खानदानी वारसा मिळणे हा नशिबाचा अपघात आहे. औदार्य ही मात्र खऱ्या थोरांचे लक्षण आहे.— कार्लो गोल्डोनी.केंद्रात स्पष्ट बहुमताने पहिल्यांदा भारतीय जनता पक्षाचे सरकार आले तेव्हा ज्या प्रश्नांना सरकारने अत्युच्च प्राधान्य दिले होते, त्यात ईशान्य भारताचा प्रामुख्याने समावेश होता. त्यादृष्टीने प्रयत्न सुरू करण्यात आले; परंतु मणिपूरमधील संघर्षावर तोडगा काढण्यात सरकारला यश आलेले नाही. कुकी आणि मैतेई समुदायांतील परस्पर अविश्वास, द्वेष आणि आणि परकी शक्तींनी अस्वस्थतेत भर घालण्यासाठी केलेले प्रयत्न यांमुळे मणिपूर अशांत आहे. तिथे अद्यापही हिंसेचे उद्रेक अधूनमधून घडताना दिसतात. सध्या मणिपूरमध्ये पुन्हा पेटलेल्या वांशिक संघर्षाला अनेक पैलू आहेत. खरेतर त्यांचा सखोल अभ्यास करून सरकारने पावले टाकायला हवीत. मागील तीन वर्षांतील रक्तरंजित वांशिक संघर्षाच्या काळामध्ये मणिपूरने खूप काही गमावले. सूडाच्या भावनेने पेटलेली माणसे कोणते टोक गाठू शकतात, हे सगळ्या जगाने पाहिले..मणिपूरचे स्थान भूराजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वपूर्ण. त्यामुळे ते दीर्घकाळ हिंसाचाराच्या ज्वाळांमध्ये होरपळत राहणे हे देशाला परवडणारे नाही. याआधीचा केवळ मैतेई आणि कुकी यांच्यातील संघर्ष त्रिकोणी झाला असून, त्यात आता नागावंशीय ओढले गेले आहेत. राज्यातील राष्ट्रपती राजवट संपुष्टात आल्यानंतर युमनाम खेमचंद यांच्या हाती राज्याची सूत्रे आली; पण त्यामुळे परिस्थितीत फारसा फरक पडला नाही. विष्णूपूरमध्ये नुकताच एका घरावर रॉकेटसदृश शस्त्राच्या साहाय्याने हल्ला करण्यात आला. या हल्ल्यामध्ये दोन लहान मुलांचा बळी गेल्यानंतर पुन्हा एकदा आंदोलनाचा भडका उडाला. मैतेईबहुल खोरे आणि कुकी-झोमीबहुल टेकड्यांच्या परिसरामध्ये निदर्शनांची आग भडकली. तसे पाहता मैतेई विरुद्ध कुकी या संघर्षाची पाळेमुळे ही राजकीय प्रतिनिधित्व, जमिनीचे हक्क, आर्थिक लाभ आणि नोकरीतील आरक्षण आदी मुद्यांमध्ये दडलेली आहेत. केवळ लष्करी बळाच्या आधारावर या समस्यांवर तोडगा निघू शकत नाही, त्यामुळे सरकारने तटस्थ भूमिका घेत संवाद अधिक व्यापक करायला हवा, अशी भूमिका स्थानिक माध्यमकर्मी आणि अभ्यासक मांडत असून, त्याचा गांभीर्याने विचार करायला हवा. मणिपूरच्या याआधीच्या संघर्षामध्ये अडीचशेपेक्षा अधिक नागरिक मृत्युमुखी पडले असून साठ हजारांपेक्षा अधिक लोकांना त्यांचे राहते घर सोडावे लागले. यामुळे केवळ कुटुंबेच नाही तर माणसेही आतून मोडून पडली. अशा स्थितीमध्ये सैरभैर झालेल्या तरुणाईच्या मनामध्ये कुणी बाहेरून विष ओतले तर त्यात आश्चर्य वाटायला नको. आता नेमके तेच घडते आहे. अरुणाचल प्रदेशवर चीनकडून अधूनमधून मालकी हक्क सांगितला जातोच, काही शहरांची नावे बदलण्याची आगळीकही ‘ड्रॅगन’कडून होते. .नकाशातील बदल तर ठरलेलेच. मध्यंतरी काही बांगलादेशी कट्टरपंथीयांनी ईशान्येकडील राज्यांना उर्वरित भारताशी जोडणाऱ्या ‘चिकन नेक’ला ताब्यात घेण्याची चिथावणीखोर विधाने केली होती. स्थानिक तरुणांच्या डोक्यात भारतद्वेषाचे विष भरवून त्यांच्या हातामध्ये स्वयंचलित शस्त्रे आणि अमली पदार्थ सोपवून उद्रेक घडवून आणण्याची परशक्तीची रणनीती तशी जुनी. ‘नॅशनल सोशॅलिस्ट कौन्सिल ऑफ नागालँड’, ‘युनायटेड लिबरेशन फ्रंट ऑफ आसाम - इंडिपेंडंट’सारख्या अनेक फुटीरतावादी संघटनांवर केंद्र सरकारने याआधीच बंदी घातली होती; पण त्यांनी पुढे म्यानमारमध्ये आश्रय घेतल्याचे उघड झाले होते. आताही ईशान्येकडील फुटीरतावादाला म्यानमार आणि चीनमधून मदत केली जात असल्याचे लपून राहिलेले नाही. हा परकी हस्तक्षेप केवळ ईशान्य भारतापुरताच मर्यादित नाही. जम्मू- काश्मीरमध्येही तो होतो. श्रीनगरच्या विमानतळावर सॅटेलाइट फोन बाळगणाऱ्या दोन अमेरिकी नागरिकांना नुकतीच अटक करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघड झाली आहे. अर्थात या प्रकरणातील तथ्यांश पुढे येणे बाकी असले तरीसुद्धा अशा प्रकारच्या संशयास्पद कारवाया चिंता वाढविणाऱ्या आहेत. पंजाबात खलिस्तान्यांना कॅनडातून होणारा रसद पुरवठा लपून राहिलेला नाही. रणनीतिकदृष्ट्या विचार केला तर सीमावर्ती भागातील राज्ये ही नेहमीच संवेदनशील समजली जातात. भारताच्या दुर्दैवाने श्रीलंका आणि भूतान यांच्यासारखे काही मोजके अपवाद सोडले तर बहुतांश शेजारी हे प्रतिस्पर्धी आहेत. याबाबतीत कोण कमी पाताळयंत्री आणि कोण अधिक एवढाच काय तो फरक. जागतिक पातळीवर युद्धाला तोंड फुटले असताना आणि आर्थिक अनिश्चिततेमध्ये भर पडताना, तरुणाईच्या अस्वस्थतेचा गैरफायदा परकी शक्तींनी घेता कामा नये म्हणून भारताने अधिक सावध राहायला हवे. सध्या केवळ देशातच नाहीतर जगभर फुटपाड्यांची चलती आहे, आतापर्यंत तरी भारतात त्यांची डाळ शिजलेली नाही. .भविष्यातही ती शिजता कामा नये यासाठी सरकारी यंत्रणेने संवादाच्या कक्षा अधिक रुंदावायला हव्यात. तरच सीमावर्ती भागातील हिंसाचाराचे थैमान थांबू शकेल. जम्मू-काश्मीरला रक्तबंबाळ करणाऱ्या दहशतवादी कारवाया असोत की पंजाबमधील खलिस्तान्यांचा फुटीरतावाद असो; त्यांना पायबंद घालण्याचे कामदेखील तत्कालीन नेतृत्व आणि मुख्यतः भारतीयत्व जपणाऱ्या येथील जनता जनार्दनाने आजवर केले. मणिपूरच्या आव्हानाला तोंड देण्यासाठीही सर्वंकष प्रयत्न करायला हवेत..मैतेई आणि कुकी यांच्यातील संघर्ष त्रिकोणी झाला असून, त्यात आता नागावंशीय ओढले गेले आहेत. तेथे खऱ्या अर्थाने स्थैर्य निर्माण करण्यासाठी सर्वंकष प्रयत्नांची गरज आहे..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.