थॉट ऑफ द वीक : आयुष्याचे असे हवे संतुलन

Thought-of-The-Week
Thought-of-The-Week

आजपर्यंतच्या लेखमालेमध्ये आपण मानसिक स्वास्थ्याचे खूप काही पैलू शिकलो. मानसिक स्वास्थ्य हे शारीरिक स्वास्थ्याइतकेच महत्त्वाचे आहे, हे जाणले.

मानसिक विश्व असो वा शारीरिक, आपल्या आयुष्यावर त्यांचा खूप प्रभाव पडतो. वरून जरी आपण एक व्यक्ती असलो, तरी आपल्यामध्ये अनेक प्रकारची विश्वे सामावलेली असतात. त्यापैकी रोज आपल्याला जगण्याचा अनुभव व प्रेरणा देणारी म्हणजे शारीरिक, भावनिक, आध्यात्मिक, आर्थिक, कौटुंबिक, सामाजिक व नैतिक विश्वे आपल्या नकळत आपल्यामध्ये सामावतात. रोजच्या पळापळीमध्ये, जबाबदाऱ्यांमध्ये व गरजांमध्ये आपण असे गुरफटून जातो, की या सर्व विश्वांचे संतुलन बिघडते. उदाहरणार्थ, नुसते आर्थिक विश्वावर लक्ष केंद्रित केले, की शारीरिक स्वास्थ्याकडे दुर्लक्ष होते. या सर्व विश्वांचे एक चक्र बनलेले आहे; जे आपल्या आयुष्याच्या गाडीला सुरळीत चालू ठेवतात. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

काही कारणास्तव हे संतुलन बिघडते. जेव्हा आपण संतुलन बिघडले आहे हे जाणतो व त्यावर आपण जाणीवपूर्वक काम करतो; त्याचवेळी आपण स्व-जागरूक असतो. संतुलन बिघडण्यामागची कारणे आपण आजपर्यंतच्या लेखांद्वारे एक एक करून सखोलरीत्या समजून घेतली व त्यावरील उपायही शिकलो. आता ती संतुलनाच्या दृष्टिकोनातून पाहू. 

आयुष्याचे संतुलन बिघडण्याची कारणे खालीलप्रमाणे -
स्वतःमधील ऊर्जा कमी करणारे विचार

आपलेच विचार आपले चक्र असंतुलित करतात. उदाहरणार्थ, ‘जाऊ दे’ हा विचार अंतर्मनात राहतो, त्याचे आपण काय करतो? ‘नाही’ म्हणायचे असताना जेव्हा आपण ‘हो’ म्हणतो? यामुळे होणारा मानसिक त्रास, अंतर्मनात दडलेली भविष्याच्या, अपयशाच्या, तर कधी नाते तुटण्याच्या भीतीवर वेळीच उपाय शोधला नाही, तर आपल्यातील ऊर्जा विनाकारण खर्च होते. 

अपूर्ण भावनिक गरजा 
प्रेम, आदर, कौतुक, प्रगती इत्यादी आपल्या मानसिक गरजा असतात. भावनिक गरज ही एक नैसर्गिक गोष्ट असल्याने आपण त्यावर तोडगा काढण्यात खूप वेळ घालवतो व त्यामुळे आपल्या चक्राचे संतुलन बिघडते. अपूर्ण भावनिक गरज ही असंतुलन निर्माण करते. 

नैतिकतेचा भार 
लहानपणापासून ‘चूक-बरोबर’ हे मनावर बिंबवले जाते. उदाहरणार्थ, ‘नेहमी मोठ्यांचेच ऐकणे बरोबर’, ‘ठरावीक पद्धतीने वागणारी व्यक्ती योग्य’, ‘स्वतःचा विचार करणे चूक’ इत्यादी. मात्र, काळ व वेळ बदलेल तसे आपण बदलत नाही. हाच भार घेऊन जगत असतो व इतरांनीही असाच विचार करावा, ही अपेक्षा असते. हा भार स्व-परिवर्तनाच्या प्रक्रियेमधील सर्वांत मोठा अडथळा आहे. तो योग्य वेळी दूर न केल्याने संतुलन बिघडते.

अपेक्षापूर्तीचा संघर्ष 
‘अपेक्ष’ ही पण एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. आपली अपेक्षा पूर्ण होण्यासाठी आपण पूर्ण आयुष्य समर्पित करतो. त्यात योग्य व अयोग्य, असे काही नाही. अपेक्षापूर्ती आपल्याला हवी तशीच झाली पाहिजे, हा हट्ट आपल्यावर अमर्याद ताण देतो. परिणामी, आयुष्याचे संतुलन बिघडते व वर्तमानात जगण्याचा आनंद हिरावला जातो.

वरील सर्व कारणांवर ‘दुसऱ्याला दोष न देता आपण आपल्यात बदल करणे गरजेचे आहे’ हे जेव्हा उमजते तेव्हा आपण ‘स्व-जागरूक’ होतो. 

आगामी लेखामध्ये आपण स्व-परिवर्तन कसे आणायचे, याची माहिती घेऊ. 
लक्षात ठेवा, आयुष्याचे चक्र संतुलित करायचे असेल, तर स्व-जागरूकता हवी. जागरूकता असंतुलनाची जाणीव करून देते. पण, स्व-जागरूकता त्या जाणिवेचे रूपांतर स्व-परिवर्तनाच्या वाटचालीकडे करते, स्वतःमध्ये बदल घडवून!

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com