फरक पडतो!

sonali navangul
sonali navangul

‘सोनी’ नावाचा सिनेमा बघत होते. तेच ते ताण. दमन, दमणूक, दबाव. अंधारं गुन्हेगारी जग. त्यातून व खासगी त्रासातून वैतागलेली, नव्यानं पोलिस यंत्रणेत दाखल झालेली सोनी. पोलिस सुपरिटेंडंट असणारी अनुभवी, शहाणी कल्पना आपल्या हाताखालच्या, भडक माथ्याच्या, पण मनानं चांगल्या असलेल्या सोनीला भेटायला तिच्या घरी येते. कल्पना अधिकारी असली तरी, तिला आपल्या सहकाऱ्याची अस्वस्थता कळते. त्यातून निपजणारा अविश्‍वास कळतो. खुजं वाटत जाणं कळतं. घरच्यांना द्यायला नि स्वत:चं दुखलंखुपलं बघायला वेळ नाही, तर वाचणं नि कलाबिला पाहून स्वत:ला उजळवत ठेवणं कुठनं आलंय इथे! मात्र कल्पना सोनीला भेटायला येते नि तिला ‘रसिदी टिकट’ हे अमृता प्रीतमचं पुस्तक देते नि सांगते,‘ राजीनामा देऊ नकोस!’ सोनी बघते नि खिन्न होत म्हणते, ‘मी या सिस्टिममध्ये राहिले, नाही राहिले, तरी कुणाला काय फरक पडणारे?’ तेव्हा कल्पना सांगते, ‘अमृतानं आत्मकथन लिहायला घेतल्यावर तिला कुणी प्रसिद्ध लेखकानं म्हटलं होतं, की तुझ्या आयुष्यात लिहिण्यासारखं आहे तरी काय? हे सगळं ‘रसिदी टिकट’वरसुद्धा लिहिता येईल.’ पुढे ते सगळं स्वत:शी जोडत कल्पना सांगते, ‘माझी एक भाची आहे, तेरा वर्षांची. आज ती म्हणाली की तिला वर्गातल्या मुलांना गोळी मारून उडवावं वाटतं. त्या मुलांनी काहीतरी घाणेरडी चेष्टा केली तिची. ती दु:खी नि रागात होती. तिला चुचकारलं. समजावलं. काही फरक पडेल का माहिती नाही, पण तिला मिठीत घेतलं!’

‘दिल्ली क्राइम’ सीरिज बघताना त्याहून भयंकर काहूर माजणं साहजिक होतं. पहिले तीन भाग बघून झोपले, तेव्हा वाटलं की पीडित मुलीच्या हॉस्पिटलमधल्या खोलीबाहेर बसून मी तिच्या हृदयाची धडधड ऐकतेय. तिच्या श्‍वासांचा अनियमितपणा अनुभवतेय. कशाला तिथला ताणतणाव ओढवून घेतला मी, असंही वाटलं क्षणभर. मात्र पुढचे भाग बघून काढल्यावर दिसलं, की कुणा दुसऱ्याच्या आयुष्यात चांगलं व्हावं, न्याय मिळावा म्हणून कमी-जास्त कुवतीची, श्रेणीची, बरी-वाईट वागणारी माणसं इतक्‍या एकजुटीनं, रात्रंदिवस जागताहेत, धावताहेत, उपाशी राहून समोरच्याच्या भुकेची काळजी करताहेत. आपण मूर्खपणानं केवळ घटनेचा ताणच वाहून नेतोय. त्यातून जमून आलेलं चांगुलपण बिनमहत्त्वाचं कसं बरं असू शकेल? एखादी मोठी घटना-दुर्घटना घडते, त्या आसपास बरंच काही उगवत, मिटत असतं. त्यातून जगण्याचं हरितद्रव्य घेता येतंच की. दिलासे मिळत राहातात. खचूनच जावं अशा वेळा कुठं टळतात? मात्र त्याच काळात आपल्या आसपास कुणी असतात, जे नकळत आपल्या निरूत्तर वेळी, हातात हात धरून फिरायला नेतात. कसल्याही उल्लेखाविना. फरक पडतोच!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com