बीड खरंतर साध्या, कष्टाळू लोकांचं गाव; पण राजकारणाने काय करून ठेवलं... गुंड-मवाली हेरण्यात नेते पटाईत असतील आणि गुणवत्ता ओळखण्यात कमी पडत असतील तर काय होतं, याचं बीड उदाहरण बनायला नको.
बीडमधलं परळी ज्योतिर्लिंग म्हणून प्रसिद्ध; पण हळूहळू गाजू लागली तिथल्या थर्मल स्टेशनची राख. राहण्यासाठी, आरोग्यासाठी जागा योग्य नाही म्हणून लोकांनी तक्रारी केल्या. आवाज उठवला पण व्यर्थ. राख उडत राहते. राखेच्या जीवावर काही गावगुंड उडत राहतात. खरंतर ही राख मिसळल्यास वीट पक्की होते, असा समज पसरला आणि या राखेला चांगले दिवस आले. खरं-खोटं माहीत नाही, वीट पक्की होत असेल. या राखेने खूप घरं उद्ध्वस्त मात्र नक्की केलीत. पण लोकांच्या घरात प्रकाश पडावा म्हणून बीडच्या स्वप्नाची राख खूप आधीपासून होते.