साहित्य झोपलं... संस्कृती जागली...

उदगीरमधलं बहुचर्चित ९५ वं अखिल भारतीय साहित्य संमेलन एकदाचं पार पडलं. नाशिक येथील साहित्य संमेलनाचं कवित्व संपत नाही, तोपर्यंत उदगीरचं साहित्य संमेलन सुरूही झालं.
साहित्य झोपलं... संस्कृती जागली...
Summary

उदगीरमधलं बहुचर्चित ९५ वं अखिल भारतीय साहित्य संमेलन एकदाचं पार पडलं. नाशिक येथील साहित्य संमेलनाचं कवित्व संपत नाही, तोपर्यंत उदगीरचं साहित्य संमेलन सुरूही झालं.

उदगीरमधलं बहुचर्चित ९५ वं अखिल भारतीय साहित्य संमेलन एकदाचं पार पडलं. नाशिक येथील साहित्य संमेलनाचं कवित्व संपत नाही, तोपर्यंत उदगीरचं साहित्य संमेलन सुरूही झालं. अवघ्या चार महिन्यांचा अवधीत साहित्य संमेलन भरविण्याचा अट्टहास कशासाठी केला, याचं समर्थनीय उत्तर अखिल भारतीय साहित्य महामंडळाला देता आलेलं नाही. संमेलनातील एकंदर स्थिती पाहता अलीकडील काळात इतक्या कमी कालावधीत अशा संमेलनाची खरोखर आवश्यकता होती का, असा प्रश्न पडावा अशी स्थिती जाणवली. उदगीरकरांनी मात्र त्यांच्या परंपरेप्रमाणे आलेल्या साहित्य रसिकांची तारांबळ उडणार नाही, याची काळजी घेतली. साहित्यिक कार्यक्रमांपेक्षा साहित्यबाह्य कार्यक्रमांना काकणभर जास्त असलेल्या उपस्थितीमुळे साहित्य झोपले... संस्कृती जागली अशी परिस्थिती होती.

हल्ली कोणत्याही चित्रपट क्षेत्रातील पुरस्कार कार्यक्रमात ‘कथाबाह्य विभाग’ यासाठी स्वतंत्र पुरस्काराची नामावली असते. तोच निकष अखिल भारतीय साहित्य संमेलनासाठी लावायचा झाल्यास ‘साहित्यबाह्य’ साहित्य संमेलन म्हणून उदगीर येथील संमेलनाची निवड निश्चितच होईल.

एकेकाळी एखाद्या शहरात साहित्य संमेलन असलं की, त्या शहराला एखाद्या उत्सवाचं रूप यायचं. लोकसहभाग उत्स्फूर्त असायचा आणि त्यामुळे उत्साह दांडगा असायचा. परिणामस्वरूप ते शहर सहजच साहित्यनगरी बनायचं! साहित्यिक आणि वाचक यांचा एक अनुबंध मांडला जायचा. हा उत्साह उदगीरकरांमध्ये होताच; परंतु तो केवळ राजकीय पातळीवर दिसला. मराठी साहित्याला मोठी परंपरा आहे. या परंपरेची सुरुवात थेट संत साहित्यापासून सुरू होते. काळ बदलत गेला त्याप्रमाणे साहित्यही बदलत गेलं. आपल्या आसपास असणाऱ्या सामाजिक परिस्थितीचं प्रतिबिंब साहित्यात स्वाभाविकपणे उमटायला लागलं, त्यातून साहित्यिक निर्माण होऊ लागले. असे सगळे साहित्यिक, त्यावर प्रेम करणारे वाचक यांचं एकत्र येणं गरजेचं झालं आणि त्यातून साहित्य संमेलनाची मुहूर्तमेढ रोवली गेली. साहित्य संमेलनातील सर्वांत मोठी अपरिहार्यता म्हणजे अध्यक्षपदाची निवड. सध्याच्या काळात थेट निवड होत असल्याने त्यातील वाईट पायंडे आणि राजकारण यांना खीळ बसली आहे.

संमेलन की राजकीय मेळावा

उदगीर येथील साहित्य संमेलन हे साहित्य संमेलन कमी आणि राजकीय मेळावा असल्याचं जाणवलं. उद्‍घाटन आणि समारोप सत्रात तर याचा जास्त प्रत्यय आला. दोन्ही कार्यक्रमांना व्यासपीठावर साहित्यिकांची संख्या अत्यल्प होती. उद्‍घाटनाच्या सत्रात उद्‍घाटक आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी साहित्यिक आणि राजकारणी याबद्दल परखड मत व्यक्त केलं. साहित्य रसिकांच्या सहकार्याशिवाय साहित्यरथ धावणार नाही असं सांगत असताना या रथाची लोकाश्रय आणि राजाश्रय ही दोन चाकं असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.

‘साहित्यिकांच्या हाती राज्यकर्त्यांवरील अंकुश हवा; परंतु राज्यकर्त्यांच्या हाती साहित्यिकांचा रिमोट कंट्रोल असू नये, साहित्यिकांनी राज्यकर्त्यांच्या ओंजळीने पाणी पिऊ नये. साहित्यिकांमध्ये आणि राज्यकर्त्यांमध्ये परस्पर समन्वयाचं आणि स्नेहभावाचं नातं असावं. हस्तिदंती मनोऱ्यातील साहित्यात सामर्थ्य नसतं, जर ते समाजाभिमुख असेल तर त्यात शक्ती येते,’ हे पवार यांनी भाषणातून सांगितलेलं सूत्र खरोखरच आचरलं जाणार का, हा प्रश्न पडतो. समारोप सत्रातही गडकरी यांनी साहित्य, संस्कृती ही क्षेत्रं राजकारणापासून मुक्त असावी ही व्यक्त केलेली अपेक्षा भावीकाळात प्रत्यक्षात येणार की नाही हा प्रश्न आहे. निदान यापुढील संमेलनातून तरी महामंडळाने याचं भान ठेवायला हरकत नाही.

परिसंवादाचे विषय आणि बाल साहित्य

परिसंवादातील विषयांवर ओझरती नजर टाकली, तरी काही विषय आणि भ्रामकता लक्षात येते. ‘प्रसारमाध्यमांची विश्वासार्हता आज शून्यावर आली आहे’ हा विषय महामंडळाची वैचारिक दिवाळखोरी स्पष्ट करणारा होता. वास्तविक याच परिसंवादाला अन्य परिसंवादांपेक्षा जास्त गर्दी होती, हे विशेष. बालसाहित्याच्या दृष्टीने विशेष लक्ष दिलं ही बाब साहित्य संमेलनातील उल्लेखनीय आहे. निमंत्रितांच्या बाल कविसंमेलनासह बालकांचं कथाकथन, बालवाचन : काही उपाययोजना, बाल कादंबरी वाचन, बालसाहित्यकारांशी संवाद हे विषय लक्षवेधक होते. बालसाहित्य विषयावरील जाणीव यानिमित्ताने अधोरेखित झाली. सगळ्या विषयांवर परिसंवाद होते; पण सकस साहित्यनिमिर्तीबाबत चर्चा होणारा कुठलाही परिसंवाद संमेलनात ठेवला गेला नाही, हे आश्‍चर्यच म्हणावं लागेल.

साहित्यबाह्य कार्यक्रम आणि प्रतिसाद

संमेलनाला उदगीरकरांनी खरोखरच चांगला प्रतिसाद दिला. ग्रामपंचायतीच्या हद्दीत होणारं कदाचित हे एकमेव साहित्य संमेलन असावं. बहुचर्चित लातूर पॅटर्नचा मूळ स्रोत उदगीरच आहे. या शहराला शैक्षणिक परंपरा आहे, त्याचं प्रतिबिंब संमेलनात दिसलं. संमेलनातील तीनही दिवसांतील परिसंवादासह ग्रंथ प्रदर्शन, चित्र प्रदर्शनाला चांगला प्रतिसाद होता. परंतु संमेलनाच्या दोन दिवस अगोदर झालेल्या सांस्कृतिक कार्यक्रमांना भरभरून प्रतिसाद होता. या सर्व संमेलनात खटकलेली बाब म्हणजे, मान्यवर साहित्यिकांची अनुपस्थिती. ती का होती, याचा स्वागत समितीसह साहित्य महामंडळाने शोध घेतला पाहिजे. एरव्ही अभ्यासाच्या पुस्तकातून वाचायला मिळणारे लेखक प्रत्यक्ष भेटण्याची संधी फार मिळू शकली नाही, याची उदगीरकरांना जरूर खंत असेल. ‘महाराष्ट्र महोत्सव’ या लोककलेच्या कार्यक्रमाच्या वेळी साहित्यिकांनी काढता पाय घेतला. लोककलावंतांच्या या कार्यक्रमाला उदगीर परिसरातील लोककलेची जाण असणाऱ्या रसिकांनी दाद देत सबंध महाराष्ट्राच्या पारंपरिक लोककलांचा आस्वाद घेतला. मात्र, साहित्यिकांनी याकडे पाठ फिरवल्याने कलावंत व रसिकांनी व्यक्त केलेली नाराजी विचार करायला लावणारी आहे.

वाद आणि प्रतिवाद

साहित्य संमेलन आणि वाद नाहीत असं चित्र आता नाही. संमेलनाच्या उद्‍घाटन सत्रातील प्रमुख पाहुणे असलेले ज्ञानपीठ विजेते लेखक दामोदर मावजो यांच्या उपस्थितीवरून वाद निर्माण झाला. त्यावर महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले यांनी भूमिका स्पष्ट केली. परंतु, त्यावर मावजो यांनी गोव्याला साहित्य संमेलन भरवतो, तुम्ही सांगा, असं थेट सांगत वादावर सणसणीत उत्तर देत साहित्य आणि भाषा यांचं नातं उलगडलं. साहित्य संमेलन म्हटलं की, त्यात साहित्यबाह्य राजकीय टीका झालीच पाहिजे असं जणू समीकरण झालं आहे. संमेलनाध्यक्ष भारत सासणे यांनी पंतप्रधान मोदी यांचं नाव न घेता टीका केली. त्याचे पडसाद उमटले नसते तर नवल.

संमेलनाचं फलित

अशी संमेलनं खरंतर सकारात्मक ऊर्जा निर्माण करणारी असावीत, समाजाला भ्रमित, भयग्रस्त करणारी नसावीत; परंतु दुर्दैवाने अशी संमेलनं नकारात्मक आणि विरोधाला विरोध करणारी ठरतात, तेव्हा ती संमेलनं, ते साहित्यिक आणि त्यांचं साहित्य समाज आणि त्यांच्यात अंतर निर्माण करतं. अशावेळी स्थानिक लोकप्रतिनिधींच्या जिवावर राजकीय अधिवेशनात असते तशी गर्दी खेचून आणावी लागते. त्यात उत्स्फूर्तता मागे पडते आणि उरते ती औपचारिकता. याच पद्धतीने बदलत्या सामाजिक विमर्षाचा विचार न करता साहित्यिक आणि त्यांच्या सहकाऱ्यांकडून अशी संमेलनं भरवली जाणार असतील, तर समाज पूर्णपणे या प्रायोजित कार्यक्रमांवर बहिष्कार टाकेल आणि साहित्य संमेलनं कालबाह्य होतील! याचा विचार मराठी साहित्य महामंडळाने करण्याची गरज आहे, नव्हे करायलाच पाहिजे. महामंडळाने साहित्यविषयक निखळ हेतूंवर चर्चा करणं जास्त उचित राहील, तसा पायंडा पाडण्याची किमान मानसिकता तरी अवश्य ठेवली पाहिजे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com