पत्रास कारण की... (अरविंद जगताप)

arvind jagtap
arvind jagtap

पत्रांनी अनेक गोंधळ घातलेत; पण पत्रांनी जेवढी भावनिक आंदोलनं निर्माण केलीत, मनामनात तेवढी खरी आंदोलनं झालेली नसतील. पत्र जगण्याचा आधार होता कित्येक जीवांचा. पत्र शेवटच्या घटका मोजणाऱ्या माणसांची आशा होती. पत्र जगण्याचं बळ होतं. गावाहून आलेलं आई-बापाचं पत्र होस्टेलवर शिकणाऱ्या पोरांना आणखी कित्येक रात्री उपाशीपोटी काढण्याच बळ देणारं असायचं. पोरगा शहरात मन लावून अभ्यास करतोय हे पत्रात वाचून घरच्यांना शेतात दुप्पट राबायला बळ यायचं. मोबाईल फक्त खिशात व्हायब्रेट होऊ शकतो; पण गदगदून हलवू शकतं ते पत्र.

पत्र आणि माझं नातं खास आहे. शाळेत असल्यापासून मी मोठमोठ्या लेखकांना पत्र पाठवायचो. त्यांचं आलं, की किती आनंद व्हायचा. लहानपणी खूप नातेवाईकांना, शेजाऱ्यांना पत्र लिहून द्यायचो. आता "चला हवा येऊ द्या'मध्ये पत्र लिहितो. खरंतर एक पत्र लिहून बघू म्हणून सुरवात झाली होती; पण हळूहळू "चला हवा येऊ द्या'मध्ये सारखं पत्र लिहायचा आग्रह होऊ लागला. खूप लोक सांगायचे ः "आम्ही पत्रांचीही वाट पाहतो. सागर कारंडेच्या आवाजात पत्र ऐकताना एक वेगळाच अनुभव असतो.' सागर कारंडेनं माझ्या शब्दांना वेगळ्याच विश्वात नेलं. तो माझ्या शब्दांचा आवाज झाला. डॉ. नीलेश साबळे आणि मालिकेमुळं या पत्रांना खूप मोठी ओळख मिळाली.
इथं मला माझ्या पत्रांविषयी नाही सांगायचं. पत्र या आपल्या आयुष्यातल्या हळव्या कप्प्यात डोकवायचंय. पत्रं हृदयातल्या हळव्या कप्प्यासारखी असतात. अजूनही कुणी पत्रं पाठवलं, की खूप छान वाटतं. सुंदर अक्षरवाल्या माणसांचा केवढा अभिमान असायचा. आता लोक हस्ताक्षराकडे लक्ष देतील असं वाटत नाही. मेल वाचून खूपदा माहिती कळते; मात्र मनाचा अंदाज येत नाही. अक्षर वाचून यायचा.

तुम्ही कधी अनुभवलंय की नाही माहीत नाही; पण पूर्वी पत्र लिहिताना अख्खं घर असायचं सोबत. प्रत्येकाचा आशीर्वाद, नमस्कार आणि दंडवत लिहावा लागायचा. खुर्चीत बसलेले आजोबा, स्वयंपाकघरात असलेली आई, देवघरासमोर असलेली आजी, ऑफिसचं काम करणारे बाबा असे सगळे पत्र लिहिताना किंवा वाचताना सोबत असायचे. जप करताकरता थांबून आजी सांगायची, की "माझ्यासाठी तपकीर आणायला सांग.' किंवा "रात्री झोपताना थंड दूध पीत जा,' अशी सूचना तरी लिहायला सांगायची. तुम्हाला आठवतंय असा मेल कधी तुम्ही लिहिलाय? सगळ्यांनी मिळून.
कधीकधी तंत्रज्ञान बल्बसमोर रॉकेल लावून लटकवलेल्या कागदासारखं वाटतं. किड्यांसारखं आपण सगळे झेप घेतो त्या कागदाच्या दिशेनं आणि नष्ट करतोय अस्तित्व, अशी भीती वाटते.

तंत्रज्ञान शाप आहे असं नाही; पण कृत्रिमता आपल्याला तेवढं हळुवार करत नाही.अस्वस्थ करत नाही. मेसेजचा रिंग टोन पत्र येण्याआधीची हुरहूर निर्माण करू शकत नाही. ई-मेलचं नोटिफिकेशन पोस्टमन काकांना आपल्या घराकडे येताना बघून जी भावना निर्माण व्हायची ती निर्माण नाही करू शकत.

"हवा येऊ द्या'मध्ये सचिन तेंडुलकर आला होता. पत्र वाचून झाल्यावर तो आठवण सांगायला लागला. त्याचे वडील पोस्टमन घरी आल्यावर कशी विचारपूस करायचे, त्यांना पाणी द्यायचे. एवढी आपुलकी असायची. नातं असायचं. आपल्या सुख-दुःखात साथीदार होता तो. जग बदलत चाललंय. जुन्या गोष्टी उगाळत बसणं चूक असतं.
...पण काळासोबत तंत्रज्ञान बदलणं ठीक आहे. माणसं बदलायचं काय कारण आहे? भावनांमध्ये बदल होण्याचं काय कारण आहे? आपण कुरिअरवाल्याशी किती तटस्थपणे वागतो. एकूणच विचारपूस बंद झालीय. खूप ठिकाणी चौकशी करणारी माणसं गावंढळ वाटतात लोकांना. किंवा शेजारी बसलेल्या माणसाला एखादा प्रश्न जास्त विचारला, तर तो त्याला त्याच्या "प्रायव्हसी'वर हल्ला वाटतो. आपण खूप वेगानं बदल घडताना पाहतोय. एक रुपया टाकून बोलायचे पीसीओ केवढे लोकप्रिय होते. ते लाल डबे सगळ्या दुकानांत दिसायचे. ती वेळ संपत आल्यावर वाजणारी रिंग किती अस्वस्थ करायची. बऱ्याचदा नाणी संपलेली असायची आणि खूप काही बोलायचं असायचं. त्यावेळी उरलेल्या काही सेकंदात जे काही महत्त्वाचं बोलण्याची घाई असायची, ती धमाल होती. गंमत म्हणजे दोन्ही बाजूच्या माणसांना आपलं सांगायचं असायचं. त्यावेळी उरलेल्या काही सेकंदांत जे काही महत्त्वाचं बोलण्याची घाई असायची ती धमाल होती आणि मग फक्त गोंधळ होऊन फोन कट व्हायचा. खूप लोक कॉईनला दोरा लावून बोलायचे असं म्हणतात. कधी पाहिलं नाही; पण अशा खूप गंमती पीसीओच्या बाबतीत होत्या. एखाद्याचा फोन खूप लांबला, तर मागं रांगेत उभे राहणारे लोक कसे वैतागायचे ते दृश्‍यही बघण्यासारखं असायचं.

मग एसटीडीचे दिवस. बूथ असायचा आणि त्या बूथमध्ये संध्याकाळनंतर गर्दी सुरू व्हायची. प्रत्येकाची ठरलेली वेळ. खूप लोकांना अत्यंत खासगी बोलायचं असायचं. सुरवातीला त्या काचेच्या बूथमध्ये संभाषण अगदी हळूहळू सुरू असायचं; पण बिलाचा आकडा आणि बोलणाऱ्याचा आवाज कधी वाढायचा हे कळायचं नाही. बाहेर वाट पाहणाऱ्या प्रत्येकाला ते खासगी बोलणं माहीत झालेलं असायचं. अगदी चाळीसारखी भावना. सगळ्यांना सगळं माहीत. आज खूप मुला-मुलींना विश्वास बसणार नाही; पण होस्टेलमध्ये एकच फोन असायचा. घरून फोन यायचे. मुलं किंवा मुली फोनच्या आसपास घुटमळत असायचे, किंवा जो फोन उचलेल तो जोरात हाक मारायचा ः "रूम नंबर अमुक अमुक... फोन आलाय.' आणि धावत पायऱ्या उतरत फोन गाठायची धावपळ. आई-वडिलांचे तेच ते प्रश्न; पण महत्त्वाचं असायचं त्यांचा आवाज ऐकणं. त्यात चोरून एकमेकांना फोन करणारे प्रियकर-प्रेयसी असले, की तो पण फोन कितीतरी वेळ एंगेज असायचा. बाकीचे लोक अक्षरशः आरडाओरडा सुरू करायचे. हे सगळं आठवण्याचं कारण बोलणं किती महाग होतं. आपल्या मनातलं एकमेकांना सांगणं किती मौल्यवान होतं.

संवाद ही आपली संस्कृती होती. आता माणसं खासगी होत चाललीत. मी आणि माझा मोबाईल हे विश्व होत चाललंय. बरं, मोबाईलमधून ज्या जगाशी संवाद साधायचाय ते कृत्रिम आहे. सोशल मीडियावर निषेध नोंदवला म्हणजे आपली जबाबदारी संपली असं लोकांना वाटतं. गावातला माणूस गेला, की गाव गोळा व्हायचं. शहरांत सोसायटी गोळा व्हायची. आज "आरआयपी' म्हणून विषय संपतो. कुणी म्हणेल, की अंत्यविधीला जाणं गरजेचं असतं का? त्यानं काही मदत होते का? त्या माणसाला होत नसेल; पण आपली आपल्याला खूप मोठी मदत होते. हे जग नश्वर आहे हे लक्षात यायला. माणसं जमिनीवर असायला हे खूप मोठं कारण होतं. आपण वर काहीच घेऊन जाणार नाही, हे असं दोन-चार महिन्यांत समोरासमोर बघता यायचं. अंत्यविधीच्या निमित्तानं. माणसं एकमेकांशी चांगलं वागण्यासाठी भीती हेसुद्धा खूप मोठं कारण असतं. कशाची तरी भीती असली, की माणसाच्या वागण्यावर नियंत्रण असतं. आज आपली भीतीच कमी होत चाललीय. आपल्याला गावात राहायचंय, सोसायटीत राहायचंय, चाळीत राहायचंय असं म्हणून एकमेकांशी खूप प्रेमाने वागायची माणसं; पण आता सगळे इमर्जन्सी नंबर मोबाईलवर आलेत म्हणून की काय; पण माणसं एकमेकांना फार विचारत नाहीत. असो.

पत्रांचं एक आणखी विशेष असतं. कधीकाळी जी पत्रं वाचून तुम्ही खूप रडलेला असता, ती पत्रं काही काळानं पुन्हा वाचली, की हसू येऊ शकतं. कधीकाळी जी पत्रं वाचून तुम्ही खूप हसला होता, ती पत्रं वाचून कालांतरानं भावूक व्हायला होतं. पत्रं वेगवेगळ्या काळांत वेगवेगळ्या भावना बनून जातात. प्रेमपत्रांची तर गोष्टच वेगळी. प्रेम ही जगातली सगळ्यात गूढ गोष्ट आहे. ती जेवढी हवीहवीशी आहे, तेवढीच गूढ आहे. केवळ पत्रांची वाट बघत कित्येक जोडप्यांना वर्षानुवर्षं वाट बघताना पाहिलंय. अविवाहित राहिलेलं पाहिलंय. कित्येक जवानांच्या पत्नींना केवळ पत्रांच्या आशेवर जगण्याचं बळ मिळालेलं पाहिलंय. कित्येक समस्या केवळ वर्तमानपत्रांत वारंवार पत्र लिहिणाऱ्या माणसांमुळं सुटलेल्या पाहिल्यात. कित्येक प्रेमकथा केवळ पत्रातल्या भाषेवर खूश होऊन सुरू झाल्यात. पत्रांनी अनेक गोंधळ घातलेत; पण पत्रांनी जेवढी भावनिक आंदोलनं निर्माण केलीत, मनामनात तेवढी खरी आंदोलनं झालेली नसतील. पत्र जगण्याचा आधार होता कित्येक जीवांचा. पत्र शेवटच्या घटका मोजणाऱ्या माणसांची आशा होती. पत्र जगण्याचं बळ होतं. गावाहून आलेलं आई-बापाचं पत्र होस्टेलवर शिकणाऱ्या पोरांना आणखी कित्येक रात्री उपाशीपोटी काढण्याच बळ देणारं असायचं. पोरगा शहरात मन लावून अभ्यास करतोय हे पत्रात वाचून घरच्यांना शेतात दुप्पट राबायला बळ यायचं. घरात डांबून ठेवलेल्या मुलीला प्रियकराचे शब्द विद्रोहाचं बळ देणारे असायचे. कित्येक चळवळी मोठ्या करण्यात पत्रांचा वाटा आहे. क्रांतीची सुरवात आहेत पत्रं. शांतीचं कारण आहेत पत्रं. पत्रं आपण एकटे असताना छातीशी ठेवून हळूवार होऊ शकतो. बाकी काही नसतं एवढ्या जवळ घेण्यासारखं. मोबाईल फक्त खिशात व्हायब्रेट होऊ शकतो; पण गदगदून हलवू शकतं ते पत्र. हां! मोबाईलचं बिल अंगावर काटा आणू शकतं; पण पत्रातलं एक वाक्‍यसुद्धा अंगावर शहारा आणू शकतं.

पत्र खरंतर खासगी गोष्ट असते. एकट्यानं वाचण्याची. एकट्यानं लिहिण्याची; पण लोकांच्या प्रतिसादामुळं पत्रं जाहीरपणे वाचली गेली. ऐकली गेली. टीव्हीवर सहसा पुस्तकांतल्या गोष्टी असतात. टीव्हीवरच्या गोष्टीचं पुस्तक होणं आपल्याकडं दुर्मिळ आहे. हा योग पत्रावरच्या प्रेमामुळं जुळून आला. वाचतावाचता अचानक पेन घेऊन तुमच्यातला कुणी आपल्या आवडीच्या माणसाला पत्र लिहायला बसेल. आपलं लिखाण नेमक्‍या पत्त्यावर पोचलंय याचं मला समाधान होईल. धन्यवाद!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com