दिशादर्शक सकाळ

आजच्या दिवशी आपण सारेच परस्परांना नव्या वर्षाच्या शुभेच्छा देतो; येते वर्ष सुखात जावे, अशी इच्छा व्यक्त करतो. जीवनात शांती, मैत्री, सहयोग आणि त्याद्वारे सुख यावे, अशी प्रार्थना करतो.
Abhijit Pawar
Abhijit PawarSakal
Summary

आजच्या दिवशी आपण सारेच परस्परांना नव्या वर्षाच्या शुभेच्छा देतो; येते वर्ष सुखात जावे, अशी इच्छा व्यक्त करतो. जीवनात शांती, मैत्री, सहयोग आणि त्याद्वारे सुख यावे, अशी प्रार्थना करतो.

आजच्या दिवशी आपण सारेच परस्परांना नव्या वर्षाच्या शुभेच्छा देतो; येते वर्ष सुखात जावे, अशी इच्छा व्यक्त करतो. जीवनात शांती, मैत्री, सहयोग आणि त्याद्वारे सुख यावे, अशी प्रार्थना करतो. ‘सर्वे भवन्तु सुखिनः सर्वे सन्तु निरामया...’, हा भारतीय संस्कृतीचा शांतीपाठ. सुखी जीवन हवे असेल, तर मनःशांती हवी. ती नसेल, तर केवळ शुभेच्छांनी जीवन सुखी होणार नाही. असे जीवन साध्य करायचे असेल, तर आज आपण जे ठरवू, त्यावर पुढील वाटचाल अवलंबून असणार आहे. त्यासाठी जीवनात, समाजात दिशादर्शकाची आवश्यकता असते. माझी अशी प्रामाणिक भावना आहे, की ‘सकाळ’ हा या दिशादर्शकाच्या भूमिकेत आहे. संस्कृतीतील चांगले ते निवडणे, त्याज्य ते टाकून देणे आणि समाजाला उज्ज्वल भविष्याच्या वाटेवर नेणे हे दिशादर्शकाचे काम आहे. स्वाभाविकपणे संस्कृती, इतिहास आणि वर्तमानाची सतत निरपेक्षबुद्धीने चिकित्सा करत राहणे हेही दिशादर्शकाचेच काम आहे.

नवी भारतीय व्यवस्था (Indian system)

आपण भारतीय लोकशाही व्यवस्थेत राहतो. या व्यवस्थेचे चार स्तंभ आहेत आणि व्यवस्थेतील त्रुटींचा आपण सारे अनुभव घेत असतो. आपल्या एकूण वर्तमान व्यवहारांवर पाश्चिमात्य जगताचा विलक्षण प्रभाव आहे. पाश्चिमात्य ते सारे उत्तम, अशी आपली समजूत आहे. परिणामी, आपण अनेक व्यवस्था जशाच्या तशा स्वीकारल्या. त्यामधील त्रुटी दूर करून आपण आपली नवी व्यवस्था आणू शकतो का, आपली नवी व्यवस्था आपल्याला अधिक समृद्ध बनवू शकेल का, यादृष्टीने आपण विचार केला पाहिजे. समाज म्हणून आपण सारे त्यामध्ये प्रमुख भूमिका बजावू, अशी माझी धारणा आहे. भारतीय बुद्धिमत्तेचे जगभरात कौतुक होत आहे. जगातील बलाढ्य कंपन्यांचे ‘सीईओ’ भारतीय असल्याचे कौतुकाने सांगितले जात आहे. पाश्चिमात्य जगाला जे हवे, ते देण्यासाठी आपण ती शिक्षण व्यवस्था स्वीकारली आणि त्यांना हवे ते देत आहोत, म्हणून आपले कौतुक होत आहे का, याचा आपण विचार केला पाहिजे. भारतासाठी, भारतीयांसाठी आपण काय नावीन्यपूर्ण संकल्पना (इनोव्हेशन) आणतो आहोत, हे आपण तपासले पाहिजे.

खुली चर्चा; वादविवाद (Open discussion, debate)

आपल्या संस्कृतीच्या, अगदी नेमके सांगायचे, तर आपल्या कालातीत आद्य संस्कृतीच्या दृष्टिकोनाबद्दलही आपण बोलले पाहिजे. अशा दृष्टिकोनाबद्दल ध्रुवीकरणाच्या टोकाच्या भूमिका टाळल्या पाहिजेत. ध्रुवीकरणाचे टोक गाठणाऱ्यांनाही शेवटी समाजाचे चांगले व्हावे, हीच इच्छा असते. मात्र, त्यांना चर्चा, वाद-प्रतिवाद नको असतात. मला कुटुंबाचे, समाजाचे कल्याण करायचे आहे, तर चर्चा का नको, समान मूल्यांवर आपण का येऊ शकत नाही आणि नैसर्गिक नियमांचे पालन का करायचे नाही, हे प्रश्न आहेत. आम्ही समाजाच्या कल्याणाकरिता सर्व संकल्पनांवर वाद-प्रतिवाद करू, त्या संकल्पनांना आव्हान देऊ, खुल्या मेंदूने चर्चा करू आणि सर्व प्रकारच्या विचारधारा तपासून पाहू. अंतिमतः त्यामध्ये समाजाच्या सर्वंकष भल्याचा विचार असेल. आमचा आशय (कन्टेन्ट), आमच्या बातम्या या अशा प्रकारे समाजाच्या कल्याणाचा विचार करणाऱ्या असतील. त्यामध्ये राष्ट्रीयत्वाची आणि विश्वबंधुत्वाची संकल्पना असेल. उदाहरण म्हणून चीनकडे पाहू. चीनसारखी प्रगती आम्हाला करायची आहे का? प्रगतीच्या अट्टाहासाने निसर्गाचा विध्वंस करायचा आहे का? आम्हीही तसेच वागायचे ठरवले, तर जगाचा विनाश अटळ आहे. केवळ चीनच नव्हे, सर्व जगातील चांगले ते घेऊ आणि निसर्गावर दुष्परिणाम टाळू, अशी आमची भूमिका राहील. जगाच्या प्रेरणेचा स्रोत बनण्याचे आमचे काम असेल. भौतिकता आणि अध्यात्मिकतेच्या वाटा समान बुद्धीने चोखाळणाऱ्या समाजनिर्मितीचा हा प्रयत्न असेल. असे काम करू इच्छिणाऱ्यांसाठी आम्ही सदा खुला असू. सर्व जाती, धर्म, वंश, गरीब-श्रीमंत अशा सर्वांसाठी आमचे दरवाजे, हृदय आणि बुद्धी नेहमी खुली असेल. सर्व प्रकारच्या संकल्पनांसाठी पूर्वग्रहदूषित बुद्धीशिवाय काम करणाऱ्या प्रत्येकासाठी आम्ही आहोत आणि असूही.

कृतिशील तत्त्वज्ञान (Philosophy in action)

आपल्या प्राचीन संस्कृतीतील संकल्पनांचा कुणी गैरवापर केलाही असेल; पण म्हणून सारी संस्कृती टाकावू ठरत नाही. त्याज्य मुद्द्यांवर वादविवाद घडून ते नाकारले पाहिजेत. आपल्या संस्कृतीत कुटुंब घटक केंद्रस्थानी आहे. कुटुंबाच्या केंद्रस्थानी स्त्री आहे.

स्त्रीच्या ज्ञानविस्तारासाठी, तिच्यामार्फत समाजामध्ये मूल्यव्यवस्था निर्माण करण्यासाठी आपण प्रयत्न करावे लागतील. केवळ तत्त्वज्ञान सांगून भागणार नाही; त्यासाठी कृतिशील तत्त्वज्ञान लागेल. ते काम समाज म्हणून आपण स्वीकारावे लागेल. या नव्या व्यवस्थेच्या निर्मितीची मशाल वाहून नेण्याचे काम (टॉर्च बेअरर) आम्ही करीत आहोत आणि करत राहू. भविष्याच्या पिढ्यांसाठीची आदर्श उदाहरणे आपल्याला घडवावी लागतील. शेतीचे उदाहरण घेऊ. आपण शेतीतून जे अन्न निर्माण करतो, तेच खातो आणि त्या अन्नासारखी आपली शारीरिक, मानसिक प्रकृती आणि प्रवृत्ती बनते. आपल्याला रासायनिक शेतीकडून अधिक नैसर्गिक अशा सेंद्रिय पद्धतीकडे वळावे लागेल.

आरोग्यासाठी आपल्याला आयुर्वेदाचा समृद्ध वारसा आहे. या वारशाला प्राधान्य दिले पाहिजे. आपल्या संस्कृतीच्या व्याख्येत संगीत-कला यांना अपार महत्त्व आहे. आपल्याला संगीत, कलांची संपन्न परंपरा आहे. शास्त्रीय संगीत, स्वास्थ्य संगीत आहे. या कला-संगीताला पाठबळ देणे, त्यामध्ये संशोधन करणे आणि त्याबद्दल चर्चा करणे आवश्यक आहे. भारतीय म्हणून आपली एक जीवनशैली आहे. तिच्या पुनरुज्जीवनाची नितांत आवश्यकता आहे.

समग्र जीवनचक्र (Holistic life)

आपल्याला समग्र जीवनचक्राचा विचार करून धोरणे आखावी लागतील. केवळ एखाद्याला हवे म्हणू नव्हे; तर समाजाच्या भविष्याचा विचार करणारी चर्चा घडवावी लागेल आणि निर्णय समन्वयाने घ्यावे लागतील. त्यासाठी आमच्या प्रशासकीय व्यवस्थेला अधिक सकारात्मक दृष्टी बाळगावी लागेल. समाजाच्या उन्नतीचा विचार प्रशासन व्यवस्थेच्या केंद्रस्थानी लागेल. आपले नियम-कायदे अत्यंत क्लिष्ट बनविले गेले. ही सारी व्यवस्था आपल्याला सकारात्मकतेकडे न्यावी लागेल. त्याची सुरुवात आपल्याला अगदी भारतीय प्रशासकीय सेवा (आयएएस) परीक्षांपासूनही करावी लागेल. माहितीला नव्हे; तर समग्रतेला महत्त्व देणारे प्रशासक निर्माण करणारी ही परीक्षा बनवावी लागेल. या परीक्षेला आपल्या संस्कृतीचा चेहरा द्यावा लागेल. ‘आयएएस’ म्हणजे कर्मयोगी अशी मांडणी करावी लागेल. त्यासाठी आधी योगीची संज्ञा संस्कृतीतून समजून घ्यावी लागेल. न्यायिक व्यवस्थेतही आपल्याला पुनर्विकास करावा लागेल. न्यायदान भ्रष्ट झाले, तर समाज व्यवस्था कोसळेल, याचे भान हवे. न्यायिक व्यवस्था अधिक नैसर्गिक राहावी, यासाठी त्यामध्ये सुधारणा कराव्या लागतील आणि ती व्यवस्था सुधारावी यासाठी समाज म्हणून मदत करावी लागेल.

जे दिसते केवळ तेच सत्य नसते (Not all seeing is beliving)

अंतिमतः सक्रिय आणि हुशारीने चालणारी सकारात्मक व्यवस्था आपल्याला उभी करावी लागेल. सकारात्मक आणि केवळ टीकेकडे न झुकता अशा व्यवस्थेच्या निर्मितीसाठी आम्ही काम करणार आहोत. जे दिसते तेच सत्य, असे आता राहिलेले नाही. अनेकदा हा अनुभव आपल्याला येतो आहे. अशा काळात माध्यमांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असणार आहे. जे दिसते त्यापलीकडे, अलीकडे माध्यमांना जावे लागेल. ध्रुवीकरण करणाऱ्या, फूट पाडणाऱ्या घटकांना उघडे करण्यासाठी माध्यमांना त्यांच्या कक्षेबाहेरही जावे लागेल, अशी आमची भूमिका आहे. जीवनाला उद्दिष्ट आहे आणि ते उद्दिष्ट विश्वकल्याणाचे असले पाहिजे, असा विचार त्यामागे आहे.

समाजोन्नतीचा दुवा (Role of catalyst)

मनःशांती नसेल, तर आपण सुखी कसे होणार? आपल्या प्राचीन संस्कृतीत वेद-उपनिषदे-गीतेमध्ये या सुखाची उत्तरे आहेत. ती उत्तरे आजच्या काळानुरूप सांगितली पाहिजेत. आजच्या समाजासाठी उपयुक्त बनवली पाहिजेत. प्राचीन ज्ञान वापरले पाहिजे. त्यासाठी ध्रुवीकरण, उच्च-नीच भाव साफ दूर ठेवला पाहिजे. अशाप्रकारे समाजाच्या भल्यासाठी सारी प्रक्रिया पुनःपुन्हा तपासून पाहावी लागेल. ते काम आम्ही करू. संस्कृती, व्यवहार आणि समाज यांच्यामधल्या दुव्याचे, कॅटॅलिस्टचे काम आम्ही करतो आहोत. ते काम एकट्याने होणार नाही. त्यासाठी समाजाच्या भल्याची तळमळ असलेल्या साऱ्या शक्ती एकत्र याव्या लागतील. त्या एकत्र आणण्याचे काम ‘सकाळ’ यापुढील काळातही करत राहील. अशा समाजाच्या निर्मितीसाठी वाटचाल करूया, याच नववर्षानिमित्त पुन्हा एकदा शुभेच्छा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com