाद सुरू होतो तो स्वतःशी असतो. बाहेरून मौन आणि आत संवाद अशी ही दोन पातळ्यांवरील क्रिया असते. काही व्यक्तींसाठी ‘त्यांना सिद्धी प्राप्त आहे बरं का!’ असे वाक्य समाजात उच्चारले जाते.

त्यातला ‘सिद्धी’ हा शब्द त्या शक्तीशी संबंधित आहे; याचा अर्थ आपल्याला शोधायचा झाला तर, मीपण ज्यांचे पक्‍व फळापरी, सहजपणाने गळले हो, जीवन त्यांना कळले हो... या कवी बा. भ. बोरकर यांच्या या काव्यपंक्तीनुसार जगणारी जी माणसं असतात त्यांच्यात आपल्याला या अर्थाचे दर्शन घडते.

म्हणजे ते इतरवेळी कमी बोलतात. कधी कधी तर बोलतच नाहीत; पण अंतरीच्या गुढगर्भी त्यांचा संवाद सुरू असतो. तोच त्यांना ज्ञानाच्या पातळीवर घेऊन जातो. नुकताच दहावी-बारावी परीक्षांचा निकाल लागला. त्यामध्ये लाखो विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

आता हे लाखो विद्यार्थी ज्ञानाशी संबंधित आहेत असे आपण म्हणू शकतो का?- तर ती मुले शिक्षणक्षेत्राशी संबंधित आहेत. जेथे रूढार्थाने शिक्षण संपते; तेथून पुढे ज्ञानक्रिया सुरू होते. भरतनाट्यम् शिकताना मला नेहमी वाटायचे, आपण विशारद कधी होणार?

हा प्रश्न मी एकदा माझ्या गुरूंना विचारला. त्यावेळी त्या म्हणाल्या, ‘‘दरवर्षी एकापाठोपाठ एक परीक्षा दिल्यास की तू विशारद होशील; पण विशारद होणे म्हणजे त्या शास्त्राला आत्मसात करणे. कुठल्याही संगीत शिक्षणाचा विषय हा खऱ्या अर्थाने विशारद नंतरच सुरू होतो.’’ तेच सूत्र घेऊन मी आजच्या शिक्षणाचा विचार करते. तेव्हा खूप प्रश्न पडतात.

त्या प्रश्र्नांच्याही वाटा-पळवाटा दिसू लागतात. अनेक लोक त्यावरूनच पळताना पाहिले की, मन खिन्न होते. वाटते, कुणीतरी यांना खऱ्या ज्ञानाचा अर्थ उलगडून सांगायला हवा. हा मार्ग म्हणजेच साधक-साधना-साध्य हा आहे. या मार्गावरून जाताना कोणत्याही व्यक्तीला सुरुवातीचे काही दिवस फार सोपे वाटतात.

जरा प्रवास करून गेल्यावर कळते की, साध्याच्या जवळ जाण्याकरिता जगणे अधिक अणकुचीदार करावे लागते आणि इथूनच अनेक लोक मागे परतताना दिसतात. साधक आणि साध्य या दरम्यानचा मार्ग हा मोठा जटिल आहे.

तेथे पावलापावलावर परीक्षा आहे. विद्यार्थ्यांशी बोलताना मी कायम हेच समजून सांगण्याचा प्रयत्न करते. मी चित्र, नृत्य या कलेच्या प्रांतात वावरते म्हणजे काय करते? याचा शोध सतत घेत राहिल्याने साध्य दिसते.

मार्गही कळतो; पण तिकडे पाऊल वळतेच असे नाही. ते वळवायचे असेल, तर आधी बाह्य संवाद थांबला, थांबवला की मग अंतर्संवाद घडलाच पाहिजे. तेथूनच खऱ्या जीवनाला प्रारंभ होतो. यातून संवादाचे महत्त्व किती मोठे आहे, हे लक्षात येईल. संत ज्ञानेश्वर म्हणतात त्याप्रमाणे, ‘शब्देविण संवादु, दुजेविण अनुवादु...’ साधला पाहिजे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com