कन्याकुमारीतील साधनेतून साकारले नवे संकल्प

२०२४ च्या या निवडणुकीत खरेच अनेक सुखद योगायोग आले आहेत. अमृतकाळातल्या या पहिल्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचार अभियानाची सुरवात मी १८५७ च्या पहिल्या स्वातंत्र्यलढ्याचे प्रेरणास्थळ मेरठ इथून केला.
new resolution realized through Sadhana in Kanyakumari pm modi
new resolution realized through Sadhana in Kanyakumari pm modiSakal

स्वामी विवेकानंद यांनी १८९७ मध्ये म्हटले होते की, आपल्याला पुढील ५० वर्षे केवळ आणि केवळ राष्ट्रासाठीच समर्पित करायची आहेत. त्यांच्या या आवाहनानंतर बरोबर ५० वर्षांनंतर १९४७ मध्ये भारत स्वतंत्र झाला. आज तशीच सुवर्णसंधी आली आहे.

आपण पुढील २५ वर्षे केवळ आणि केवळ राष्ट्रासाठीच समर्पित करूयात... देशाला विकसित बनवूयात.... पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लिहिलेला देशवासीयांना आवाहन करणारा लेख. कन्याकुमारीहून एक जून रोजी नवी दिल्लीला परत येत असतानाच्या प्रवासात केलेले चिंतन...

- नरेंद्र मोदी, पंतप्रधान

मा झ्या प्रिय देशवासीयांनो, लोकशाहीच्या जननीमध्ये लोकशाहीच्या सर्वात मोठ्या महापर्वाचा एक टप्पा पूर्ण होत आहे. तीन दिवस कन्याकुमारी इथे आध्यात्मिक यात्रेनंतर दिल्लीला रवाना होण्यासाठी मी विमानात येऊन बसलो आहे...काशी आणि अनेक मतदारसंघांत मतदान सुरु आहे. अनेक अनुभव आहेत, अनेक अनुभूती आहेत...स्वतः मध्ये अपार ऊर्जेचा प्रवाह मी अनुभवत आहे.

२०२४ च्या या निवडणुकीत खरेच अनेक सुखद योगायोग आले आहेत. अमृतकाळातल्या या पहिल्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचार अभियानाची सुरवात मी १८५७ च्या पहिल्या स्वातंत्र्यलढ्याचे प्रेरणास्थळ मेरठ इथून केला.

भारतमातेची परिक्रमा करत या निवडणुकीतली माझी शेवटची प्रचारसभा पंजाबमधल्या होशियारपूर इथे झाली. संत रविदास जी यांची तपोभूमी, आपल्या गुरूंची भूमी पंजाबमध्ये शेवटची प्रचारसभा होण्याचे भाग्य विशेष आहे. त्यानंतर मला कन्याकुमारीमध्ये भारतमातेच्या चरणांशी बसण्याची संधी मिळाली.

सुरवातीच्या क्षणांमध्ये निवडणुकीचा कोलाहल तन-मनात दाटला होता. रॅली, रोड शो मध्ये पाहिलेले असंख्य चेहरे नजरेसमोर येत होते. माता-भगिनीचा तो अपार स्नेहाचा उमाळा, त्यांचा आशीर्वाद...त्यांच्या नजरेतला माझ्याप्रती असलेला विश्वास,ती आपुलकी ... मी हे सगळे सामावत होतो. माझे डोळे पाणावत होते..मी नीरवतेमध्ये जात होतो. साधनेत प्रवेश करत होतो.

काही क्षणातच राजकीय वाद-विवाद, आरोप-प्रत्यारोप ...आरोपांचा आवाज आणि शब्द सारे काही अंतर्धान होऊ लागले. माझ्या मनातला विरक्तभाव अधिक गडद झाला...माझे मन बाह्यजगतापासून पूर्णपणे अलिप्त झाले.

इतक्या मोठ्या दायित्वामध्ये अशी साधना कठीण असते, मात्र कन्याकुमारीची भूमी आणि स्वामी विवेकानंद यांच्या प्रेरणेने ती सोपी केली. खासदार म्हणून माझी निवडणूकही माझ्या काशीच्या मतदारांच्या चरणी सोडून मी इथे आलो होतो.

जन्मापासूनच मला हे संस्कार दिल्याबद्दल मी ईश्वराचा आभारी आहे. माझ्या मनात विचार येत होते की स्वामी विवेकानंद यांनी या स्थानी साधना करताना काय साक्षात्कार अनुभवला असेल! माझ्या साधनेचा काही काळ या प्रकारच्या विचारप्रवाहात गेला.

या विरक्ततेत, शांतता आणि नीरवतेत माझ्या मनात भारताच्या उज्वल भविष्यासाठी, भारताच्या लक्ष्यासाठी अखंड विचार उमटत होते. कन्याकुमारीच्या उगवत्या सूर्याने माझ्या विचारांना नवी उंची दिली. सागराच्या विशालतेने माझ्या विचारांना व्यापकता दिली आणि क्षितिजाच्या विस्ताराने ब्रह्मांडामध्ये खोलवर सामावलेल्या एकात्मतेची अखंड अनुभूती दिली.

भारताचा वैचारिक संगम

दशकांपूर्वी हिमालयाच्या कुशीत केलेले चिंतन आणि अनुभव पुनर्जीवित होत आहेत, अशी जाणीव होत होती.कन्याकुमारीचे हे स्थान नेहमीच माझ्या हृदयाच्या अतिशय जवळ राहिले आहे. कन्याकुमारीमध्ये ‘विवेकानंद शिला स्मारका’ची निर्मिती एकनाथजी रानडे यांनी केली होती. एकनाथजींसोबत भटकंतीची संधी मला मोठ्या प्रमाणावर मिळाली होती.

या स्मारकाच्या निर्मितीच्या काळात कन्याकुमारीमध्ये काही काळ राहणे, तिथे ये-जा करणे स्वाभाविकपणे होत असे. काश्मीरपासून कन्याकुमारी... ही प्रत्येक देशवासीयाच्या अंतर्मनात कोरली गेलेली आपली सामाईक ओळख आहे. हे ते शक्तिपीठ आहे जिथे माता शक्तीने कन्याकुमारीच्या रुपात अवतार घेतला.

या दक्षिणी टोकावर माता शक्तीने भगवान शंकरासाठी तपस्या आणि प्रतीक्षा केली, जे भारताच्या सर्वात उत्तरेकडील टोकावरील हिमालयावर विराजमान होते. कन्याकुमारी संगमांच्या संगमाची भूमी आहे. आपल्या देशाच्या पवित्र नद्या वेगवेगळ्या सागरांना जाऊन मिळतात आणि या ठिकाणी त्या समुद्रांचा संगम होतो आणि या ठिकाणी एक महान संगम दिसतो- भारताचा वैचारिक संगम!

या ठिकाणी विवेकानंद शिला स्मारकाबरोबरच संत तिरुवल्लुवर यांची भव्य मूर्ती, गांधी मंडपम् आणि कामराज मणिमंडपम् आहे. महान नायकांच्या विचारांचे हे प्रवाह येथे राष्ट्रचिंतनाचा संगम तयार करत आहेत. यामुळे राष्ट्रनिर्मितीच्या महान प्रेरणांचा उदय होत आहे. जे लोक भारताच्या राष्ट्र असण्याविषयी आणि देशाच्या एकतेविषयी शंका व्यक्त करतात, त्यांना कन्याकुमारीची ही भूमी एकतेचा अमीट संदेश देते.

कन्याकुमारीमध्ये संत तिरुवल्लूवर यांची भव्य मूर्ती, समुद्रातून भारतमातेचा विस्तार पाहत असल्याचे प्रतीत होत आहे. त्यांची ‘तिरुक्कुरल’ ही रचना तामिळ साहित्याच्या रत्नांनी जडलेल्या एका मुकुटाप्रमाणे आहे. यामध्ये जीवनाच्या प्रत्येक भागाचे वर्णन आहे, जे देशासाठी आपले सर्वस्व अर्पण करण्याची प्रेरणा देते. अशा महान विभूतीला श्रद्धांजली अर्पण करणेदेखील माझे परमभाग्य आहे.

स्वामी विवेकानंदांनी सांगितले होते- Every Nation Has a Message To deliver, a mission to fulfil, a destiny to reach. भारत हजारो वर्षांपासून याच भावनेने सार्थक उद्दिष्टासह पुढे वाटचाल करत राहिला आहे.

भारत हजारो वर्षांपासून विचारांच्या संशोधनाचे केंद्र राहिला आहे. आपण जे मिळवले आहे त्याला कधीही आपली वैयक्तिक ठेव मानून आर्थिक किंवा भौतिक निकषांवर त्याची तुला केली नाही. म्हणूनच, ‘इदं न मम’ हा भारताच्या चारित्र्याचा एक सहज आणि स्वाभाविक भाग बनला आहे. भारताच्या कल्याणातून जगाचे कल्याण आणि भारताच्या प्रगतीतून जगाची प्रगती, या धारणेचे सर्वोत्तम उदाहरण म्हणजे आपली स्वातंत्र्यचळवळ आहे. भारत स्वतंत्र झाला, त्यावेळी जगातील अनेक देश पारतंत्र्यात होते.

भारताच्या स्वातंत्र्याने त्या देशांनाही प्रेरणा आणि बळ दिले आणि त्या देशांनीही स्वातंत्र्य मिळवले. अलिकडच्याच कोरोनाच्या कसोटी पाहणाऱ्या काळाचे उदाहरणही आपल्यासमोर आहेच. त्यावेळी गरीब आणि विकसनशील देशांबद्दल शंका व्यक्त केली जात होती; परंतु त्या काळात भारताने केलेल्या यशस्वी प्रयत्नांमुळे अशा सर्व देशांना प्रोत्साहन आणि सहकार्यही मिळाले.

आज भारताचे प्रशासनिक प्रारूप जगातील अनेक देशांसाठी एक उदाहरण म्हणून समोर आले आहे. अवघ्या १० वर्षांत २५ कोटी लोकांना गरिबीच्या अवस्थेतून बाहेर काढणे ही अभूतपूर्व बाब आहे. लोकाभिमुख उत्तम सुशासन, आकांक्षा असलेले जिल्हे, आकांक्षा असलेले तालुके अशी आपल्या अभिनव प्रयोगांच्या बाबतीत जगभरात चर्चा होत आहे.

गरिबांच्या सक्षमीकरणापासून ते समाजातल्या शेवटच्या घटकापर्यंत लाभ पोहोचण्याचे प्रयत्न, अगदी तळाला असलेल्यांना प्राधान्य देण्याच्या आपल्या प्रयत्नांनी जगाला प्रेरणा दिली आहे. गरिबांचे सक्षमीकरण, व्यवस्थेत पारदर्शकता आणि गरिबांना हक्क मिळवून देणे यासाठी आपण तंत्रज्ञानाचा कशा प्रकारे वापर करू शकतो, याचे उदाहरण म्हणून ‘डिजिटल इंडिया मोहीम’ जगासमोर एक उदाहरण म्हणून समोर आली आहे.

भारतात अगदी स्वस्तात उपलब्ध करून दिला जात असलेला डेटा म्हणजे, गरिब घटकांना माहिती आणि सेवा उपलब्ध होतील, याची सुनिश्चितता करणारे सामाजिक समानतेचे माध्यम बनू लागले आहे. खरे तर तंत्रज्ञानाच्या या अशा लोकशाहीकरणाकडे संपूर्ण जग संशोधनाच्या दृष्टिकोनातून पाहू लागले आहे; इतकेच नाही तर जागतिक पातळीवरील मोठमोठ्या संस्था, अनेक देशांना आपल्या प्रारुपाचा अभ्यास करण्याची शिफारस करू लागल्या आहेत.

सद्यःस्थितीत भारताची प्रगती आणि उदय ही केवळ भारतासाठीचीच मोठी संधी आहे, असे नाही. जगभरातील आपल्या सहप्रवासी देशांसाठीदेखील ही एक ऐतिहासिक घटना असणार आहे. ‘जी-२०’ च्या यशस्वी आयोजनानंतर जग भारताची ही ठाम भूमिका अधिक स्पष्टतेने स्वीकारू लागला आहे.

आज भारताला ‘ग्लोबल साऊथ’ वर्गवारीअंतर्गत येणाऱ्या देशांचा एक सशक्त आणि महत्त्वाचा आवाज म्हणून मान्यता मिळू लागली आहे. भारताच्या पुढाकारानेच आफ्रिकी महासंघ ‘जी-२०’ समुहाचा सदस्य देश होऊ शकला आहे. ही घटना सर्व आफ्रिकी देशांच्या भविष्यातील वाटचालीला नवे वळण देणारी वाटचाल ठरली आहे.

नव्या भारताचे हे स्वरूप आपल्यात अभिमान आणि गौरवाची भावना जागवते. पण त्याचसोबत १४० कोटी देशवासीयांना त्यांच्या कर्तव्याची जाणीवही करून देते. आता एकही क्षण वाया न घालवता आपल्याला आपल्या जबाबदाऱ्या आणि मोठ्या उद्दिष्टांच्या दिशेने पावले उचलायची आहेत. नवी स्वप्ने पाहायची आहेत.

आणि ती स्वप्ने जगायला सुरुवात करायची आहे. भारताचा विकास आपल्याला जागतिक परिप्रेक्ष्यातून पाहायचा आहे आणि त्यासाठी आपण देशाचे अंगभूत सामर्थ्य समजून घेणे आवश्यक आहे. या सामर्थ्याची आणखी जोपासना करताना जगाच्या भल्यासाठी त्याचा उपयोग करायचा आहे. आजच्या वैश्विक परिस्थितीत ‘युवा राष्ट्र’ म्हणून भारताचे सामर्थ्य आपल्यासाठी सुखद संयोग आणि सुसंधी असून आता आपल्याला मागे वळून पाहायचे नाही.

‘विकसित भारता’च्या दिशेने...

२१व्या शतकातील जग आज भारताकडे खूप आशेने पाहत आहे. वैश्विक परिदृश्याचा विचार करता पुढे जाण्यासाठी आपल्याला काही बदलही करावे लागतील. सुधारणांबाबतचा पारंपरिक विचारही आपल्याला बदलायला हवा. भारत, सुधारणा केवळ आर्थिक बदलांपुरत्या मर्यादित ठेवू शकत नाही. आपल्याला जीवनातल्या प्रत्येक क्षेत्रात सुधारणेच्या दिशेने मार्गक्रमण करावे लागेल. आपल्या सुधारणा ‘विकसित भारत २०४७’ च्या संकल्पाला अनुरूप असायला हव्यात.

आपल्याला हेदेखील समजून घेतले पाहिजे की, देशासाठी सुधारणा ही कधी एकतर्फी प्रक्रिया होऊ शकत नाही. म्हणून मी देशासाठी रिफॉर्म, परफॉर्म आणि ट्रान्सफॉर्म दृष्टिकोन समोर ठेवला आहे. सुधारणा, ही नेतृत्वाची जबाबदारी असते. त्या आधारावर नोकरशाही कामगिरी बजावते आणि जनता जनार्दन यात जोडले जातात तेव्हा परिवर्तन घडताना दिसू लागते.

भारताला विकसित भारत बनवायचे असेल तर आपल्याला उत्कृष्टता हा मूलभाव बनवावा लागेल. आपल्याला Speed(वेग), Scale(श्रेणी ), Scope(व्याप्ती ) आणि Standards(मानके ) असे चहुबाजूने वेगाने काम करावे लागेल. आपल्याला उत्पादन निर्मितीसोबत गुणवत्तेवरही जोर द्यायला हवा. आपल्याला झिरो डिफेक्ट-झिरो इफेक्टचा मंत्र आत्मसात करावा लागेल.

आपल्याला क्षणोक्षणी या गोष्टीचा अभिमान वाटायला हवा की ईश्वराने आपल्याला भारत भूमीत जन्माला घातले आहे. ईश्वराने आपल्याला भारताची सेवा आणि त्याच्या सर्वोच्च प्रवासात आपली भूमिका पार पाडण्यासाठी निवडले आहे. आपल्याला प्राचीन मूल्यांचा आधुनिक स्वरूपात अंगीकार करताना आपला वारसा आधुनिक रूपात पुनर्परिभाषित करावा लागेल.

आपल्याला एक राष्ट्र म्हणून जुनाट विचारसरणी आणि मान्यता यांचा त्याग करावा लागेल.आपल्याला आपल्या समाजाला व्यावसायिक निराशावादींच्या दबावातून बाहेर काढायचे आहे. नकारात्मकतेपासून मुक्ती, यश साकार करण्याच्या दिशेने पोहोचण्याची पहिली पायरी आहे. सकारात्मकतेच्या वातावरणातच यशाला गवसणी घालता येते.

भारताच्या अनंत आणि अमर शक्तीप्रति माझी आस्था, श्रद्धा आणि विश्वास दिवसेंदिवस वाढत चालला आहे. मी गेल्या १०वर्षांमध्ये भारताचे हे सामर्थ्य आणखी वाढताना पाहिले आहे आणि ते अनुभवलेही आहे. या २१व्या शतकात आपल्याला विकसित भारताची पायाभरणी करायची आहे. स्वातंत्र्यलढ्याच्या वेळी देशवासीयांसमोर बलिदानाची वेळ होती.

आज बलिदानाची नव्हे, तर निरंतर योगदान देण्याची वेळ आहे. स्वामी विवेकानंद यांनी १८९७ मध्ये म्हटले होते की आपल्याला पुढील ५० वर्षे केवळ आणि केवळ राष्ट्रासाठीच समर्पित करायची आहेत. त्यांच्या या आवाहनानंतर बरोबर ५० वर्षानंतर १९४७ मध्ये भारत स्वतंत्र झाला.

आज आपल्याकडे तशीच सुवर्णसंधी आहे. आपण पुढील २५ वर्षे केवळ आणि केवळ राष्ट्रासाठीच समर्पित करूयात. आपले हे प्रयत्न भावी पिढ्या आणि आगामी शतकांसाठी नवभारताचा भक्कम पाया बनून अमर राहतील. मी देशाची ऊर्जा पाहून असे म्हणू शकतो की लक्ष्य आता दूर नाही . चला, वेगाने पावले टाका, एकत्र चालूया, भारताला विकसित राष्ट्र बनवूया.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com