मानवी मूल्यांचे संस्कार आवश्‍यक

ज्येष्ठ विचारवंत डॉ. आ. ह. साळुंखे आज (ता.१४) वयाच्या ८१ व्या वर्षात पदार्पण करीत आहेत. त्यानिमित्त त्यांच्याशी ‘सकाळ’ने साधलेला संवाद.
Ah Salunkhe
Ah Salunkhesakal

ज्येष्ठ विचारवंत डॉ. आ. ह. साळुंखे आज (ता.१४) वयाच्या ८१ व्या वर्षात पदार्पण करीत आहेत. त्यानिमित्त त्यांच्याशी ‘सकाळ’ने साधलेला संवाद.

प्रश्न : तुम्ही वेगवेगळ्या विषयांवर लेखन, संशोधन केले. हे विषय समजून घेण्यासाठी काय केले पाहिजे?

उत्तर : आपल्याला एखादा विषय समाजापुढे ठेवायचा असेल, तर त्यासाठी मला स्वतःला काही गोष्टी महत्त्वाच्या वाटतात. अगदी पहिली अट म्हणजे आपण तो विषय नीट समजून घेतलेला असावा. आपला अभ्यास नाही, जो विषय आपल्याला समजलेला नाही आणि घाईघाईने आपण त्याबाबत समाजाला काही मार्गदर्शन करण्याच्या आविर्भावात मांडणी केली, तर तो उथळपणा ठरतो. त्याला विश्‍वसनीयता राहत नाही.

विषय समजून घेण्यासाठी त्या विषयाशी संबंधित ग्रंथांचे वाचन, त्या क्षेत्रातील तज्ज्ञांशी चर्चा, त्याबरोबरच आपल्या विषयाशी संबंधित अशा महत्त्वाच्या स्थळांना भेटी देणे, त्या विषयाचा ज्या सर्वसामान्य लोकांवर परिणाम होणार असतो, त्यांच्या सहवासात राहणे आणि ज्यांच्यासाठी विषयाची मांडणी करायची आहे, त्यांना समजेल अशा भाषेमध्ये विषय मांडण्याची शैली वापरणे, अशा काही गोष्टी करण्याची गरज असते. मी ज्या -ज्या विषयांवर लेखन केले, त्याबाबतीत मी ही काळजी घेण्याचा शक्य तितका प्रयत्न केला आहे.

सध्याच्या तरुण पिढीने कोणता आदर्श डोळ्यांसमोर ठेवावा?

उत्तर : तसे पाहिले तर वेगवेगळ्या क्षेत्रातील असंख्य व्यक्ती प्राचीन काळापासूनच आपल्या समाजाला चांगली दिशा दाखवण्याचे काम करीत आले आहेत. मी येथे त्यांच्यापैकी ह्युएन त्संग या भारतात आलेल्या चिनी प्रवाशाचे काही उद्‌गार आजच्या तरुण पिढीपुढे ठेवू इच्छितो. ह्युएन त्संग भारताकडे येण्यासाठी निघाले, तेव्हा त्यांना चिनी सम्राटाची प्रवासासाठी परवानगी नव्हती. तरीही ते जिज्ञासेपोटी प्रवासाला निघाले.

सैन्य तुम्हाला पकडून नेईल, अशी भीती त्यांच्या वाटाड्याने व्यक्त केली तेव्हा ते त्याला म्हणाले होते की, ‘त्यांनी माझ्या शरीराचे धुळीच्या कणांइतके लहान तुकडे केले, तरी चालेल; परंतु मी माझे उद्दिष्ट पूर्ण झाल्याशिवाय कधीच परतणार नाही.’ उद्दिष्ट प्राप्त करण्यासाठी आपल्या तरुण पिढीमध्ये असा निर्धार, चिकाटी आणि निष्ठा असायला हवी, असे मला वाटते.

जागतिकीकरणाबाबत नव्या पिढीने कोणती भूमिका घ्यावी, असे तुम्हाला वाटते?

उत्तर : जागतिकीकरण ही एक इष्टापत्ती आहे. जागतिकीकरणामुळे मानवजातीला अनेक दुष्परिणाम भोगावे लागत आहेत. आर्थिक विषमता हा त्यापैकी एक अतिशय घातक परिणाम आहे. पृथ्वीसमोरच धोका निर्माण करणारे प्रदूषण हाही प्रकार आता अगदी आपल्या कंठाशी आला आहे. माणसाचे माणूसपण हरवून तो एक यंत्र बनणे, वापरण्याची वस्तू बनणे, हे देखील अतिशय क्लेशकारक आहे.

असे असले तरी जागतिकीकरणासारख्या घटकांकडे तरुणांनी केवळ नकारात्मक दृष्टीने पाहू नये वा त्यांची उपेक्षा करू नये. या घटकांमुळे जगात कोठेही जाऊन कर्तृत्व गाजविण्याच्या संधी उपलब्ध झालेल्या आहेत. त्या संधींचा लाभ घेण्यासाठी तरुणांनी सज्ज झाले पाहिजे. कष्टाला पर्याय नाही, हे ओळखले पाहिजे. वेगाने येणारे नवे संशोधन आत्मसात केले पाहिजे. विविध प्रकारची कौशल्ये प्राप्त केली पाहिजेत.

जगाच्या पाठीवर कोठेही जाण्याची तयारी ठेवली पाहिजे. या मार्गाने त्यांना अत्युच्च यश प्राप्त करता येईल; परंतु बेभान होऊन केवळ यशाच्या पाठीमागे धावण्याच्या नादात त्यांनी गैरवाजवी ताणतणाव मात्र ओढवून घेऊ नयेत. त्यासाठी त्यांनी आपल्यावर मानवी मूल्यांचे संस्कार करून घेतले पाहिजेत. अशा संस्कारांमुळेच अपयश कसे पचवावे, एवढेच नव्हे तर यश कसे पचवावे, याचे भान प्राप्त होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com