- पं. हृदयनाथ मंगेशकर‘शिवकल्याण राजा’ हा एक सांगीतिक प्रयोग पंचावन्न वर्षांपूर्वी लता मंगेशकर यांच्या मार्गदर्शनाखाली हृदयनाथ मंगेशकर यांनी केला होता. शिवजयंतीनिमित्त त्या सर्जनशील अनुभवाची हृद्य आठवण..जी प्रजा इतिहास विसरते, ती आपला भूगोलही गमावते. आपला भूगोल गमावणे म्हणजे पुन्हा परकी आक्रमणे, पुन्हा देश गुलामगिरीत ढकलणे, पुन्हा दारिद्र्य ओढवून घेणे, पुन्हा निष्पाप प्राणांची आहुती देणे आणि पुन्हा रणसंग्राम होणे...जर अवकाशासारखे थोर, मुक्त स्वातंत्र्य आपणास मिळालेले आहे तर ते टिकवले पाहिजे. त्यासाठी काय केले पाहिजे?तर सर्वप्रथम ज्या राजाने आपले स्वराज्य घडविले त्यांचे स्मरण केले पाहिजे. त्या राजा शिवछत्रपतींना आठवले पाहिजे, वंदिले पाहिजे. त्यांचा आदर्श मनात ठेवून आयुष्य जगले पाहिजे या उद्दिष्टाने पंचावन्न वर्षांपूर्वी ‘शिवकल्याण राजा’ हा एक सांगीतिक प्रयोग लतादीदीच्या मार्गदर्शनातून मी केला होता..पारतंत्र्याच्या शृंखलांनी जखडलेला मराठी मुलूख मुक्त करून इथल्या मातीत स्वातंत्र्याचा पहिला सुगंध निर्माण करणारे, मराठी जनतेस स्वराज्य अर्पण करणारे युगप्रवर्तक राजा छत्रपती शिवराय! आणि द्रष्टे कवी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी शिवरायांबद्दल ‘हे हिंदू शक्ती संभूत दीप्तितम तेजा’ हे श्रेष्ठ काव्य लिहिले होते.वीर सावरकरांनी ही संस्कृतप्रचुर जोशपूर्ण अद्भूत काव्यरचना रचून शिवरायांना मानवंदना दिली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांना समर्पित वीर सावरकरांनी रचलेले, हे ओजस्वी आणि स्फूर्तिदायक काव्य हिंदू राष्ट्राच्या कल्पनेचा पुरस्कार करत शिवाजी महाराजांना संकटमोचक नृसिंह रूपातील अधिपती मानून वंदन करते..समजण्यांस अत्यंत कठीण असे हे काव्य ‘शिव कल्याण राजा’ या सांगीतिक प्रकल्पासाठी निवडले होते. शिवरायांचे आठवावे रूप। शिवरायांचा आठवावा प्रताप। शिवरायांचा आठवावा साक्षेप। भूमंडळी... असे गौरवोद्गार समर्थ रामदासस्वामींनी राजा छत्रपतींबद्दल काढले होते. काव्याची तीच दीप्ती या गीतात परावर्तित होते..हे हिंदुशक्ति-संभूत-दीप्ततम-तेजाहे हिंदुतपस्या-पूत ईश्वरी ओजाहे हिंदुश्री-सौभाग्य-भूतिच्या साजाहे हिंदु नृसिंहा प्रभो शिवाजीराजाया पहिल्या चार पंक्तींमध्ये आलेल्या संस्कृत शब्दांमुळे छत्रपतींची मुख प्रतिमा सूर्याच्या तेजासम तळपताना दिसते. वीर सावरकर संस्कृतप्रचुर गीते लिहायचे, कारण संस्कृत भाषेवर त्यांचे प्रभुत्व होते. त्यामुळे त्यांच्या काव्यातून संस्कृत शब्द सहज विलसायचे..या वंदनेत पहिल्या कडव्यात ते लिहितात, हिंदूंच्या सामूहिक शक्तीतून निर्माण झालेले, अत्यंत प्रखर, प्रकाशमान आणि उर्जान्वित तेज असलेले, हिंदूंच्या दीर्घ तपस्येतून निर्माण झालेले, पवित्र ईश्वरी सामर्थ्य आणि ओज ल्यालेले, हिंदूंना मिळालेले सौभाग्य, समृद्धी आणि वैभवी अलंकार लेवून, दुष्टांचा संहार करणाऱ्या नृसिंह अवताराप्रमाणे, हिंदूंचे रक्षण करणारे हे प्रभु शिवाजी महाराज, तुम्हास आमचे वंदन.‘हे हिंदुशक्ति-संभूत-दीप्ततम-तेजा’’ या मंगलाचरणातील उद्घोषातून शिवाजी महाराजांना हिंदू समाजाच्या एकत्रित शक्तीचे मूर्तिमंत, तेजस्वी प्रतीक म्हणून वंदन केले आहे. ‘‘तपस्या-पूत’’ म्हणजे कठोर तपसाधनेने पवित्र होऊन ईश्वरी ओज प्राप्त असे शिवराय होते..अशा अद्वितीय शब्दयोजनेतून छत्रपतींच्या जीवनातील संयम, धर्मनिष्ठा आणि ईश्वरनिष्ठ कर्तृत्व वीर सावरकरांनी अधोरेखित केले आहे. छत्रपतींबद्दल ‘हिंदुनृसिंह’ ही उपमा सर्वप्रथम सावरकरांनी उद्गारली आहे हे लक्षात घ्यावे. आपल्या संस्कृतीत नृसिंह अवतार जसा अधर्मविनाशासाठी प्रकटतो, तसा शिवाजी महाराजांचा अवतार परकीय दडपशाही नष्ट करण्यासाठी झाला होता, असा भावार्थ यातून स्पष्ट होतो..या काव्यातील दुसऱ्या कडव्यात ते लिहितात,हा भग्न तट असे गडागडाचा आजीहा भग्न आज जयदुर्गं आंसवांमाजीही भवानिची ह्या पुन्हा गंजली धाराती म्हणुनि भवानी दे न कुणा आधारागड कोट जंजिरे सारे। भंगलेजाहलीं राजधान्यांची। जंगलेंपरदास्य-पराभविं सारीं। मंगलेंया जगतिं जगू हीं आज गमतसें लज्जाहे हिंदु-नृसिंहा प्रभो शिवाजीराजा.येथे ‘भग्न तट’, ‘गंजलेली धारा’, ‘जंगलें झालेल्या राजधानी’ या प्रतिमा, अलंकार, उपमा केवळ वास्तूंसाठी नाही; ती राष्ट्राच्या खचलेल्या आत्म्यासाठी आहेत. मराठी राज्याची त्याकाळातील ही दृश्ये करुण आहेत. कीव आणणारी आहेत. ‘परदास्य-पराभविं सारीं मंगलें’ अर्थात स्वातंत्र्यहरणामुळे मंगलत्वच नष्ट झाले आहे.हे कोण जाणू शकतं? मातृभूमीविषयी अत्यंत करुणाभाव ज्यांच्या मनात निर्माण होतो तेच हे जाणतात. त्याचबरोबर हृदयात जाज्वल्य अभिमान स्वराज्याबद्दल वास करतो अन् स्वतःस प्रश्न पडतो, मनात अपमानाची जाणीव नष्ट झालीय की काय? अशा स्वत्व हरवलेल्या समाजास पुनश्च शिवरायांची स्मृती होणे आवश्यक आहे. असे वीर सावरकर या गीतातून सांगतात. तिसऱ्या कडव्यात ते लिहितात,.जी शुद्धि हृदाची रामदासशिर डुलवीजी बुध्दि पांच शाहींस शत्रुच्या झुलवीजी युक्ति कूटनीतींत खलांसी बुडवीजी शक्ति बलोन्मत्तास पदतलीं तुडवीअर्थात यात ते सांगतात, समर्थ रामदासस्वामींसारख्या ईश्वरतुल्य गुरुंसमोर त्यांचे हृदय छत्रपती शिवराय मोकळे करत असत. त्यांच्याशी हितगूज करून ते सांगतील ती गुरूआज्ञा प्रमाण मानत..या पंक्तींतून ते मांडतात, ज्या काळी स्वातंत्र्याचा विचार करणंही जीवघेणं ठरायचं, त्या काळी पाच पातशाह्यांना तोंड देत हिंदवी स्वराज्याला स्वतःचं सिंहासन बहाल केलं ते छत्रपती शिवाजी महाराजांनी. सुमारे ३०० वर्षे महाराष्ट्र पारतंत्र्यात, गुलामगिरीत खितपत पडला होता.दिल्लीचे मुघल, आदिलशाह, निजामशाह, कुतुबशाह यांच्या अत्याचाराने इथली गरीब जनता भरडली जात होती. साम्राज्यवादाने झपाटलेल्या सुलतानी आक्रमणांमुळे इथली घरे-दारे, पीक-पाणी, बायका-पोरी सुरक्षित नव्हत्या. ती परिस्थिती शिवाजीराजांनी बदलली होती. धर्मशुद्धी, राजकारणातील बुद्धिमत्ता, रणनीतीतील कौशल्य आणि रणांगणातील पराक्रम हे शिवछत्रपतींचे गुण आठवणे आजही आवश्यक आहे..ती शुध्दि हेतुचि कर्मी। राहु देती बुध्दि भाबडया जीवां। लाहु देती शक्ती शोणितामाजी। वाहु देदे पुन्हा मंत्र तो दिलें समर्थे तुज ज्याहे हिंदु नृसिंहा प्रभो शिवाजीराजा।शुद्ध हेतूने केलेले कर्म राहू दे, भाबड्या जिवास बुद्धी लाभू दे, मातृभूमीसाठी रक्तरंजित पराक्रम करण्याची शक्ती या समाजास वाहू दे..‘दे पुन्हा मंत्र तो दिलें समर्थे तुज ज्या’...येथे अप्रत्यक्षपणे समर्थ रामदास यांच्या कृपामंत्राची आठवण होते. समर्थ रामदासांनी दिलेला आत्मविश्वास, राष्ट्रधर्म आणि स्वराज्याचा मंत्र आजही समाजाला हवा आहे, असे या काव्यातून कळते. नृसिंह अवतार असल्याप्रमाणे हे शिवराय आपल्या मातृभूमीस लाभले त्यांना वंदन असो. स्वाभिमान, शौर्य आणि धर्मनिष्ठेचे प्रतीक म्हणून हे गीत आपण गायले पाहिजे आणि युवा पिढीस शिकवले पाहिजे..या गीतास संगीतबद्ध करून आजमितीस पंचावन्न वर्षे झाली. त्या वेळी माझे वय तिशीत होते. हे गीत खुद्द सावरकरांनी निवडून दिले होते. बाबासाहेब पुरंदरेंसारखे थोर दृष्टे इतिहासकार आणि लतादीदी यांच्या साक्षीने, मार्गदर्शनाने हे काव्य समजून घेणे माझ्यासाठी सोपे झाले होते.आज इतक्या वर्षानंतरही या गीताची लोकप्रियता जराही ढळली नाही ही तो श्रींची इच्छा! लतादीदींच्या स्वरांची पवित्रता, सावरकरांच्या शब्दांतील वीरता आणि छत्रपतींची ओजस्विता यामुळे हे गीत वंदनीय झाले आहे, याचे श्रेय मी स्वतःकडे कसे घेऊ? यह तो उनकी इनायत, उनका करिष्मा!.सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.