
दया नाईक - saptrang@esakal.com
‘आगरी’ म्हटलं की ‘मीठ आणि शेती पिकवणारा समाज’ असंच आपल्या डोळ्यासमोर येतं. या समाजाची बोलीभाषा - ‘आगरी’. पण बोलीभाषेविषयी लिहिण्यापूर्वी आधी या समाजासंबंधी थोडी माहिती द्यायला हवी. एक कथा अशी, की रावणाच्या दरबारात ढोल वाजवणारा हा समाज होता आणि त्यांच्या कलेवर प्रसन्न होऊन रावणाने त्यांना पश्चिम समुद्र किनारपट्टी बक्षीस म्हणून देऊ केली. म्हणजे हा समाज कलेतही निपुण होता असं म्हणायला हरकत नाही. म्हणूनच कदाचित आजही आगरी गीतं लोकांच्या मनावर राज्य करतात. नाशिक जिल्ह्यात हाच आगरी समाज ‘पाथरवट’ म्हणून व्यवसाय करतो. काही पुरातन मंदिरं बांधण्यात पाथरवट आगरी समाजाचे कारागीर होते, असा उल्लेख सापडतो. चिमाजी आप्पा यांनी वसई जिंकली, त्या वेळेस ‘दोनशे पाथरवट बोलावून किल्ल्याच्या चिरा भेदून त्यात सुरुंगाला जागा करण्यात आली आणि ते सुरूंग इशाऱ्याने एकाच वेळी उडवण्याची योजना ठरली,’ असा उल्लेख चिमाजी आप्पांच्या पत्रात सापडतो. ते पाथरवट म्हणजे हा आगरी समाज.