#MokaleVha : दुर्लक्ष ही नकाराची पहिली पायरी

Stop
Stop

आपलं मूल आपल्याकडून नाकारलं जातंय, हे बऱ्याच पालकांच्या ध्यानीमनीही नसतं. कोणत्याही मुलाचं सारं विश्व म्हणजे त्याचे आईवडील आणि त्याचं घर असतं. जगात सर्वांत जास्त विश्वास त्यांचा पालकांवर असतो. आईवडिलांच्या कुशीत त्याला एक ऊब मिळते. नेमकं या भावनेशी जोडलेल्या पालकांकडूनच त्यांना ‘नकार’ मिळत असेल, तर त्यानं आधारासाठी कोणाकडे पाहावं? मूल तुमच्याशी बोलू इच्छितं; पण तुम्ही त्याच्याकडे दुर्लक्ष करता, काय कारणं असतात त्यामागे?

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

एकतर तुम्हाला वेळ नसतो (असं तुम्हाला वाटतं)! खरं कारण असतं त्याक्षणी त्याचं बोलणं ऐकून घेणं तुम्हाला तितकंसं महत्त्वाचं वाटत नाही. मुलांना अपेक्षा असते त्यांचं ऐकून घेण्याची, लक्ष देण्याची! पण, आपण मात्र इतर कामांत गुंतलेले असतो. नकाराबाबत पालकांना असं वाटतं, की तू बोल मी ऐकतेय, असं म्हणत आपण मात्र काम करत राहतो. कोणी आपल्याकडे लक्ष न देता टाळलं, तर कसं वाटेल तुम्हाला? तुम्ही बोलताय आणि समोरचा पेपर वाचत किंवा मोबाईल पाहत ‘हं-हं’ असं म्हणत दुर्लक्ष केलं, तर किती अपमानास्पद वाटतं. मग मुलांकडे दुर्लक्ष केलंत तर काय होत असेल त्यांचं?

नकाराची पहिली पायरी म्हणजे मुलांकडे दुर्लक्ष करणं. असे पालक मुलांसाठी उपलब्ध असतात. त्यांच्या गरजा पूर्ण करीत नाहीत. त्यांचं म्हणणं लक्ष देऊन ऐकत नाहीत. मुलांना पालकांकडून ज्या शारीरिक, मानसिक आधाराची गरज असते, तो आधार हे पालक देत नाहीत. अशा नकारामुळे मुलांच्या मनात एक प्रकारची असुरक्षितता निर्माण होते. मग मुलांना वाटतं, की हे दुर्लक्ष करणं, टाळणं, नाकारलं जाणं म्हणजे आपला अपमान आहे. ही भावना मोठेपणीही त्यांचा पिच्छा सोडत नाही. त्यातून राग निर्माण होतो. मुलांना एका अशा घरात राहण्याचा अधिकार आहे जिथे सुरक्षितता, स्वीकृकता आणि मायेची ऊब असते. पण, नेमकं तेच मुलांना मिळत नाही. 

मुलांना नाकारलंत, तर ते काळजीत पडतात. एवढंच नाही, तर स्वतःमधील क्षमतांबद्दल त्यांच्या मनात तीव्र शंका यायला लागतात. त्यांचं स्वतःविषयीचं चांगलं मत कमी होत जातं. त्यातून मग मुलांमध्ये इतरांबद्दलची वैराची भावना आणि आक्रमकता वाढत जाते. मुलांसाठी हा नकार झेलणं अजिबात सोपं नसतं. यामुळे त्यांच्या मनाला कधीही न भरून येणाऱ्या जखमा होतात.

तुम्हाला वाटतं, की तुम्ही मुलांना नाकारलंत, त्यांच्याकडे दुर्लक्ष केलंत की ते गप्प बसतील. तसं होईलही कदाचित; पण ते तात्पुरतं. मात्र, त्यांचा विश्वास, स्वप्रतिष्ठा दीर्घ कालावधीसाठी चुरचुर होईल.आईवडिलांच्या नकारामुळे मुलं या भीतीच्या सावटाखाली जगतात, की सगळे लोक आपल्यावर लक्ष ठेवतील, आपल्याला जज करतील हा एक सोशल फोबिया सतत, तीव्रपणे त्यांना त्रास देत राहू शकतो. त्यातून मुलं एकटी पडायला लागतात. बुद्ध्यंक कमी होत जातो. निर्णयक्षमतेवरही त्याचा परिणाम होतो.

शरीराला इजा झाली, की मेंदूचा जो भाग कार्यक्षम होतो अगदी तसंच नकार अनुभवतानाही आपला मेंदू प्रतिसाद करतो. मोठ्यांना नकाराचा इतका त्रास होतो, तर मुलांची मनं किती कोमेजून जात असतील, याचा नुसता विचारही दुखावून जातो. 

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com