कर्बमुक्तीच्या पाऊलवाटा : पाण्याची वाट व्हावी मोकळी

देशातील अनेक शहरात केंद्र, राज्य आणि स्थानिक प्रशासनाच्या माध्यमातून विकासकामे होत असतात.
water route
water routesakal
Updated on
Summary

देशातील अनेक शहरात केंद्र, राज्य आणि स्थानिक प्रशासनाच्या माध्यमातून विकासकामे होत असतात.

देशातील अनेक शहरात केंद्र, राज्य आणि स्थानिक प्रशासनाच्या माध्यमातून विकासकामे होत असतात. शहरांचा विकास साधत असताना पर्यावरणाचे संरक्षण करणे आणि नागरिकांच्या हितासाठी विकास कामांचा उपयोग होणे हे उद्दिष्ट असते. विकासकामांसाठी लागणारा कोट्यवधी रुपयांचा निधी प्रशासनाच्या तिजोरीतून जरी खर्च होत असला तरी तो जनतेचाच असतो. परंतु अनेक ठिकाणी विकास कामांच्या प्रक्रियेत प्रत्यक्षात विरोधाभास जाणवतो. उदा. अनेकदा अक्षरशः चांगल्या अवस्थेत असणारे डांबरी रस्ते उखडून त्यांचे काँक्रिटीकरण करण्याचा अट्टाहास केला जातो. हे कोण करते आणि कशासाठी केले जाते, याचे उत्तर प्रशासनाकडे नसते. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना अशा घटना पाहिल्यावर जनतेच्या पैशाची होणारी उधळपट्टी थांबलीच पाहिजे, असे वाटणे यात गैर ते काय आहे.

शहरातील रस्त्यांचा विकास करत असताना आवश्यक असणारे चढ-उतार, पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठीची व्यवस्था या महत्त्वाच्या गोष्टींकडेच नेमके दुर्लक्ष होते. ज्या पावसाळ्याची आपण चातकासारखी वाट पाहतो, तो दरवर्षीप्रमाणे आपली हजेरी लावतोच. परंतु रस्त्याच्या दुतर्फा गटारे नसल्याने पावसाचे पाणी पुरासारखे रस्त्यावरून वाहत असते. त्यातून वाट काढणे जिकिरीचे होते. तसेच गटारे तुंबणे, चौका-चौकात पाणी साचणे, वाहतूक कोंडी हे सर्व पाठोपाठ होत असते. अनेक ठिकाणी नैसर्गिक नाले, ओढे बुजल्यामुळे पाणी वाहून जाण्याला मार्गच राहिलेला नाही. त्यामुळे भूपृष्ठावर पडणारे पावसाचे पाणी भर रस्त्यावरून आणि अस्तित्वातील नाले, ओढे यांच्याद्वारे नदीला जाऊन मिळते. परंतु ते वाहून जात असताना कचरा, फांद्या, पाने, माती, धूळ आपल्या बरोबर घेऊन नद्यांचे पाणी प्रदुषित करते. शहरांचे वैभव असणाऱ्या नद्यांची गटारे बनवण्यास आपणच जबाबदार असतो.

भूपृष्ठावर पडणारे पाणी जर जागच्या जागी जिरवले तर भूजलाची पातळी वाढेल. रस्त्याच्या कडेला आणि मध्यभागी लावलेल्या झाडांना भूजलामार्फत पाणी मिळून ती अधिक जगतील. आजच्या काळात रेन वॉटर हार्वेस्टिंग याच कारणासाठी केले जाते. आज प्रगत देशात घरे, रस्त्याच्या बाजूचे पदपथ, इमारती, बंगले, रो हाऊस, फार्म हाऊस, कारखाने अशा ठिकाणी सच्छिद्र काँक्रिट केले जात आहे. यामुळे भूजल पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे सिद्ध झाले आहे. सच्छिद्र काँक्रिट करण्याची पद्धत पारंपरिक पद्धतीपेक्षा थोडीशी वेगळी आहे. यात खडी, सिमेंट, पाणी, अॅडमिक्शचर यांचे विशिष्ट प्रमाणात मिश्रण केले जाते. वाळूचे प्रमाण अगदीच नगण्य असते आणि खडीचा आकार थोडासा मोठा असतो. त्यामुळे काँक्रीटमध्ये अंदाजे २० टक्के पोकळी निर्माण होते. ज्यामधून पाणी झिरपण्यास जागा मिळते. साधारणतः एक चौरस मीटर जागेमधून प्रती मिनिटाला २०० लीटर पाणी जमिनीत मुरवता येते. भूस्तरानुसार हे प्रमाण थोडेफार बदलत असते. भूजल वाढल्याने भूस्तराची झीज, स्खलन, तापमान कमी होते. असे काँक्रीट पोकळ असले तरी मिक्स डिझाईनच्या मदतीने ताकदवान बनवता येते.

इमारतीचे पार्किंग, कोर्टयार्ड, उद्यानांमधील जॉगिंग ट्रॅक, स्विमिंग पूल डेक, ड्राईव्ह वे, रस्त्याची साईड पट्टी अशा अनेक ठिकाणी सच्छिद्र काँक्रीट करणे भविष्यातील उत्तम पर्याय असणार आहे. देशातील शहरे खऱ्या अर्थाने स्मार्ट बनवण्यासाठी बांधकाम क्षेत्रातील नवनवीन बदलांचा स्वीकार आपण करायला हवा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com