हवामान बदल वनवणव्यांना पोषक!

वातावरणातील कार्बन शोषून घेणाऱ्या जंगलांना वनवणव्यांनी ग्रासले आहे. या वनवणव्यांमधून मोठ्या प्रमाणावर कार्बनचे उत्सर्जन होत आहे.
Forest Fire
Forest FireSakal
Summary

वातावरणातील कार्बन शोषून घेणाऱ्या जंगलांना वनवणव्यांनी ग्रासले आहे. या वनवणव्यांमधून मोठ्या प्रमाणावर कार्बनचे उत्सर्जन होत आहे.

- किशोर रिठे

वातावरणातील कार्बन शोषून घेणाऱ्या जंगलांना वनवणव्यांनी ग्रासले आहे. या वनवणव्यांमधून मोठ्या प्रमाणावर कार्बनचे उत्सर्जन होत आहे. हवामान बदलामुळे या वनवणव्यांना पोषक परिस्थिती निर्माण झाली, ही चिंताजनक बाब आहे.

वातावरणामध्ये हरितवायूंच्या प्रमाणात वाढ झाल्याने पृथ्वीचे तापमान वाढले आहे. बर्फाच्छादित प्रदेशांमधील बर्फ वितळून समुद्राची पाण्याची पातळी वाढल्याने समुद्रकिनारी असलेली अनेक शहरे, देश व बेटे अक्षरशः जीव मुठीत घेऊन जगत आहेत. अनेक नवनवीन वादळे जन्मास येऊन समुद्रकिनारी राहणाऱ्यांचे जनजीवन उद्‌ध्वस्त करीत आहेत. उष्ण वाऱ्यांनीही काही पाश्चिमात्य देशांना त्रस्त करून सोडले आहे. हे इतरत्र होत आहे व आपण या संकटांपासून दूर आहे, असे समजण्याचे कारण नाही. या जागतिक समस्येचे मूळ म्हणजे वातावरणातील हरितवायूंच्या प्रमाणात झालेली प्रचंड वाढ व त्यातही एकट्या कार्बनचे वाढलेले प्रमाण हे आहे. वाढलेले हे कार्बनचे प्रमाण ३५० पी.पी.एम.वर आणण्यासाठी वातावरणामध्ये कार्बनचे (हरित वायूंचे) उत्सर्जन करणाऱ्या गोष्टींवर नियंत्रण व वातावरणातील कार्बनला शोषून घेणारे वृक्षाच्छादन वाढविणे या दोन्ही गोष्टी साध्य करणे आवश्यक आहे.

भारतामध्ये ऊर्जाक्षेत्र हे प्रामुख्याने ७१ टक्के कार्बन उत्सर्जन करते. त्याखालोखाल कृषिक्षेत्र १८ टक्के, उद्योग ८ टक्के आणि टाकावू कचऱ्यामाधून ३ टक्के कार्बन उत्सर्जन होते. पेट्रोल, डिझेलसारख्या तेलांच्या वापरातून मोठ्या प्रमाणात कार्बन उत्सर्जित होतो. त्यात आपण ७८ टक्के कच्चे खनिज तेल आयात करतो. कोळसा जाळून वीजनिर्मिती केल्यामुळेसुद्धा सर्वाधिक कार्बन उत्सर्जन होते. त्यासाठी अक्षय ऊर्जा हा पर्याय अवलंबिला जातो. दुसरीकडे वनांच्या कटाईमुळे १७ टक्के प्रत्यक्ष कार्बन उत्सर्जन होते. फॉरेस्ट सर्व्हे ऑफ इंडियाचे वनाच्छादनाबाबतचे अहवाल पाहता महाराष्ट्रात तसेच देशात प्रत्यक्षात असलेल्या वनांचा ऱ्हासच दिसून आला आहे. अशा परिस्थितीत वातावरणातील कार्बन शोषून घेणाऱ्या जंगलांचे संरक्षण करणे तसेच ती वाढवणे यावरही भर दिला जातोय; परंतु ही पावले टाकली जात असतानाच या जंगलांना वरचेवर लागणारे वणवे, ही मोठी समस्या बनत आहे. त्या पार्श्वभूमीवर देशातील व विशेषतः मध्य भारतातील गेल्या पाच वर्षांतील वनवणव्यांचे प्रमाण हे महाराष्ट्रासाठी चिंताजनक म्हणावे लागेल. सातपुडा फाऊंडेशनने वनवणव्यांची मागील पाच वर्षांतील उपग्रहीय माहिती जमवून तिचे पृथक्करण केले आहे. याचे अवलोकन करता, हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील वनवणव्यांना गंभीरतेने घेण्याची गरज असल्याचे दिसून येते.

३६ टक्के क्षेत्र धोक्यात

२०२१ मध्ये कौन्सिल ऑन एनर्जी, एन्व्हायर्नमेंट एंड वॉटर (सी.ई.ई.डब्ल्यू) या संस्थेने ‘मॅनेजिंग फॉरेस्ट फायर्स इन अ चेंजिंग क्लायमेट’ या विषयावर केलेल्या एका देशव्यापी अभ्यासानुसार देशातील एकूण वनक्षेत्रांपैकी ३६ टक्के वनक्षेत्र वनवणव्यांमध्ये सातत्याने होरपळते आहे. या अभ्यासात वणव्यांच्या घटना, प्रत्यक्षात जळणारे वनक्षेत्र यावरून वनवणवाप्रवण क्षेत्र निश्चित करण्यात आले आहे. यानुसार २००० मध्ये देशाच्या विविध राज्यांमध्ये वणव्याच्या ३,०८२ घटनांची नोंद असताना ही संख्या आता २०१९ मध्ये तब्बल ३० हजार ९४७ पर्यंत वाढली आहे. या अभ्यासात आंध्र प्रदेश, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, छत्तीसगड, उत्तराखंड, तेलंगण आणि सिक्कीम वगळता ईशान्येकडील सर्वच राज्यांमधील जिल्ह्यांचा समावेश होतो. या अभ्यासात हवामान बदलामुळे तापमान वाढ, कमी आर्द्रता व कोरड्या कालखंडात वाढ होणे यामुळे पोषक परिस्थिती निर्माण झाल्याने वणव्यांच्या प्रमाणात वाढ झाल्याचे म्हटले आहे.

वनक्षेत्र हे जरी हवामान बदलावर मात करण्यात उपयोगी पडत असले, तरी हवामान बदलामुळे या वनक्षेत्राचे अस्तित्वच धोक्यात येत असल्याचे हा अहवाल सांगतो. हवामान बदलामुळे देशभरातील बहुतांश जिल्हे प्रभावीत होत असून, तेथे कोरडा दुष्काळ, महापूर, वादळे यांच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे म्हटले आहे.

या पार्श्वभूमीवर ‘नासा’ने वनवणव्यांबाबत जमविलेल्या मध्य भारतातील उपग्रहीय माहितीच्या नोंदींचा सातपुडा फाऊंडेशनतर्फे अभ्यास करण्यात आला. यात विदर्भात मागील पाच वर्षांत ४४ हजार वनवणवे लागल्याचे आढळले. यातील सर्वाधिक वनवणवे २०२१ मध्ये लागले आहेत. विदर्भाच्या विविध जंगलांमध्ये मागील पाच वर्षांत वनवणव्यांच्या तब्बल ४४ हजार ३८३ घटना नोंदविण्यात आल्या. त्यापैकी सर्वाधिक १३ हजार ८४ घटना २०२१ मधील आहेत. यंदाही हा आकडा ८ हजार ५६४ पर्यंत पोहोचला आहे. विदर्भात उन्हाळ्यामध्ये तेंदूपत्ता संकलन, मोहफुले संकलन, गुरांना चारा मिळणे यासाठी तसेच शेतीतील कचरा जाळल्याने वनवणवे पसरतात. वणव्यांचा जंगलांवर विपरीत परिणाम होत आहे. हवामान बदलाचा सामना करण्यासाठी जंगले हे प्रभावी शस्त्र आहे, ते निष्प्रभ ठरू नये.

(लेखक सातपुडा फाऊंडेशनचे संस्थापक आहेत.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com