

Indian Fashion History
esakal
शेफाली वैद्य - saptrang@esakal.com
शिल्पांमधून उलगडणारी वस्त्रकला...
मौर्य काळ ते पुढे शुंग काळ हा कालखंड भारतीय वस्त्रसंस्कृतीच्या इतिहासात अत्यंत महत्त्वाचा आहे. या काळातील प्रत्यक्ष कापडांचे अवशेष आज आपल्याला फारसे उपलब्ध नसले तरी सांची आणि भारहूत इथल्या स्तूपांच्या तोरणांवर कोरलेल्या मानवी आणि यक्ष इत्यादी आकृतींच्या वेषभूषेवरून तत्कालीन वस्त्रसंस्कृतीची स्पष्ट झलक दिसते.
हजारो वर्षांच्या भारतीय वस्त्रपरंपरेचा सर्वांत ठोस, डोळ्यांनी पाहता येईल असा पुरावा बरेचदा लिखित ग्रंथांपेक्षा किंवा पुरातत्त्वीय अवशेषांपेक्षाही शिल्पांमधून अधिक स्पष्टपणे बघायला मिळतो, कारण पुरातन भारतातली वस्त्रे सेंद्रिय असल्यामुळे अर्थातच नाशवंत होती, त्यामुळे हडप्पाच्या उत्खननात सापडलेले एका चांदीच्या फुलदाणीला चिकटून असलेले काही सुती धागे वगळता आपल्याकडे त्या काळातल्या भारतीय वस्त्रकलेचा सापडलेला प्रत्यक्ष पुरावा अगदीच तुटपुंजा आहे. हडप्पा-मोहेंजोदडो येथील उत्खननात जी शिल्पे सापडली त्या शिल्पांमधील वेशभूषेच्या तपशीलांवरून त्या काळातील पोशाख, अलंकार आणि त्यांचा प्रतीकात्मक अर्थ यांची महत्त्वपूर्ण झलक मिळते.