

Dr Abhay Bang Health Model
esakal
प्रमोद मुनघाटे - saptarang@esakal.com
आधी केले, मग सांगितले’ या कसोटीवर डॉ. अभय बंग यांचे ‘आरोग्य स्वराज्य’ हे पुस्तक पूर्णतः उतरले आहे. वयाच्या तेराव्या वर्षी अभय बंग यांनी देशातील खेड्यांचं आरोग्य सुधारण्याचा करार नियतीशी केला असं म्हटल्यास ते वावगे ठरणार नाही. त्यासाठी त्यांनी वैद्यकीय शिक्षण घेतले. यादरम्यान त्यांना डॉ. राणी भेटल्या. त्या दोघांनी गडचिरोलीच्या दुर्गम भागात ‘शोध-ग्राम’ (सर्च) स्थापन केले. डॉ. बंग यांनी आपल्या चार दशकांच्या कारकिर्दीत ग्रामीण व आदिवासींच्या आरोग्यासंबंधी केलेले प्रयोग ‘आरोग्य-स्वराज्य’ या अमूर्त संकल्पनेला मूर्तरूप देण्यासाठीच कसे होते, याचा साक्षात्कार या पुस्तकातून होतो.
‘आरोग्य-स्वराज्य’ पुस्तकात चार विभाग आणि १७ लेख आहेत. पहिल्या विभागात डॉ. बंग यांनी आरोग्याची भारतीय व्याख्या स्पष्ट केली आहे. त्यांची एकदा महात्मा गांधींचे नातू प्रा. रामचंद्र गांधी यांच्याशी भेट होते. त्यांना जागतिक आरोग्य संस्थेने केलेली आरोग्याची व्याख्या मान्य नसते. प्रा. गांधी सांगतात की, भारतात निरोगी माणसाला ‘स्वस्थ’ म्हणतात. ‘जो स्व मे स्थित है, वह स्वस्थ है.’ डॉ. बंग यांच्यासाठी हा साक्षात्काराचा क्षण असतो. ‘सर्च’ संस्थेच्या कामाला यातूनच दिशा मिळते.