मोदींचे जी-२०(२४)

Narendra modi 2022 G20 Bali summit
Narendra modi 2022 G20 Bali summit

जी-२० परिषदेचे सूप वाजले आणि जी-२० चे नेतृत्व भारताकडे आले. या नेतृत्वामुळे भारतीय परराष्ट्र व्यवहारासाठी मोठी संधी उपलब्ध होणार आहे. जगभरात होत असलेल्या बदलांमुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना खेळण्यासाठी अनेक संधी मिळणार आहेत आणि त्या संधीचा लाभ कसा उठवायचा, हे मोदींना पक्के ठाऊक आहे.

बालीमधील जी-२० शिखर परिषद अनेक कारणांनी गाजली. या परिषदेत ट्रुडो आणि शी जिनपिंग यांच्यात झालेली शाब्दिक चकमक, मोदी आणि बायडेन व ऋषी सुनक यांच्यात झालेली अनौपचारिक चर्चा, इंडोनेशियाच्या जोको विडोडोकडून मोदींकडे पुढील परिषदेच्या अध्यक्षपदाची आलेली सूत्रे यामुळे भारताला परराष्ट्र व्यवहारामध्ये महत्त्वाचा टप्पा सेट करण्यास उपयुक्त ठरणार आहे.

जागतिक ‘जीडीपी’च्या ८० टक्के आणि जागतिक व्यापाराच्या ७५ टक्के वाटा उचलणाऱ्या भारतामध्ये जी-२० परिषदेचे आयोजन होत आहे, ही नक्कीच इव्हेंट करण्यात वाकबगार असणाऱ्या मोदींसाठी महत्त्वाची संधी आहे. नरेंद्र मोदी सर्वात चांगले इव्हेंट मॅनेजर आहेत, असे धाडसी वक्तव्य लालकृष्ण अडवानी यांनी केले होते.

जी-२० ची होणारी परिषद मोदींसाठी अत्यंत गरजेची आहे. २०२४ च्या निवडणूक मोहिमेची दिशा या माध्यमातून चमकदारपणे सेट करण्यात येईल. त्यासाठी जगभरातील सर्व प्रमुख चेहरे येथे येतील. आपल्या नेत्याची स्तुती करतील. वर्षभर देशभरात शंभर बैठका आयोजित केल्या जातील. त्यामधून वातावरणनिर्मिती होईल आणि या परिषदेचा समारोप चरणसीमेवर पोचलेला असेल. देशांतर्गत राजकारणावर त्याचा परिणाम होईल यासाठी प्रयत्न केला जाईलच. मात्र या सर्वांवर टिपण्णी करताना राजकीय चष्मे काढायला हवेत. तसे केले तरच परदेशी आणि धोरणात्मक बाबींच्या संधी किती महत्त्वाच्या आहेत, हे पाहता येईल.

सोव्हिएत साम्राज्याच्या अस्तानंतर तीन दशकांनंतर दोन वर्षांत प्रथमच अस्थिरता निर्माण झाली आहे. त्याला व्लादिमीर पुतीन आणि शी जिनपिंग काही प्रमाणात का होईना कारणीभूत आहेत. सोव्हिएतच्या पतनानंतर जग एकध्रुवीय व्यवस्थेत स्थायिक झाले होते.त्याला नवी महाशक्ती बनू पाहणाऱ्या चीनने आव्हान देण्यास प्रारंभ केला आहे. अमेरिकेच्या कमी होत असलेल्या शक्तीने या कल्पना अधिक दृढ होण्यास मदत झाली आहे. ओबामांनंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी जागतिकीकरणातून घेतलेली माघार आणि त्यानंतर बायडेन यांनी अफगाणिस्तानातून घेतलेला काढता पाय यामुळे फरक पडला आहे, अन्यथा २०२२ पर्यंत परिस्थिती ‘जैसे थे’च राहिली असती आणि आजच्या जी-२० चे संदर्भ फारसे बदलले नसते. नेमके कशामुळे घडले असे हे जाणून घेऊ.

अमेरिकेपुढे उभी राहत असलेली आव्हाने...वाढती महागाई, नाजूक होणारी अर्थव्यवस्था, युद्धातील सहभागामुळे वाढत असलेला खर्च यामुळे अमेरिकी अर्थव्यवस्थेला धक्का बसला होता.आता ती त्यामधून सावरण्याचा ती यशस्वी प्रयत्न करत आहे. युक्रेनमध्ये रशियाविरोधात युक्रेनला सहकार्य करताना तेथे युक्रेनचे सैन्य देशासाठी लढत आहे, ही बाब महत्त्वाची आहे. त्यामुळेच तेथे अमेरिकेच्या मदतीमुळे सरशी होताना दिसत आहे. तालिबानमध्ये मात्र माघार घ्यावी लागली होती. व्हिएतनाम, इराक, मध्यपूर्वेतील इतरत्र सैन्य पाठवूनही तेथे पराभवच पदरी पडला होता. श्रीलंकेत भारतालाही असाच फटका बसला होता.

तेच बांगलादेश मुक्त करताना तेथील लोकांची भावना तशी होती त्यामुळे भारताने १३ दिवसांत युद्ध जिंकले होते. युक्रेनविरुद्ध रशिया लष्करी, मुत्सद्दी आणि राजकीयदृष्ट्या पराभूत होत आहे. ही मित्रपक्ष असलेल्या भारतासाठी काळजीची बाब आहे. मॉस्कोमधील अंतर्गत राजकारण काहीही असो, रशिया आणि पुतीन कमकुवत होत आहेत. हे भारतासाठी चांगले आहे. कारण भारताला धोरणात्मक पर्याय तयार करण्यास संधी आहे, जे भविष्यात उपयुक्त ठरणार आहेत.

चीनच्या वाढत्या शक्तीला धक्का

पाच वर्षांपूर्वीपर्यंत, पारंपरिक शहाणपणाने पावले टाकणारा चीन २०३० पर्यंत घसरत चाललेल्या अमेरिकेला मागे टाकण्याच्या मार्गावर होता.मात्र काळाच्या कसोटीवर सद्य:स्थितीत पाहिले असता आज चीन विकासासाठी झगडत आहे. भरीत भर म्हणून त्यांच्या देशातील कार्यक्षम वयाची लोकसंख्या कमी होत आहे, कर्जाचा बोजा वाढत आहे...तंत्रज्ञानाचा उपयोग वाढतो आहे, पण त्याचे तोटेही समोर येऊ लागले आहेत.अध्यक्ष शी जिनपिंग स्वप्रतिमेला सुपरस्टार बनवून चीनला सुपरपॉवर बनण्यासाठी ईर्षेने पेटलेले आहेत.मात्र विवेक हरवताना दिसतो आहे.

नरेंद्र मोदींसाठी मोठी संधी

भारत जी-२० च्या अध्यक्षपदी असताना होणाऱ्या बदलांचे निरीक्षण करावे लागेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मात्र खेळण्यासाठी मोठी आणि मोक्याची अशी नवी जागा उपलब्ध झाली आहे. आत्तापर्यंत ते त्यांनी चतुराईने हाताळले आहे.भारताच्या आर्थिक आणि सामरिक हितसंबंधांचा समतोल राखून, अमेरिका, रशिया आणि चीनला योग्य अंतरावर ठेवण्यात यश मिळविले आहे. भारताच्या फायद्यासाठी या वर्षभराच्या सुरवातीला त्याचा कसा उपयोग करता येईल आणि पुढे जाऊन २०२४ च्या निवडणुकीत त्याचा कसा थेट उपयोग करता येईल, यासाठी ते नक्कीच प्रयत्नशील असतील.

चीन, रशिया, अमेरिकेची वाटचाल

बायडेन आणि शी जिनपिंग यांच्यात बालीमध्ये झाले ते एकमेकांना दिलेले हताश इशारे होते. कोणीही कोणाचे ऐकणार नाही, हे सत्य आहे. जिनपिंगच्या अहंकाराने चीनचे नुकसान होणार आहे, हे नक्कीच.फक्त ज्याप्रमाणे पुतीन यांच्याप्रमाणे पावले टाकल्यानंतर होणाऱ्या नुकसानीपेक्षा ते नक्कीच कमी आहे.चीनला धक्का बसतोय, मात्र त्यामुळे तो कमकुवत होईल, असे म्हणणे धाडसाचे ठरेल. कारण त्यांच्याकडे प्रचंड मोठी सकल राष्ट्रीय शक्ती आहे. फक्त ते अधिक मजबूत होण्याला मोठीच खीळ बसली आहे.

- शेखर गुप्ता

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com