निरागसता आणि बुद्धिमत्ता...

brainpower
brainpower

चेतना तरंग
आपण सर्व जण या जगात निरागसतेची सुंदर भेट घेऊन येतो. मात्र, हळूहळू आपण बुद्धिमान होतो, तशी ही निरागसता गमावतो. आपण शांततेबरोबर जन्मतो, मात्र मोठे होत जातो, तशी ही शांतताही गमावतो आणि तिची जागा शब्दांनी भरून काढतो. आपण आपल्याच हृदयात राहतो, मात्र वेळ जातो तसे स्वत:च्याच डोक्‍यात स्थलांतरित होतो. हा प्रवास उलट दिशेने करणे म्हणजेच ज्ञान होय. डोक्‍यापासून पुन्हा हृदयाच्या दिशेने, शब्दांपासून पुन्हा शांततेकडे असा हा प्रवास आहे. आपल्या बुद्धिमत्तेऐवजी जन्मतः असलेली निरागसता पुन्हा मिळविण्याचा या प्रवासाचा उद्देश होय. खरे तर ज्ञानाने तुम्हाला ‘मला माहीत नाही’च्या कुरूप टोकापासून दुसऱ्या सुंदर टोकापर्यंत घेऊन जायला हवे. ज्ञानाचा हेतू आश्‍चर्याचा आहे. ज्ञानाचे पूर्णत्व तुम्हाला आश्‍चर्याकडे नेते. तुम्हाला ते आश्‍चर्याच्या अस्तित्वाची जाणीव करून देते.

खरंतर, अशा प्रकारच्या गूढ गोष्टी समजून घ्यायच्या नसतात, तर जगायच्या असतात. त्या तुमचा ‘मला माहीत नाही’च्या कुरूपतेपासून सौंदर्यापर्यंतचा प्रवास घडवून आणतात. आपली बुद्धिमत्ता वाढत जाते, तशी आपण निरागसता गमावत जातो. बुद्धिमान व्यक्तीचा मूर्खपणा किंवा अज्ञानी व्यक्तीच्या निरागसतेला काहीच किंमत नसते. मात्र ज्ञानी व्यक्तीच्या अज्ञानाला मूल्य असते. एखादी व्यक्ती गोष्टी करणे, घडणे आणि स्वतःमध्ये पुरेसे अंतर ठेवत असल्यास ही खूप मौल्यवान गोष्ट आहे.

त्याचप्रमाणे, ती अतिशय साधीही आहे. एखाद्याला स्वतःमधील निरागसता टिकवून ठेवण्यासाठी खूप झगडावे लागते, असा याचा अर्थ नाही. अज्ञानी व्यक्ती ‘मला माहीत नाही,’ असे म्हणणार नाही. एखादा ज्ञानाच्या प्रक्रियेतून जातो, तेव्हा दुसऱ्या प्रकारच्या ‘मला माहीत नाही’पर्यंत येऊन थांबतो. हे दुसऱ्या प्रकारचे माहीत नसणे सुंदर असते. ज्ञान तुमच्यातील माहीत नसण्याची जाणीव विस्तारते. तुम्हाला नवनवीन गोष्टी माहीत होतात, तसे माहीत नसणाऱ्या गोष्टींचे प्रमाणही वाढत जाते. हे कोणत्याही क्षेत्राला लागू पडते. संगीत, कला, विज्ञान आदी कोणत्याही क्षेत्राला. या जाणीवेबरोबरच ‘मला माहीत नाही’ची सुंदर भावनाही निर्माण होते.

निरागसता हीच असते. ज्ञानाच्या प्रक्रियेतून प्रवाहित होणारी निरागसता नंतर दुसऱ्या ‘मला माहीत नाही’च्या सुंदर अवस्थेत प्रकटते. आश्‍चर्य आध्यात्मिक प्रारंभाचा आधार आहे. निर्मिती अनेक आश्‍चर्यकारक गोष्टींनी भरलेली असते. मात्र आपण या गोष्टींना गृहीत धरतो. त्यानंतर, जडत्वाची, शैथिल्याची व तमस, निष्क्रियता आणि अज्ञानाची सुरवात होते. आश्‍चर्याची जाणीव जागरूकता आणते. तुम्हाला चमत्काराचा धक्का बसतो. हा धक्का हीच जागरूकता होय. आपण जागृत होतो तेव्हा संपूर्ण निर्मिती चमत्कारांनी भरलेली असल्याचे आपल्याला दिसते. एखाद्याच्या जाणिवेचा तो आविष्कार असतो. याच प्रकारची जाणीव दिव्यामध्ये ऑक्‍सिजन म्हणून जळत राहते आणि प्रकाश पडतो. प्रकाश आणि आयुष्यात फरक तरी काय?

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com