

म राठीची नाळ ‘महाराष्ट्री प्राकृत’शी जुळलेली आहे, हे कवी वसंत बापट यांनी ओळखले होते. त्यांनी ‘केवळ माझा सह्यकडा’ या कवितेत म्हटले आहे :
‘ माझ्यासाठी राहील गाठी,
मरहट्ट्याचा हट्ट खरा’
यात हाल नामक सातवाहन राजाच्या काळात मराठी भाषेचा ‘मरहट्ठ देसी भाषा’ असा झालेला उल्लेख मार्मिकपणे नोंदवला आहे . यात मराठीच्या जनुकात आढळणारा संवेदनस्वभाव जणू टिपला आहे . हट्ट म्हणजे बौद्धिक खुमखुमी, वैचारिक पिळदारपणा होय.
उद्योतनसूरीच्या ‘कुवलयमाला’ या आठव्या शतकातील ग्रंथातही ‘कलहसीले, दिण्णले गहिल्ले उल्लविरे तत्थ मरहट्टे’ असा उल्लेख आहे. या ‘दिले-घेतले’ असे रोखठोक म्हणणाऱ्या वृत्तीचा वसा पुढे मराठीच्या वादपरंपरेत अधिक तेजस्वीपणे उजळून निघालेला दिसतो. आपल्या शाहिरी काव्यातही सवाल-जबाब हा प्रकार लोकप्रिय आहे. त्याहीआधी आपल्याकडील संतवाङ्मयातही या वृत्तीचे कवडसे उमटले आहेत. वारकरी संप्रदायाचे संत कवी चोखामेळा यांनी आध्यात्मिक पातळीवरून समाजाला विचारलेला प्रश्न आहे : ‘ विटाळापरते आहे कोण?’ तसेच संत एकनाथ यांनी तत्कालीन व्यवस्थेला विचारलेला प्रश्न आहे : ‘ संस्कृत वाणी देवें केली, प्राकृत काय चोरापासोनि झाली? '' हे प्रश्न धारदार आहेत. संत तुकाराम यांनी तर ‘आपुलाचि वाद आपणासि’ असे म्हणत वाद तत्त्वचिंतनाच्या पातळीवर नेला आहे.