जीपीएसचा इतिहास आणि ट्रॅकिंग (अच्युत गोडबोले)

achyut godbole
achyut godbole

जीपीएसमुळं आपल्याला फक्त आपलं स्थान कळतं; पण प्रत्यक्षात हालचालीची नोंद घेण्यासाठी जीपीएस ट्रॅकिंग युनिट वापरलं जातं. जीपीएस ट्रॅकिंग युनिटचा उपयोग एखादी वस्तू/व्यक्ती चालत किंवा फिरत असताना तो/ती कोणत्या वेळी कुठं आहे/होती ही माहिती साठवण्यासाठी आणि पाठवण्यासाठी होतो. जीपीएस ट्रॅकिंगच्या साह्यानं मिळालेली हालचालींची माहिती पॅसिव्ह पद्धतीत त्या सिस्टिममध्येच साठवून ठेवली जाते आणि नंतर ऍनेलिसिसकरता वापरली जाते. ऍक्‍टिव्ह पद्धतीत ती माहिती इंटरनेटवर पाठवली जाते. त्यामुळं कोणाच्याही हालचालीची ही सगळी नोंद आपण इंटरनेटवरून त्याच वेळी कुठूनही पाहू शकतो.

जीपीएसचा इतिहास खूपच रंजक आहे. अमेरिकेच्या सैन्याला मदत व्हावी या उद्देशानं जीपीएसची यंत्रणा बनवली गेली होती. दुसऱ्या महायुद्धादरम्यानच्या शीतयुद्धात आपला देश सुरक्षित ठेवण्याच्या उद्देशानं तंत्रज्ञानांत अनेक संशोधनं चालू होती. जीपीएस तंत्रज्ञानही त्याचंच एक फलित आहे. रशियानं या तंत्रज्ञानयुद्धात बाजी मारून सन 1957 मध्ये स्पुटनिक नावाचा उपग्रह अवकाशात सोडला आणि अमेरिकेचं धाबं दणाणलं. जरी हा उपग्रह छोटासा होता आणि हानिकारक नव्हता, तरी अमेरिकेनं मात्र तंत्रज्ञान संशोधनात यानंतर संपूर्ण लक्ष घालायचं ठरवलं. जॉन हॉपकिन्स विद्यापीठातल्या दोन शास्त्रज्ञांच्या एक भन्नाट गोष्ट लक्षात आली. "डॉपलर इफेक्‍ट' लक्षात घेऊन या शास्त्रज्ञांना स्पुटनिकचं अवकाशातलं स्थान आणि त्याची कक्षा लगेचच शोधता यायची. यावरून त्यांच्या डोक्‍यात एक कल्पना आली. याच कल्पनेनं जीपीएस तंत्राचा पाया रचला.

याच कल्पनेचा आधार घेऊन सन 1959 मध्ये अमेरिकन नेव्हीनं, तर सन 1963 मध्ये हवाई दलानं 6 आणि नंतर 10 उपग्रह अवकाशात सोडले. यामुळे आता रस्त्यावरची वाहनं आणि समुद्रातल्या पाणबुड्याच नाहीत, तर हवेतल्या विमानांवरही लक्ष ठेवणं शक्‍य व्हायला लागलं. या यंत्रणा जरी कार्यरत असल्या, तरी जीपीएसला खरी ओळख मिळाली ती नावस्टार सिस्टिममुळे! सन 1974 मध्ये अमेरिकन लष्करानं 11 उपग्रह सोडले आणि खऱ्या अर्थानं जीपीएस यंत्रणा सुरू झाली.
मात्र, अजून जीपीएस फक्त अमेरिकन लष्करच वापरत असे. इतर कोणी नाही. ही यंत्रणा सगळ्यांसाठी खुली होण्यासाठी एक भयंकर घटना कारणीभूत ठरणार होती. ता. 1 सप्टेंबर 1983 या दिवशी कोरियन एअरलाईन्सचं 007 फ्लाइट नंबर असलेलं एक विमान न्यूयॉर्कहून 269 प्रवासी घेऊन सेऊलला यायला निघालं. त्याकाळी विमानांत जीपीएसची यंत्रणा बसवलेली नसायची. याचं कारण ती यंत्रणा फक्त अमेरिकन लष्करच वापरायचं. हे विमान भरकटलं आणि तत्कालीन सोव्हिएत युनियनच्या प्रतिबंधित क्षेत्रात शिरलं. हे अमेरिकेचं हेरगिरी करणारं विमान आहे असं समजून सोव्हिएत युनियननं ते पाडलं. त्यातले सगळे प्रवासी मृत्युमुखी पडले. तो शीतयुद्धाचा काळ असल्यामुळे अमेरिका आणि सोव्हिएत युनियन यांच्यामध्ये अनेक आरोप-प्रत्यारोप झाले. शेवटी अमेरिकेनं जीपीएस सिस्टिम सगळ्यांना खुली करायचं ठरवलं. मात्र, यासाठी संपूर्ण पृथ्वी कव्हर करण्यासाठी कमीत कमी 24 उपग्रहांची गरज होती. मग ते तयार करण्यात काही काळ गेला. अमेरिकेनं पहिला उपग्रह 14 फेब्रुवारी 1989 रोजी सोडला, तर चोविसावा सन 1994 मध्ये सोडला. सन 1995 पासून जीपीएस तंत्रज्ञान सर्वांसाठी खुलं झालं; पण अजून ते अचूक नव्हतं. त्यात 2000पर्यंत सुधारणा होत गेल्या. सन 2000 नंतर ते जास्त अचूक होत गेलं. अमेरिकेनं आत्तापर्यंत 72 उपग्रह सोडले आहेत. त्यापैकी 2 अपयशी ठरले. उरलेल्या 70 पैकी काहीच पूर्णपणे सक्रिय आहेत. यापैकी जीपीएससाठी खरं म्हणजे आपल्याला 24 च लागतात; पण त्यातला एखादा बिघडला, तर या उरलेल्या जास्तीच्या उपग्रहांपैकी कुठला तरी कामाला येतो. या 24 उपग्रहांची रचना आणि कक्षा अशी असते, की त्यांच्यापैकी पृथ्वीवरच्या कुठल्याही ठिकाणी कुठल्याही क्षणी कमीत कमी 4 उपग्रह संदेश पाठवू शकतात.

जीपीएस प्रणाली अमेरिकन सरकारच्या नियंत्रणाखाली असल्यानं त्यांना जर वाटलं, तर ते एखाद्या देशात ही सेवा बंद करू शकतात. उदाहरणार्थ, 1999 मध्ये कारगिल युद्धात अमेरिकेनं पाकिस्तान दुखावला जाऊ नये म्हणून भारतीय सैन्याला तिथली जीपीएस सेवा वापरू देण्यासाठी बंद केली. याला उत्तर म्हणून काही मोजक्‍या देशांप्रमाणं भारतानंही स्वत:चे 7 उपग्रह सोडत "नाव्हिक' ही जीपीएसची स्वत:ची यंत्रणा बनवली.

जीपीएसमुळे आपल्याला फक्त आपलं स्थान कळतं; पण प्रत्यक्षात हालचालीची नोंद घेण्यासाठी जीपीएस ट्रॅकिंग युनिट वापरलं जातं. जीपीएस ट्रॅकिंग युनिटचा उपयोग एखादी वस्तू/व्यक्ती चालत किंवा फिरत असताना तो/ती कोणत्या वेळी कुठं आहे/होती ही माहिती साठवण्यासाठी आणि पाठवण्यासाठी होतो. जीपीएस ट्रॅकिंगच्या साह्यानं मिळालेली हालचालींची माहिती पॅसिव्ह पद्धतीत त्या सिस्टिममध्येच साठवून ठेवली जाते आणि नंतर ऍनेलिसिसकरता वापरली जाते. ऍक्‍टिव्ह पद्धतीत ती माहिती इंटरनेटवर पाठवली जाते. (काही विशिष्ट युनिटमध्ये मोबाईलचं नेटवर्क नसणाऱ्या ठिकाणी थेट कृत्रिम उपग्रहामार्फत ही माहिती पाठवली जाते.) त्यामुळे कोणाच्याही हालचालीची ही सगळी नोंद आपण इंटरनेटवरून त्याच वेळी कुठूनही पाहू शकतो. याच पद्धतीमुळे ओला किंवा उबेरची आपण बोलावलेली टॅक्‍सी कुठपर्यंत आली आहे याविषयीची माहिती आपल्याला आपल्या मोबाईलवर दिसू शकते. जीपीएसमुळे टॅक्‍सीमधल्या रिसिव्हरला ती टॅक्‍सी कुठं आहे हे कळतं आणि जीपीएस ट्रॅकिंगमुळे त्या टॅक्‍सीकडून ही माहिती इंटरनेटच्या द्वारे आपल्या मोबाईलवर सतत आल्यामुळे त्या टॅक्‍सीची हालचालही आपल्याला दिसू शकते.

जीपीएस ट्रॅकिंगचा वापर एखाद्या व्यक्तीच्या/प्राण्याच्या/वस्तूच्या हालचालींची नोंद घेण्यासाठी वेगवेगळ्या क्षेत्रांत होताना दिसतो. आजकाल स्मार्टफोनमधल्या आणि मोटारगाड्यांमधल्या जीपीएस रिसिव्हरचा (मॅप्सचा वापर करणाऱ्या गुगल मॅप्ससारख्या एखाद्या ऍप्लिकेशनबरोबर) अशा प्रकारे रस्ता शोधण्यासाठी सर्रास वापर होताना दिसतोय. मोटारगाड्यांमध्ये जीपीएस यंत्रणा सन 1996 मध्ये पहिल्यांदा बसवली गेली. आपण आपल्याला जायचंय ते ठिकाण या यंत्रणेला सांगायचं. आपण जिथं आहोत ते ठिकाण आणि आपल्याला जिथं जायचं आहे ते ठिकाण यामधला रस्ता आपल्याला या यंत्रणेच्या साह्यानं दिसतो. एवढंच नव्हे, तर ही यंत्रणा आपलं आताचं ठिकाण लक्षात घेते आणि एका महिलेचा आवाज आपल्याला रस्त्याचं मार्गदर्शन करतो. "आता अमुक अमुक अंतर गेल्यावर उजवीकडे वळा' वगैरे. मात्र, या आवाजामुळे गंमतच झाली. बीएमडब्ल्यूनं आपल्या मोटारकारमध्ये जीपीएस यंत्रणा बसवली खरी; पण आपल्यावर एखादी महिला अधिकार गाजवते हे पुरुष चालकांच्या काही पचनी पडलं नाही. त्यामुळे बीएमडब्ल्यूला चक्क आता आपल्या यंत्रणेतून बाईचा आवाज काढून टाकावा लागणार आहे!

काही स्पर्धांमध्ये (उदाहरणार्थ, ग्लायडिंग) स्पर्धकांच्या हालचालींवर पाळत ठेवणं गरजेचं असतं. स्पर्धक कुठल्याही शॉर्टकटचा वापर न करता ठरलेल्या मार्गानंच जातात की नाही हे पाहण्यासाठी अशा स्पर्धकांना स्वतःबरोबर ठेवायला जीपीएस ट्रॅकिंग युनिट्‌स दिली जातात. काही खेळांमध्ये (उदाहरणार्थ, सायकल चालवणं) खेळाडूंच्या परफॉर्मन्सची माहिती गोळा करण्यासाठी या ट्रॅकिंग युनिट्‌सचा वापर होतो. आपलं स्थान आणि मार्ग शोधताना किंवा त्यावर लक्ष ठेवताना वैमानिकांना आणि खलाशांना जीपीएसचा चांगलाच उपयोग होतो. अल्झायमर झालेल्या रूग्णांसाठी तर जीपीएस ट्रॅकिंग युनिट एक वरदानच आहे. कारण त्यांना आपल्या घरचा रस्ताही कित्येकदा आठवत नाही. अशा वेळी त्यांना या यंत्रणेची खूपच मदत होते. आता तर असे काही बूट बाजारात उपलब्ध आहेत. या बुटांत ही यंत्रणा बसवली आहे. आपल्या पायातले हे बूट तीनदा एकमेकांवर आपटले, की त्या बुटांना आता आपल्याला घरी जायचं आहे हे समजतं आणि ते रुग्णाला बरोबर घरी नेऊन पोचवतात. काही देशांमध्ये अटक झालेल्या संशयितांना जामिनावर सोडून देताना एक जीपीएस ट्रॅकिंग युनिटही दिलं जातं. या प्रकारे संशयितांवर एका प्रकारे नजर ठेवण्यात येते. गुप्तहेर लोक तपास करताना एखाद्या व्यक्तीवर किंवा वस्तूवर सतत नजर ठेवण्यासाठी ही ट्रॅकिंग युनिट्‌स वापरतात. काही पालक आपल्या लहान मुलांवर लक्ष ठेवण्यासाठी ही युनिट्‌स वापरतात, तर काही लोक आपले वयोवृद्ध आई-वडील हरवू नयेत म्हणून या युनिट्‌सचा वापर करतात. जंगली प्राण्यांचा अभ्यास करताना शास्त्रज्ञ मंडळी प्राण्यांच्या गळ्यात ही युनिट्‌स बांधतात. यामुळे प्राण्यांच्या वेगवेगळ्या क्रियांवर आणि स्थलांतरावर नजर ठेवणं शक्‍य होतं. पाळीव प्राणी हरवले, तर ते सहजरीत्या सापडावेत म्हणूनही त्यांच्या गळ्यात अशी युनिट्‌स बांधली जातात.
जीपीएसचे सिग्नल्स मोबाईल फोनच्या सिग्नलपेक्षा कमजोर असतात. त्यामुळे शहरांतल्या गजबजलेल्या ठिकाणी किंवा पाण्याखाली किंवा दाट झाडीमध्ये जीपीएस बरेचदा कामच करत नाही किंवा त्यात चुका तरी होतात. तसंच प्रवास करताना मोबाईल फोनची बॅटरी किंवा इंटरनेट डेटा चार्ज केलेला नसेल किंवा वातावरणात खूप बदल झाला किंवा विजा चमकायला लागल्या, ढग जमा झाले तरीही जीपीएस यंत्रणेत चुका झाल्यामुळे आपली खऱ्याच अर्थानं दिशाभूल होऊ शकते. तसंच भारतात एकाच किंवा सारख्या नावाच्या अनेक गावांच्या नावामुळेही जीपीएसचा गोंधळ उडू शकतो आणि मग आपण भलतीकडे जाऊन पोचू शकतो. त्यामुळे अजूनही कुठल्या तरी कोपऱ्यातल्या खेड्यात जाताना फक्त जीपीएसवर अवलंबून राहणं खात्रीलायक नसतं.
मात्र, आपण एखाद्या ठिकाणी पोचायला किती वेळ लागेल हे जीपीएसला कसं कळतं? खरं म्हणजे यात गुगलचा उपयोग करावा लागतो. पूर्वी गुगल आपण ज्या रस्त्यावरून जात असू त्यावरच्या रहदारीविषयीच्या अगोदरच्या नोंदीवरून आता आपल्याला किती वेळ लागेल ते ठरवत असे; पण ही पद्धत अचूक नव्हती. आता नवीन पद्धतीत कोट्यवधी मोबाईल्स जीपीएसचा उपयोग करून आपापलं लोकेशन गुगलला सतत पाठवतात. या लोकेशन्सचं सतत ऍनेलिसिस करून एखाद्या रस्त्यावरच्या मोबाईलधारकांच्या हालचालींवरून त्या रस्त्यावरच्या रहदारीचा किंवा ट्रॅफिक जॅमचा गुगलला पत्ता लागतो आणि तशी माहिती मग गुगल मॅपवर दिली जाते. खूप मोठा ट्रॅफिक जॅम असेल, तर गडद तांबडा; ट्रॅफिक जॅम नसला तरी जास्त रहदारी असेल तर तांबडा; थोड्या कमी रहदारीच्या रस्त्यांसाठी भगवा आणि जर रस्ता मोकळा असेल तर हिरवा रंग वापरण्यात येतो. या वाहतूककोंडीच्या प्रमाणावरून मग आपल्या प्रवासासाठी किती वेळ लागणार आहे याविषयीचे अंदाज बांधून ते आपल्याला सांगता येतात. गुगल मॅप्सविषयी आपण पुढच्या लेखात बोलूच.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com