

Artificial Intelligence Risks
esakal
अच्युत गोडबोले, रोहित पांढारकर
तंत्रज्ञानाचा विकास हा मानवाच्या कल्याणासाठीच हवा. आरबीआय आणि जागतिक वित्तीय संस्थांनी सुचवलेला ‘किल स्विच’ हा केवळ सुरक्षिततेचा उपाय नाही, तर तो मानवी प्रजातीला भविष्यातल्या गुलामगिरीतून वाचवणारा एकमेव अंतिम पर्याय ठरणार आहे. मशिन्सचं नियंत्रण शेवटी माणसाच्याच हातात असणं अनिवार्य आहे, नाहीतर इतिहासामध्ये माणसानं घेतलेला हा सर्वांत मोठा शोध, त्याचा शेवटचा शोध ठरेल.
मानवी संस्कृतीच्या इतिहासामधला आजचा काळ सर्वांत विलक्षण आणि तितकाच भीतिदायक वळणावर येऊन ठेपला आहे. आपण एका अशा युगामध्ये जगत आहोत, जिथे माणसानं स्वतःच्या बुद्धीच्या जोरावर एक ‘कृत्रिम मेंदू’ तयार केला, पण आता हाच कृत्रिम मेंदू माणसालाच पर्याय म्हणून उभा राहतोय की काय, अशी रास्त भीती निर्माण झाली आहे. गेल्या काही वर्षांमधल्या ‘लार्ज लँग्वेज मॉडेल्स’ म्हणजेच चॅटजीपीटी, क्लॉड आणि जेमिनी सारख्या तंत्रज्ञानानं जग पूर्णपणे बदलून टाकलं आहे. सुरुवातीला फक्त विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं देणारी ही यंत्रणा आता ‘एजंटिक एआय’ कडे वेगानं झुकू लागली आहे. जिथे कॉम्प्युटरला प्रत्येक गोष्टीसाठी पूर्वी मनुष्याची गरज लागायची, जिथे मानवी हस्तक्षेप अनिवार्य होता, तिथे आताचे हे एआय एजंट्स स्वतःचे निर्णय स्वतः घेऊ लागले आहेत. ते स्वतःहून ईमेल पाठवू शकतात, कोडिंग करू शकतात आणि क्लिष्ट आर्थिक व्यवहारही हाताळू शकतात. या प्रणालींमध्ये एक प्रकारचं चैतन्य किंवा स्वयं-जागरूकता म्हणजे कॉन्सेसनेस येऊ लागली आहे, असा दावा काही तज्ज्ञांनी आधीच केला होता. अर्थात याविषयी जरी वाद असले, तरी तंत्रज्ञान विश्वामधला हा बदल जितका चकित करणारा आहे, तितकाच तो अंगावर काटा आणणारा आहे हे मात्र निश्चित !
जेव्हा एखादा सामान्य माणूस तंत्रज्ञानाला घाबरतो, तेव्हा आपण त्याकडे सहज दुर्लक्ष करू शकतो, पण जेव्हा एआय क्षेत्रामधले प्रदीर्घ अनुभव असलेले दिग्गजच धोक्याची घंटा वाजवू लागतात, तेव्हा मात्र कान टवकारून ऐकावं लागतं. कृत्रिम बुद्धिमत्तेचे जनक मानले जाणारे जेफ्री हिंटन यांनी जेव्हा गुगलमधल्या आपल्या पदाचा राजीनामा दिला, तेव्हा त्यांनी एआयच्या भविष्याबद्दल तीव्र चिंता व्यक्त केली होती. त्यांच्या मते, ही यंत्रणा मानवापेक्षा लवकरच अधिक बुद्धिमान होऊ शकते आणि संपूर्ण मानवजातीला आपल्या नियंत्रणात घेऊ शकते. सॅम ऑल्टमन आणि इलॉन मस्क यांनीही अशाच प्रकारचा इशारा आधीच दिला होता. हे तंत्रज्ञान जर हाताबाहेर गेलं, तर त्याच्यामुळे मानवाचं अस्तित्वच धोक्यात येऊ शकतं, हा विचार आता केवळ विज्ञानाच्या काल्पनिक कथांपुरता मर्यादित राहिलेला नाही.