शिक्षण बुद्धिमत्ता उत्पन्न करू शकत नाही, पण बुद्धिमत्तेला वळण लावू शकते. — एडवर्ड मॅकचेजने.महाराष्ट्राच्या राजकारणाने गेल्या काही वर्षांत अनेक स्थित्यंतरे पाहिली; पण सध्याचे चित्र असहिष्णू होऊ लागले असल्याचे दिसते. लोकशाहीत काही संकेत रुजत असतात. अशा निकोप संकेतांवरच लोकशाही पुढे जाते. पण अलीकडे त्याबाबत उदासीनता दिसते. विद्यमान लोकप्रतिनिधीचे निधन झाल्यानंतर होणारी पोटनिवडणूक ही शक्यतो बिनविरोध व्हावी, असा एक प्रघात आहे. पण तो पाळला जाणार का, याविषयी प्रश्नचिन्ह कायम आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर बारामतीत आणि भाजप आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनानंतर अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरीत रिक्त झालेल्या जागांसाठी पोटनिवडणुका होत आहेत. त्यानिमित्ताने येथील राजकारणात ‘राजकीय सौजन्य’ शिल्लक राहणार की नाही, याचीच परीक्षा होणार आहे. काही प्रसंग असे असतात की, त्यावेळी पक्षीय राजकारणापलीकडे जाऊन विचार करावा लागतो. दिवंगत व्यक्तीला आदरांजली आणि त्यांच्या कुटुंबाप्रती असलेली सहवेदना व्यक्त करण्यासाठी पोटनिवडणुका बिनविरोध होऊ द्याव्यात, असा एक संकेत आहे. अलीकडे मात्र तो पाळला जात नाही. नऊ आमदारांचे २०२० ते २०२४ या काळात निधन झाले. त्यापैकी भारत भालके, रावसाहेब अंतापूरकर, चंद्रकांत जाधव, रमेश लटके, मुक्ता टिळक, लक्ष्मण जगताप या सहा आमदारांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुका जोरदारपणे लढल्या गेल्या. त्यामुळेच यावेळी काय होणार, हे पाहावे लागेल. राष्ट्रवादी काँग्रेसने बारामतीतून उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार तर भाजपने राहुरीतून अक्षय शिवाजीराव कर्डिले यांची उमेदवारी जाहीर केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बारामतीची पोटनिवडणूक बिनविरोध करण्याचे सर्व पक्षांना आवाहन केले आहे. सुनेत्रा पवार यांनी ‘शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे’ पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांना ‘बिनविरोध’साठी विनंती केली असली तरीही काँग्रेसने निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतल्याने राजकीय वर्तुळात तो टीकेचा विषय ठरला आहे..राज्याच्या प्रशासनावर मजबूत पकड ठेवणारे अजित पवार यांची दीर्घ राजकीय कारकीर्द अलीकडचा अपवाद वगळता काँग्रेससोबतच्या राजकारणात गेली. त्यामुळे त्यांच्या अपघाती निधनानंतर बारामतीमध्ये निवडणूक लढवण्याचा काँग्रेसचा हट्ट खटकतो. मुळात ही जागा महाविकास आघाडीतील ‘राष्ट्रवादी कॉंग्रेस शरच्चंद्र पवार’ या पक्षाच्या वाट्याची होती. त्या पक्षाने उमेदवार उभा न करण्याचा निर्णय यापूर्वीच घेतला आहे. असे असताना काँग्रेसचा आग्रह भुवया उंचावायला लावणारा आहे. त्यामुळे त्या पक्षाच्या धोरणावर भाजपने टीका केली आहे. परंतु थोडे इतिहासात डोकावलो तर भाजपनेही काही वेगळे केलेले नाही, हे स्पष्ट होते. विधान परिषदेचे काँग्रेसचे आमदार शरद रणपिसे यांच्या निधनानंतर भाजपने उमेदवारीअर्ज मागे घेत काँग्रेसच्या प्रज्ञा सातव यांना बिनविरोध निवडून आणले होते, हे खरे; परंतु विधानपरिषदेचा हा एक अपवाद वगळता त्यानंतरच्या प्रत्येक पोटनिवडणुकीत भाजपने ताकद पणाला लावली. कोविडकाळात पंढरपूर-मंगळवेढाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार भारत भालके यांचे निधन झाले. त्यांच्या निधनानंतर भाजपने भारत भालके यांचे पुत्र भागीरथ यांचा पराभव करुन ती जागा जिंकली. अगदी अलीकडे नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत दिवंगत खासदार वसंत चव्हाण यांच्या मुलाच्या विरोधात उमेदवार देऊन भाजपने ‘बिनविरोध’ला खोडाच घातला होता. भाजपने पोटनिवडणुकांबाबत यापूर्वी घेतलेल्या भूमिकांमुळेच काँग्रेसही आडमुठी भूमिका घेत असावी. मजबूत लोकशाहीत सत्ताधारी आणि विरोधी पक्ष यांच्यात संवाद असणे आवश्यक असते. मात्र, सध्या तसा तो नाही आणि सध्या महाराष्ट्रात ‘विरोधी पक्षच उखडून टाकण्याचे’ जे आक्रमक धोरण सत्ताधाऱ्यांनी अवलंबले आहे, त्याचा हा परिपाक मानावा लागेल.याच महाराष्ट्राच्या विधिमंडळाने एकेकाळी देशाला सुसंस्कृत राजकारणाचे धडे दिले आहेत. परंतु, २०१९ नंतरच्या सत्तासंघर्षाने या परंपरेला तडे गेले आहेत. विरोधी पक्षाच्या आमदारांचा निधी रोखणे, त्यांना विकासाच्या प्रक्रियेतून बाजूला सारणे आणि वैयक्तिक पातळीवर येऊन टीका करणे, यामुळे राजकारणातील सौहार्द आटले आहे. राजकारणातला हा विखार असाच वाढू नये यासाठी पुन्हा एकदा काँग्रेसने सहिष्णू भूमिका घेऊन राजकारणात खुंटलेला संवाद सुरू केल्यास काँग्रेसचे राजकारणातील थोरलेपण अधोरेखित होईल. परंतु त्यासाठी या पक्षाच्या प्रदेश नेत्यांना ‘श्रेष्ठीं’चा कौल घ्यावा लागेल. निवडणूक लढविणे हे राजकीय पक्षांचे कामच आहे, हे खरे असले तरी राजकारण ही शक्यतेच्या चौकटीतील कला आहे, असे म्हटले जाते. .नुकत्याच झालेल्या चंद्रपूर महापालिकेच्या निवडणुकीनंतर काँग्रेसला संधी असूनही महापौरपद मिळवण्यासाठी शिवसेनेबरोबर ताळमेळ राखून तत्परतेने हालचाली न केल्याने ते पद भाजपच्या झोळीत अलगद जाऊन पडले. जिथे अनुकूल कौल मिळाला आहे, तिथे त्याचे चीज न करणे आणि जिथे निवडून येण्याची शक्यता नाही, तिथे उमेदवार उभा करण्याचा निर्णय घेणे, असे हे विसंवादी चित्र उभे राहाते. काँग्रेस पक्ष यात सुधारणा घडवेल, अशी अपेक्षा आहे..महाराष्ट्राच्या राजकारणात उरलेसुरले ‘राजकीय सौजन्य’ शिल्लक राहणार की नाही, याचीच परीक्षा पोटनिवडणुकांच्या निमित्ताने होणार आहे..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.