शिवकाळापूर्वीचा ओजस्वी वेध....

छत्रपती शिवरायांच्या जन्माआधीच्या संघर्षमय कालखंडावर प्रकाश टाकणारा ग्रंथ म्हणजे झंझावात.
Book Maha Samrat
Book Maha SamratSakal
Summary

छत्रपती शिवरायांच्या जन्माआधीच्या संघर्षमय कालखंडावर प्रकाश टाकणारा ग्रंथ म्हणजे झंझावात.

छत्रपती शिवरायांच्या जन्माआधीच्या संघर्षमय कालखंडावर प्रकाश टाकणारा ग्रंथ म्हणजे झंझावात. ज्येष्ठ लेखक विश्‍वास पाटील यांनी छत्रपती शिवरायाच्या जीवनावर कादंबरी मालिकेचा संकल्प सोडला आणि त्यातला पहिला भाग म्हणजे हे पुस्तक. आत्तापर्यंत शिवरायांच्या पराक्रमावर व जीवनावर आधारित अनेक पुस्तके आली आहेत. अजूनही काही येत आहेत. या कादंबरीमालिकेचे वैशिष्ठ म्हणजे नवे पुरावे विचारात घेत लेखकाने येथे इतिहासाशी फारकत घेतलेली नाही. तसेच सत्य झाकोळले जाणार नाही याची काळजी घेतली आहे. दंतकथांना स्थान दिलेले नाही.

केवळ कल्पनेचा आधार घेतलाय तो वातावरण निमिर्तीसाठी. मात्र अनेक अपरिचित ऐतिहासिक बाबींना या खंडात स्थान मिळाले आहे.

शिवराय ही व्यक्ती नव्हती, तर एकाच वेळी सात ते आठ माणसांचे काम करणारी ही संस्था होती, असे विधान पाटील यांनी मनोगतामध्ये केले आहे. याला बांधील राहून पाटील यांनी या महामालेचे लेखन केले आहे. छत्रपती शिवराय यांच्याआधी शहाजीराजांनी जे काम केले ते इतिहासात फारसे सांगितले गेलेले नाही. मात्र हा काळ सांगितल्याशिवाय छत्रपती शिवरायांच्या जडणघडणीचा कालखंड समजणार नाही. शहाजीराजांनी १६२४ मध्ये भातवडीची लढाई केली ती प्रत्यक्ष दिल्लीचा बादशहा जहांगीर याच्या फौजेशी, तर १६३५ मध्ये शहाजहानशी त्यांनी युद्ध केले. विजापूरच्या आदिलशाहीचे शहाजीराजांनी प्रचंड नुकसान करूनही त्याच आदिलशाहीने शहाजीराजांना सरनोबत म्हणून सन्मानाने पाचारण केले हे वेगळे उदाहरण आहे. विश्वास पाटील यांनी या महाकादंबरीची रचना करताना अशा अपरिचित गोष्टींचा मागोवा घेतला आहे.

छत्रपती शिवरायांच्या स्वराज्यनिर्मितीत शहाजीराजांचे आणि जिजाऊमातांचे कसे मोठे योगदान होते याचा तपशील या खंडामध्ये मिळतो. छत्रपती शिवरायांचे स्वराज्य उभारणीचे काम सुरू झाल्यानंतर या स्वराज्यावर मोठा आघात झाला तो म्हणजे अफजलखानाच्या स्वारीने. अफजलखानाच्या स्वारीने स्वराज्यापुढे मोठे आव्हान उभे केले; मात्र छत्रपती शिवरायांनी योग्य ती व्यूहरचना रचून अफजल खानाची स्वारी संपवलीच; पण अफजल खानाचा वधही केला. हा सारा घटनाक्रम याच खंडामध्ये आलेला आहे. छत्रपती शिवरायांवरील या कादंबरीत ललित लेखनाची शैली असली तरी कौटुंबिक वातावरणाला अवास्तव स्थान देण्यात आलेले नाही. इतिहासाशी जितके प्रामाणिक राहता येईल तितके राहून पाटील यांनी हा सगळा कालखंड प्रेरणादायी शब्दांत उभा केला आहे. यातील प्रत्येक प्रकरणाचे शीर्षकही लक्षवेधी आणि चपखल असे आहे. ‘कडोविकडीची लष्करपेरणी’ हे शीर्षक ज्या प्रकरणाला दिले आहे, या प्रकरणात अफजल खानाभोवती प्रतापगडाच्या परिसरात महाराजांनी कशी व्यूहरचना केली होती त्याचा तपशील कळतो. नेताजी पालकर यांच्यावरील प्रकरणातून महाराजांच्या बरोबर किती ताकदीची माणसे होती हे लक्षात येते.

बंगळूर येथे शहाजीराजांच्या तालमीत छत्रपती शिवरायांना राजधर्माचे धडे कसे मिळाले, तसेच वेगवेगळ्या लढायांमध्ये शहाजीराजांनी कोणती भूमिका घेतली, मुत्सदेगिरीने संकटांवर कसा मार्ग काढला याचे मार्गदर्शन शिवरायांना या काळात मिळाले. ‘झंझावात’ या पहिल्या खंडात निम्म्यापेक्षा जास्त भाग शहाजीराजांनी विविध लढायांमध्ये केवढा मोठा पराक्रम केला होता त्याचा तपशील कळतो. इतिहास हा जसजसे नवेनवे संशोधन होईल तसतसा उलगडला जात असतो. गेल्या शंभर वर्षांत छत्रपती शिवरायांच्या आयुष्यावर अनेक पुस्तके आली; मात्र जास्तीत जास्त नव्या संशोधनाचा समावेश करीत, तसेच वस्तुनिष्ठ भूमिका घेत केवळ भाषेच्या प्रेमात न पडता ऐतिहासिक सत्य मांडण्याचा प्रयत्न विश्वास पाटील यांनी या कादंबरी मालेच्या लेखनात केला आहे. जवळजवळ २५० पेक्षा जास्त किल्ल्यांना पाटील यांनी भेट दिली आहे. शिवचरित्राचे अभ्यासक व इतिहास संशोधक विविध बखरींचा, तसेच परदेशी इतिहासकारांनी नोंदविलेल्या तपशिलांचा सांगोपांग विचार करून महाराजांच्या जडणघडणीचा काळ या खंडात पाटील यांनी मांडला आहे.

पुस्तकाचं नाव : महासम्राट - खंड पहिला - झंझावात

लेखक : विश्‍वास पाटील

प्रकाशक : मेहता पब्लिशिंग हाऊस, पुणे (०२०-२४४७६९२४, २४४६०३१३)

पृष्ठं : ४५०

मूल्य : ५७५ रुपये

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com