एक चित्तवेधक गुपित...

आपल्या देशात दरवर्षी ११ मे हा दिवस ‘तंत्रज्ञान दिवस’ म्हणून साजरा केला जातो. या परंपरेची सुरुवात तेव्हापासून झाली ज्यावेळी आपण राजस्थानातील पोखरण या ठिकाणी १९९८ मध्ये ११ व १३ मे या दिवशी आण्विक चाचण्या पार पाडल्या.
Abdul Kalam
Abdul KalamSakal

आपल्या देशात दरवर्षी ११ मे हा दिवस ‘तंत्रज्ञान दिवस’ म्हणून साजरा केला जातो. या परंपरेची सुरुवात तेव्हापासून झाली ज्यावेळी आपण राजस्थानातील पोखरण या ठिकाणी १९९८ मध्ये ११ व १३ मे या दिवशी आण्विक चाचण्या पार पाडल्या होत्या. त्या घटनेबाबत माझ्या मनामध्ये कित्येक चित्तवेधक आठवणी घर करून आहेत कारण की माझे गुरु डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम त्यावेळी तिथं होते.

देशाच्या संसदेमध्ये वाजपेयी यांच्या आघाडी सरकारनं बहुमत प्राप्त केल्यानंतर १५ दिवसांमध्येच पंतप्रधान वाजपेयी यांनी डॉ. कलाम आणि डॉ. चिदंबरम यांना पाचारण केलं आणि या अणुचाचण्या पार पाडण्याचा अधिकार त्यांना दिला. त्यावेळी वरिष्ठ अधिकारी व वैज्ञानिक इत्यादींशी संपर्क साधण्यासाठी नोकरशहामधून पंतप्रधानांचे मुख्य सचिव व त्यांचे अत्यंत विश्वासू सहाय्यक असलेल्या ब्रजेश मिश्राना निवडण्यात आलं.

या आण्विक चाचण्या पार पाडण्यासाठी संबंधितांना तीस दिवसांचा अवधी देण्यात आला होता - आणि हा अवधी वाजवी असल्याचे समजण्यात आलं. पौर्णिमेची आवड असलेले डॉ. कलाम यांनी या अणु चाचण्यांसाठी बुद्ध पौर्णिमेचा दिवस सुचविला जी पौर्णिमा ११ मे, १९९८ रोजी येत होती. (या आठवड्यातही बुद्ध पौर्णिमा आहे) याबाबत जवळ-जवळ काहीही चर्चा न होता या घटनेशी निगडीत प्रत्येकानं या दिनांकाला पूर्णपणे सहमती दिली. पोखरण रेंज (रांगा) या भारतीय सैन्याच्या कॉर्पस ऑफ इंजिनियर्सच्या ५८ व्या इंजिनियर तुकडीअंतर्गत येत होत्या. या तुकडीनं मागील कित्येक वर्षांपासून तिथं अरुंद घळी खणल्या होत्या - गुप्तहेरी करणाऱ्या उपग्रहांना त्यांच्या कृतीची नोंद करता येऊ नये या हेतूनं हे कार्य रात्रीच्या वेळी चाललेलं असे. शुष्क आणि वापरात नसलेल्या कित्येक विहिरी या भागांमध्ये होत्या. त्यांपैकी काही विहिरींची खोली व रुंदी वाढविण्यात आली होती आणि पन्नास मीटर इतक्या खोलीच्या घळींमध्ये त्यांचं रूपांतर करण्यात आलं होतं.

या दरम्यान गुप्तता बाळगण्याच्या कडक शिष्टाचारांचं (प्रोटोकॉलचं) पालन करण्याचा एक भाग यादृष्टीने ज्या - ज्या वेळी डॉ. कलाम आणि डॉ. चिदंबरम भेट देत असत त्या-त्या वेळी त्यांच्या अंगावर सैन्याचे हिरवे पोशाख असत आणि त्यांची खरी औपचारिक ओळख तिथं काम करणाऱ्या व्यक्तींना कधीही करून देण्यात आली नाही. डॉक्टर कलामांना तिथं मेजर जनरल पृथ्वीराज म्हणून ओळखलं जात असे (कारण की पृथ्वी क्षेपणास्त्राची निर्मिती त्यांनी केली होती) आणि डॉ. चिदंबरम यांना मेजर मेजर जनरल नटराज म्हणून ओळखलं जात असे (कारण की ते ज्या शहरातून आले होते तेथील चिदंबरम शहरातील नटराजाचं मंदिर प्रसिद्ध होतं) आणि या आण्विक चाचण्या पार पाडण्यासाठी तिथं आलेले भाभा अणुसंशोधन केंद्राचे संचालक डॉ. अनिल काकोडकर आणि भाभा अणुसंशोधन केंद्र आणि संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेचे (डिआरडीओ ) चे शंभरपेक्षा अधिक वैज्ञानिक आणि तंत्रज्ञान विशेषज्ञ यांची ओळख लपवण्यासाठी त्यांना सैन्याचे गणवेश आणि खोट्या ओळखी देण्यात आल्या होत्या.

१९९८ च्या त्या ११ मे या दिवसाची सुरुवातच मुळात या मरुभुमीवरून जोरदार वाहणाऱ्या वाऱ्याच्या जोरदार प्रवाहांनी झाली. या अणु स्फोटामुळे जी धूळ निर्माण होणार होती ती वाऱ्यासोबत पोखरण शहराकडे वाहणार होती. त्यामुळे वातावरण शांत होईपर्यंत त्यांना थांबणं भागच होतं. अणु चाचणी स्थळापासून हे वृत्त पंतप्रधानांपर्यंत पोहोचविणाऱ्या या सुरक्षित हॉटलाइनपाशीच हे वृत्त ऐकण्यासाठी पंतप्रधान वाजपेयी वाट पाहत बसले होते आणि याच उद्देशांसाठी त्यांनी सर्व दिवसभराचे कार्यक्रम रद्द केले होते. त्यावेळी डॉ. कलाम यांनी त्यांच्या तरुणपणाच्या दिवसांमध्ये कधीतरी वाचलेली एक सुंदर ओळ त्यांना आठवली. ती ओळ होती, "जी बातमी खरच वाट पाहण्याजोगी असते त्यासाठी तुम्हाला बहुतेक वेळा प्रतीक्षा करावीच लागते."

डॉ. कलाम यांनी पंतप्रधान वाजपेयी यांना दुपारी तीन वाजता फोन केला आणि त्यांना सांगितलं की वाऱ्याची तीव्रता हळूहळू कमी होत होती आणि या अणुचाचण्या पुढील एका तासात पार पाडल्या जाऊ शकत होत्या. दुपारी ३:४३:४४ वाजता म्हणजेच भारतीय प्रमाणवेळेनुसार दोन वाजता पहिल्या तीन उपकरणांचा स्फोट एकाच वेळी झाला. या तिन्ही स्फोटांच्या एकत्रित शक्तीमुळे साधारण एका क्रिकेट मैदानावर मैदानाएवढा भाग उचलला गेला आणि त्यामुळे हवेमध्ये धूळ आणि वाळूचे लोटच्या लोटच हवेत निर्माण झाले.१९७४ मध्ये ज्या आण्विक चाचण्या करण्यात आल्या होत्या त्यावेळी त्या चाचण्यांना ‘शांततापूर्ण चाचण्या’ असं संबोधण्याचा जो बनाव करण्यात आला होता तो १९९८ च्या या चाचण्यांची घोषणा करताना करण्यात आला नाही.

खरं तर यावेळी शासकीय अधिकाऱ्यांनी अणुचाचणीच्या सैनिकी स्वरूपावर जोर देण्यात अजिबातच दिरंगाई केली नव्हती. ब्रजेश मिश्रा यांनी पत्रकारांना सांगितलं " या आण्विक चाचण्ण्यांनी ही बाब स्थापित केली आहे की भारताने आण्विक शस्त्र बाळगण्याची क्षमता विकसित केली आहे". दोन दिवसांनंतर म्हणजे १३ मे या दिवशी २७ किलो टन वजनाची शस्त्रास्त्रं जी एनटी वन अँड टू मध्ये खाली आणण्यात आली होती त्यांचा विस्फोट भूगर्भामध्ये करण्यात आला. एन टी थ्री अंतर्गतचं उपकरण बाहेर काढून घेण्यात आलं आणि डॉ.आर चिदंबरम यांच्या आदेशानुसार ते परत घेण्यात आलं. कारण की त्यांना वाटलं की त्यांच्या केवळ पाच स्फोटांमध्ये त्यांनी हवे ते परिणाम मिळविले होते, त्यामुळे अधिकच्या स्फोटांची मुळात गरजच काय होती? असं त्यांना स्वाभाविकपणे वाटलं होतं. त्यांनी कमी शब्दातच त्यांच्या सहकाऱ्यांना विचारलं होतं, ‘‘आपली शक्ती निष्कारण वाया तरी का घालवायची?" पोखरण दोन या आण्विक चाचणीनं अधिक शक्तिशाली मात्र वजनाने हलक्या असलेल्या आण्विक शस्त्र धारण करणाऱ्या गटांमध्ये भारताचं आगमन झाल्याचं खत्रीलायकरित्या सिद्ध केलं होतं अशी आण्विक शस्त्र क्षेपणास्त्रांनी वाहून नेण्याइतपत लहान होती.

यावर प्रतिक्रिया देण्यासाठी पाकिस्ताननं अजिबातच वेळ दवडला नाही. त्याच वर्षात २८ मे पाकिस्ताननं बलुचिस्तान प्रांतांमधील चांगाई जिल्ह्यातील रास- कोह या खेड्यामध्ये अणुचाचण्या पार पाडल्या. यानंतर दिनांक ३० मे,१९९८ रोजी आणखी एक चाचणी पार पाडण्यात आली. पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांनी असे म्हटल्याचे प्रसिद्ध आहे, "जर भारताने अणुबॉम्बचा स्फोट केला नसता तर पाकिस्ताननेही अशी चाचणी केली नसती.एकंदर नवी दिल्लीनं हे पाऊल उचलल्यावर लोकांच्या दबावासमोर झुकण्याशिवाय आमच्यासमोर अन्य कोणताही पर्याय शिल्लक नव्हता".

ते भले काहीही असो, मे १९९८ मध्ये भारताने केलेल्या अणुचाचण्याच्या पाठोपाठ पश्चिमी माध्यमांमध्ये याविषयी जो हलकल्लोळ उठला होता त्याविषयी डॉ. कलामांनी तीव्र शब्दात प्रतिक्रिया व्यक्त केली होती. जर ब्रिटनकडे आण्विक शस्त्रांच भांडार असू शकतं, मग भारताकडे का नाही ? ज्यावेळी फ्रान्स हा अल्जेरिया-व्याप्त भागातील वातावरणीय आण्विक चाचण्या पार पाडत होता त्यावेळी हे जग का शांत होत? हे प्रश्न वाजवी नाहीत का? एकीकडं पाश्चिमात्य जग, सोव्हिएत देश (रशिया) आणि चीननं स्वतःला व्यवस्थितपणे आण्विक शस्त्रास्त्रांनी सज्ज केलेलं आहे, मग भारतानं असं केलं तर बिघडलं कुठं?

आपण याबाबत चर्चा करत असताना या गोष्टीचा विचार माझ्या मनात आल्यावाचून राहिला नाही की मेजर जनरल पृथ्वीराज चौहान त्यांच्या व्यक्तित्वाला अजिबातच साजेशा नसलेल्या सैन्यदलाच्या पोशाखात ते कसे दिसत असतील. मी असा विचार करू लागलो की पाकिस्तान वरून उडणाऱ्या गुप्तहेर उपग्रहानं जर डॉ. कलमांच्या उडणाऱ्या केसांच्या बटांच्या प्रतिमा पकडल्या असत्या - ज्या चंदेरी बटा मेजर जनरल पृथ्वीराज यांच्या सैनिकी हॅटमधून अगदी त्या पोशाखाशी विसंगत पद्धतीनं उडत होत्या - तर निश्चितच त्यांनी आपल गुपित उघडं पडलं असतं.

(सदराचे लेखक वैज्ञानिक, तसेच विविध घडामोडींचे अभ्यासक आहेत.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com