दहशतवाद : द डर्टी ट्रिक्‍स डिपार्टमेंट (एस. एस. विर्क)

SS-Virk
SS-Virk

‘सुखदेवसिंग’ला जिथं ठेवलं होतं तिथंच मी थेट गेलो आणि ‘अपहृत मुलाच्या सुटकेसाठी तुला सोडून देण्याचा निर्णय झाला आहे,’ असं त्याला सांगून टाकलं. त्याच्या प्रतिक्रियेचा मला अंदाज नव्हता. त्या वेळी तो ज्या परिस्थितीत होता ती पाहता सुटका होणं हे कदाचित त्याच्या दृष्टीनं महत्त्वाचं असेल असं मला वाटलं होतं; पण त्याउलट घडलं. त्याला सोडून देण्याच्या निर्णयावर त्यानं नाराजी व्यक्त केली.

‘सुखदेव’ची कहाणी सांगण्याआधी दहशतवादाची त्या वेळची थोडी पार्श्‍वभूमी सांगायला हवी. दहशतवादाविरुद्ध लढणं सोपं नाही. नेहमीच्या कामांपलीकडे जाऊन पोलिस ही लढाई लढत असतात. पोलिसांवर एका बाजूला दहशतवाद्यांच्या हिंसाचाराला आळा घालण्याची जबाबदारी असते, घडलेल्या गुन्ह्यांचा तपास करण्याचीही जबाबदारी त्यांच्यावर असते, त्याही पलीकडे जाऊन माहिती मिळवण्यासाठी गुप्तहेरांचं भक्कम जाळं बांधावं लागतं, तसाच उत्तम टेक्‍निकल सर्व्हिलन्सही लागतो. पोलिसांचा दहशतवाद्यांशी होणारा सामना बऱ्याचदा प्रत्युत्तर स्वरूपाचा असल्यानं, प्रसंग पाहून निर्णय घ्यावे लागतात. या लढाईत यश मिळावं यासाठी आम्ही वेगवेगळी रणनीती आखत असतो. काही वेळा आमची रणनीती ठुस्स होते, काही वेळा आम्हाला मोठं यश मिळतं. यश आणि अपयशाशी आमचा हा लपंडाव कायमच सुरू असतो. 

दहशतवाद्यांच्या विरोधात कारवाई करत असताना कान आणि डोळे उघडे ठेवून आजूबाजूच्या परिस्थितीवर बारकाईनं लक्ष ठेवून अनपेक्षित प्रसंगांना तोंड देण्याच्या तयारीत राहणं आम्हाला क्रमप्राप्त असतं. 

अमृतसरला वरिष्ठ पोलिस अधीक्षक असताना दहशतवाद्यांच्या मनसुब्यांचा अंदाज यावा यासाठी दहशतवादी गटांमध्ये मी माझे खबरे पेरण्याचा प्रयत्न केला होता. दहशतवादी कृत्यांमध्ये काही विशिष्ट पॅटर्न सापडतात का याचाही आम्ही सतत शोध घ्यायचो. खबऱ्यांकडून मिळणाऱ्या माहितीबरोबरच वर्तमानपत्रांमध्ये प्रसिद्ध होणाऱ्या दहशतवादी गटांशी संबंधित बातम्यांवरही आमचं बारकाईनं लक्ष असायचं. दहशतवादी नेहमीच त्यांच्या कारवायांना जास्तीत जास्त प्रसिद्धी मिळवण्याच्या मागं असायचे.

वर्तमानपत्रांमधल्या बातम्यांची कात्रणं काढण्याची जबाबदारी मी स्वतंत्रपणे कर्मचाऱ्यांच्या एका ग्रूपवर सोपवली होती. हल्ले, बॉम्बस्फोटासारख्या कृत्यामागं कोणत्या गटाचा हात आहे, वर्तमानपत्रांमधून त्याची जबाबदारी स्वीकारण्याचा दावा कुणी केला आहे का, दहशतवादी गटांच्या बैठका याचीही माहिती आम्हाला या बातम्यांतून मिळायची. त्यातून आम्ही दहशतवाद्यांच्या भविष्यातल्या कारवायांचा अंदाज घेऊन त्या रोखण्यासाठी रणनीती आखण्याचा प्रयत्न करत होतो. 

त्या काळात वेगवेगळ्या दहशतवादी गटांमध्ये समन्वय राखण्यात ऑल इंडिया सीख स्टुडंट्‌स फेडरेशनची (एआयएसएसएफ) भूमिका महत्त्वाची असे. सुवर्णमंदिराच्या परिसरातल्या एआयएसएसएफच्या कार्यालयात चोवीस तास त्यांच्या सदस्यांचा वावर असायचा. त्यांच्याविषयी अधिकाधिक माहिती मिळवण्याचा माझा प्रयत्न असायचा, वर्तमानपत्रांतल्या बातम्यांमधून अनेकदा मला त्यांच्या हालचालींचा अंदाज येत असे. एआयएसएसएफच्या पत्रकांमध्ये वापरलेल्या भाषेत बदल झाला आहे, त्यांची भाषा बरीच सुधारली आहे असं माझ्या लक्षात आलं होतं. 

त्याच सुमारास पकडलेल्या त्यांच्या काही कार्यकर्त्यांपैकी एकाची विचारपूस करताना भाषेत जाणवलेल्या सुधारणेबद्दल मी त्याच्याकडे विचारणा केली. ‘सुखदेवसिंग’ नावाचा एक नवीन मुलगा एआयएसएसएफमध्ये भरती झाल्याची माहिती त्याच्याकडून मिळाली. ‘सुखदेवसिंग’ हे काही त्याचं खरं नाव नव्हतं. संघटनेत सामील झाल्यावर त्याला हे नाव ‘देण्यात’ आलं होतं. हा नवा मुलगा वयानं कमी, हुशार आणि सुसंस्कृत होता. संघटनेच्या कार्यालयात सचिवाचं काम करताना तो एआयएसएसएफच्या सगळ्या वरिष्ठ नेत्यांचा पत्रव्यवहार, प्रसिद्धिपत्रकांचं लेखन आणि इतर लेखन सांभाळायचा. 

प्रत्यक्ष दहशतवादी कृत्यात सहभागी व्हावं असा या मुलावर त्याच्या गटाचा दबाव असला तरी अजूनपर्यंत कोणत्याही गंभीर गुन्ह्यात त्याचा हात नव्हता. हिंसेचं त्याला वावडं असावं. हिंसाचार सोडून प्रेम आणि सहानुभूतीच्या मार्गानं शीख समाजाचा विश्वास मिळवण्याबाबत तो त्याच्या सहकाऱ्यांशी नेहमी बोलत असे. 

एक दिवस सोळा-सतरा वर्षांचा हा शीख तरुण, ‘सुखदेवसिंग’, आमच्या हाती लागला. वयाच्या मानानं तो बराच समंजस वाटत होता. मी त्याच्याशी बोलायचा प्रयत्न केला. सुरवातीला तो बोलायला तयार नव्हता. बोलत राहिल्यावर मग हळूहळू तो मोकळा होऊ लागला. ‘ऑपरेशन ब्लू स्टार’ झालं त्या वेळी तो अकरावीत होता. एक दिवस नेहमीप्रमाणे चार मित्रांसह सायकली घेऊन शाळेतून परत जात असताना काही लष्करी जवानांनी त्यांना थांबवून त्यांची झडती घेतली. एका जवानानं ‘माझ्याकडे इतक्‍या रागानं का बघतोस रे?’ असं विचारत त्याला एक चापट मारली,‘सुखदेवसिंग’ सांगत होता : ‘‘मी एक साधा, शांत, श्रद्धाळू मुलगा होतो. तो अपमान मला सहन झाला नाही.

मी तिथून निघालो. सायकल आणि पुस्तकं घरी ठेवली आणि घर सोडलं. ‘आता आयुष्यभर शीख धर्मासाठी काम करायचं’ असं ठरवून मी थेट सुवर्णमंदिरात आलो. तिथं माझ्या ओळखीचं असं कुणीच नव्हतं. लंगरमध्ये जेवत असताना एआयएसएसएफच्या एका कार्यकर्त्यानं मला पाहिलं आणि माझी चौकशी केली.’’ 
मग त्या कार्यकर्त्यानंच त्याला तिथं छोटंसं काम दिलं आणि मंदिरपरिसरातच राहायला जागाही दिली. पुढच्या काळात एआयएसएसएफच्या कार्यालयात त्याचं महत्त्व वाढतच गेलं. हिंसाचार त्याला आवडत नव्हता; पण दहशतवादी बनण्याचं ‘प्रशिक्षण’ म्हणून एक-दोन दरोडे घालताना त्याला त्याच्या गटातल्या लोकांबरोबर जाणं भाग पडलं होतं. 

एकंदरीत तो मुलगा चांगला, सभ्य वाटत होता. त्याच्यावर चांगले संस्कार झालेले कळत होते. जो मुलगा चांगला पुत्र, विद्यार्थी, चांगला नागरिक बनू शकला असता तो दहशतवादाच्या वावटळीत त्याच्या मुळांपासून उखडला गेला होता. त्याला तिथून मागं ओढून समाजाच्या मुख्य प्रवाहात आणणं आता तितकसं सोपं नव्हतं. मी मात्र त्याच्याबरोबर शक्‍य तितका जास्त वेळ घालवायचा ठरवलं आणि दहशतवादी संघटनांबद्दल जेवढी माहिती मिळवता येईल तेवढी मिळवण्याचं ठरवलं. 

आमच्या ‘इन्टेरॉगेशन सेंटर’ला मी रोज तासा-दोनतासांसाठी तरी जात असे. काम संपल्यावर मी ‘सुखदेव’शी त्याच्या कुटुंबाबद्दल, मित्रांबद्दल, दहशतवादी संघटनांमधल्या त्याच्या साथीदारांबद्दल बोलत असे. आता तो बऱ्यापैकी मोकळेपणानं माझ्याशी बोलायला लागला होता. आणि तो खरं बोलत होता, हे मला जाणवत होतं. एकतर तो अत्यंत प्रेमळ मुलगा होता. आई-वडील, भावा-बहिणींपासून दुरावला होता. अपमान झाल्यामुळे घर सोडून सुवर्णमंदिरात आल्यानंतर तो एकदाही घरी गेलेला नव्हता. मार खाल्ल्यानंतरही त्याबद्दल काहीच न वाटलेले त्याचे ते चार मित्र त्याला आवडेनासे झाले होते; पण आताचे एआयएसएसएफमधले साथीदारही त्याला आवडत नव्हते. त्यातले काही पैशाचे लोभी होते, गैरव्यवहारांत सहभागी होते, काहींचं चारित्र्य चांगलं नव्हते आणि खुनी प्रवृत्तीचे काही जण हत्यांमध्ये गुंतलेले होते. आजूबाजूचं वातावरण त्याला आवडत नव्हतं; पण त्याला घरीही परत जायचं नव्हतं हे माझ्या लक्षात आलं. त्याच्या घरच्यांनी त्याला परत नेण्याचे प्रयत्न केले होते; पण या मुलानं त्यांना दाद दिली नव्हती. मी त्याला रीतसर अटक केली आणि त्याला न्यायालयातून जामीन मिळवून, खटल्याला सामोरं जायला सांगितलं. त्याच्याविरुद्ध फारसा पुरावा नसल्यानं त्याची निर्दोष सुटका झाली असती. दरम्यानच्या काळात आम्ही दोघं चांगले मित्र झालो होतो. 

‘‘सर, तुमच्याशी बोलायला मला आवडतं. तुमचं वागणं पोलिसासारखं नाही. तुम्ही मला मित्रासारखं, कुटुंबातल्या व्यक्तीसारखं वागवता, बाकीचे काही जण माझ्याशी नीट वागत नाहीत, शिवीगाळ करतात,’’ तो म्हणायचा. 

दहशतवाद्यांच्या कंपूत मला आता एक मित्र मिळाला होता. न्यायालयीन कोठडी मिळाल्यावर त्याला तुरुंगात नेण्यात आलं तेव्हा मी त्याला ‘जामीन मिळाल्यावर माझ्या संपर्कात राहा’ म्हणून सांगितलं. 

त्याला जामीन मिळाला नाही. काही दिवसांनंतर माझा त्याच्याबरोबरचा संपर्क पूर्णपणे तुटून गेला. सन १९८८ च्या मे महिन्यात दहशतवाद्यांच्या गोळीबारात मी जखमी झालो तेव्हा अमृतसरच्या तुरुंगातून त्यानं माझ्यासाठी फोन केल्याचं माझ्या एका सहकाऱ्यानं मला नंतर सांगितलं होतं. त्यानंतर जवळपास वर्षभरानं त्याचा पुन्हा फोन आला. त्याला मला भेटायचं होतं. जवळपास तीन वर्षांनी मी त्याला पाहत होतो.

मधल्या काळात त्याची निर्दोष सुटका झाली होती. तुरुंगातली तीन वर्षं त्यानं वाया घालवली नव्हती. तो बीए पहिल्या वर्गात उत्तीर्ण झाला होता. पुढं काय करावं, याबद्दल मी त्याला मार्गदर्शन करावं अशी त्याची इच्छा होती. मी त्याला पुन्हा दहशतवादाकडे न वळण्याचा सल्ला दिला. त्यानं तो क्षणाचाही विलंब न लावता मान्य केला. तो १९८९ चा सुमार होता. पंजाबमध्ये निवडणुकांचं वारं वाहत होतं. राजकारणात काही जमतंय का पाहा, असं मी त्याला सांगितल्यावर त्यानं एका खासदाराचा स्वीय सहायक म्हणून काम स्वीकारलं. त्याच्या हुशारीमुळे ते खासदार या मुलावर पूर्णपणे अवलंबून राहू लागले होते. दोन वर्षं अशी गेल्यानंतर एक दिवस, त्याला आदरस्थानी असलेल्या माणसाची खूप अस्वस्थ करणारी बाजू त्याच्यासमोर आली. एरवी सज्जन वाटणारा तो माणूस प्रत्यक्षात भ्रष्ट व चारित्र्यहीन असल्याचं त्याच्या लक्षात आलं होतं. त्याला ते काम सोडायचं होतं. ‘आजच्या काळात खऱ्या अर्थानं सज्जन, इमानदार आणि चारित्र्यवान माणसं तुला राजकारणात फार मोठ्या संख्येने सापडणार नाहीत,’ असं सांगून मी त्याला तूर्त काही दिवस तरी ती नोकरी न सोडण्याचा सल्ला दिला. त्यानं ते मान्य केलं. 

पुढं काही दिवसांतच दहशतवाद्यांच्या एका गटानं त्याला गाठून पुन्हा त्यांच्यात सामील होण्यास सांगितलं. एका भेटीत तो मला म्हणाला : ‘‘सर, मी त्यांना समजावण्याचा खूप प्रयत्न केला; पण ते ऐकायला तयार नाहीत. ‘रणजितसिंगसारखं (रणजितसिंगची कहाणी मी आपल्याला या सदरात याआधी सांगितली आहे. सप्तरंग, ता.  ८ व १५ सप्टेंबर २०१९) तुला आणि तुझ्या घरच्यांनाही मारून टाकू’ अशी धमकी त्यांनी मला दिली आहे. काय करावं ते मला समजत नाहीये.’’ त्याच्या कुटुंबीयांचा जीव धोक्‍यात घालण्यापेक्षा मी त्याला दहशतवाद्यांच्या म्हणण्यानुसार वागायचा सल्ला दिला. 

‘‘तू कोणताही मोठा गुन्हा करू नकोस, कुणाचीही हत्या करू नकोस. तू चांगला ड्रायव्हर आहेस. त्यांच्याबरोबर ड्रायव्हर म्हणून राहा. जिवाचा धोका न पत्करता जेव्हा जेव्हा शक्‍य असेल तेव्हा तेव्हा दहशतवाद्यांची माहिती मला देत राहा,’’ मी त्याला सांगितलं. आणि ‘सुखदेवसिंग’ पुन्हा दहशतवादी बनला. 

त्यानंतर त्यानं बऱ्याचदा मला दहशतवाद्यांच्या हालचालींची माहिती दिली,; पण दुर्दैवानं आमच्या यंत्रणांनी त्याचा हवा तेवढा फायदा घेतला नाही. त्याचा गट जास्तकरून मालवा परिसरात सक्रिय होता. मालवा माझ्या हद्दीत येत नसल्यानं त्याच्याकडून मिळणारी माहिती मी नेहमी योग्य त्या अधिकाऱ्यांपर्यंत पोचवायचो; पण आमच्या यंत्रणा त्यानं सांगितलेली एकही घटना रोखू शकल्या नाहीत. मधल्या काळात ‘सुखदेव’चं महत्त्व वाढत चाललं होतं. आता तो पंजाबमधला एक ‘महत्त्वाचा आणि कुख्यात दहशतवादी’ बनला होता. एक दिवस तो अमृतसरला आला असताना त्यानं त्याच्याच गटाची माहिती मला दिली. त्यानंतर झालेल्या धुमश्‍चक्रीत त्याच्या गटाचे दोन लोक मारले गेले. गंभीर जखमी झालेला ‘सुखदेवसिंग’ आणि त्याचे आणखी दोन साथीदार पकडले गेले. आम्ही त्याला सगळी वैद्यकीय मदत दिली, सर्वतोपरी प्रयत्न करून त्याचा जीव वाचवला आणि आता ‘एका अपह्रत मुलाच्या सुटकेसाठी त्याला सोडून द्यावं’ असे आदेश होते. हा सगळा चित्रपट माझ्या डोळ्यांसमोरून सरकत असताना माझ्यासमोर बिकट परिस्थिती उभी होती. सुटका झाली म्हणून सुखदेवला आनंद होईल का? तो दहशतवाद सोडेल का? पुन्हा त्याच्या गटात गेल्यावर आधीसारखा तो माझा इन्फॉर्मर म्हणून काम करेल का? तो खरंच चांगला खबरी होता. त्यानंच दिलेल्या माहितीमुळे तो माझ्या हाती लागला होता. उलटसुलट विचार करतच मी जालंधरला पोचलो. 

त्याला जिथं ठेवलं होतं तिथं मी थेट गेलो आणि ‘अपहृत मुलाच्या सुटकेसाठी तुला सोडण्याचा निर्णय झाला आहे,’ असं त्याला सांगून टाकलं. त्याच्या प्रतिक्रियेचा मला अंदाज नव्हता. त्या वेळी तो ज्या परिस्थितीत होता ती पाहता सुटका होणं हे कदाचित त्याच्या दृष्टीनं महत्त्वाचं असेल असं मला वाटलं होतं; पण त्याउलट घडलं. त्यानं त्याला सोडून देण्याच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली. तो म्हणाला :  ‘‘सर, तुम्ही मला दहशतवाद सोडण्याबद्दल सारखं सांगत असता. मागं एकदा मी तो रस्ता सोडलाही होता; पण माझ्या घरातल्या लोकांचे जीव जाऊ नयेत म्हणून मी पुन्हा त्या रस्त्याला गेलो. दहशतवादाच्या या दलदलीतून मला बाहेर पडायचंय. त्यामुळे मला सुटका वगैरे काही नको. मला कुठंही जायचं नाही. हवं असेल तर तुम्ही मला मारून टाका; पण मी आता परत दहशतवादाकडे जाणार नाही.’’ 

मी त्याला समजावण्याचा खूप प्रयत्न केला; पण तो काही ऐकण्यापलीकडे गेला होता. ‘तू सुटका करून घेतली नाहीस तर तू एक खबरी होतास हे उघड होईल, मग तुझ्या कुटुंबीयांनाही धोका निर्माण होईल,’ असं सांगितल्यावरही तो त्याच्या म्हणण्यावर ठाम राहिला. रात्र झाल्यानं सकाळी पुन्हा त्याच्याशी बोलू, असा विचार करून मी त्याला, ‘वेळ कमी आहे; पण तू विचार कर,’ असं सांगून बाहेर पडलो. मात्र, आमच्यासमोर फार काही पर्याय उरले आहेत असं मला वाटत नव्हतं. 

दुसऱ्या दिवशी सकाळी मी पुन्हा ‘सुखदेवसिंग’कडे गेलो. या गुंतागुंतीवर मार्ग शोधण्यासाठी मी माझ्या टीममधल्या इतरही काही अधिकाऱ्यांना बोलावून घेतलं होतं. वेगवेगळे पर्याय सुचवले जात होते. मी माझ्या सगळ्या सहकाऱ्यांना सांगत होतो की डीजीपीसाहेबांनी आपल्यासमोर दोनच पर्याय ठेवले आहेत. एकतर त्याची सुटका किंवा त्याच्या मृतदेहाचे फोटो. माझ्या मनात असंख्य विचार सुरू होते - बरे आणि वाईट. एकदम माझ्या मनात एक विचार चमकून गेला. मृतदेहाच्या फोटोंमधला माणूस मेलेलाच हवा असं काही नाही. मेल्याचं सोंग रचूनही फोटो काढता येतात. अर्थात हे तितकं सोपं नव्हतं. याचा अर्थ डीजीपीसाहेबांना असत्य सांगावं लागणार होतं, जे मी कधीही केलं नव्हतं आणि तेही सोपं नव्हतं. 

आम्ही आमच्या विश्वासातल्या एका फोटोग्राफरला बोलावलं. मी स्वतः रंगांच्या दुकानातून, काही तासांपूर्वी झालेल्या जखमांमधलं रक्त जसं दिसतं तसा दिसणारा रंग खरेदी करून आणला. सोबत वेगवेगळ्या रंगांचे टोमॅटो केचअप आणले. माझ्या मनात आता माझी कल्पना नीट आकार घेत होती, आशेचा एक किरण दिसत होता. 

मी ‘सुखदेव’ला त्याचा बनियन काढायला सांगितला. मऊसर जमिनीवर पसरून मी त्या बनियनवर तीन गोळ्या झाडल्या. मग गोळ्यांमुळे पडलेल्या तीन छिद्रांभोवती बाकीच्यांनी गडद लाल रंग लावला. ‘सुखदेव’ला आम्ही त्याचे लांब केस मोकळे सोडून, डोळे वर करून जमिनीवर झोपायला सांगितलं. थोडक्‍यात, त्याला मृतदेहाचा अभिनय करायचा होता! ‘सुखदेव’नं चांगलाच अभिनय केला. फोटोग्राफरनं त्याचे वेगवेगळ्या अँगलमधून फोटो घेतले. त्या सगळ्या फोटोंमधून आम्ही सहा चांगले - मृतदेहाचे वाटू शकतील असे - फोटो निवडून त्याच्या कॉपीज्‌ काढून त्यांचे सेट बनवले. 

मी थोड्याच वेळात डीजीपीसाहेबांना भेटायला चंडीगडकडे निघालो. आता एकच प्रश्न होता, गिलसाहेबांशी असत्य बोलण्याचा. त्या विचारानंच मी अस्वस्थ होतो; पण गिलसाहेब अत्यंत अनुभवी अधिकारी होते. फोटो देण्यासाठी मी त्यांची वेळ मागितली होती. संध्याकाळी त्यांच्या कार्यालयात पोचल्यावर त्यांना अभिवादन करून मी सहा फोटोंचे काही सेट असलेलं पाकीट त्यांच्या हवाली केलं. गोळ्यांनी चाळण झालेल्या मृतदेहाचे ते फोटो पाहून ते म्हणाले : ‘‘हं, हे पुरेसं आहे.’’

मी पुन्हा त्यांना अभिवादन करून त्यांचा निरोप घेतला. मी त्यांच्या कार्यालयाबाहेर पडलो आणि गिलसाहेबांनी पुन्हा मला हाक मारली. 
‘‘तुमची खात्री आहे, हा मरण पावला आहे?’’ त्यांनी विचारलं. 
मला एकदम सुटकेचा मार्ग सापडला. ‘‘सर, तो तसा दिसत नाहीये का?’’ मी विचारलं. 
‘‘हो, दिसतोय खरा,’’ ते म्हणाले. 
‘सर, आपल्याला जे हवं होतं तेच मी आपल्याला दिलं आहे,’’ मी म्हणालो. 
मग मी त्यांना सगळी कथा थोडक्‍यात सांगितली. ‘सुखदेव’ची पूर्ण मनःस्थिती आणि ‘डर्टी ट्रिक’ असूनही योग्य परिणाम साधला जाऊ  शकेल असा हाच एक पर्याय आमच्या समोर कसा होता हे मी त्यांना विस्तारानं सांगितलं. पुढचे काही महिने हा माणूस कुणाच्याही नजरेलादेखील पडणार नाही याची काळजीही आम्ही घेत असल्याचंही, मी त्यांना सांगितलं. 

‘मला वाटतं, हे पुरेसं आहे; पण हे कुणालाही कळणार नाही याची दक्षता घ्या,’’ गिलसाहेब म्हणाले. त्यांच्या चेहऱ्यावर समाधान दिसत होतं. 

दुसऱ्या दिवशीच ते फोटो अपहरणकर्त्यांकडे पाठवण्यात आले. ते मिळाल्यावर त्यांनी त्या मुलाची सुटका केली. त्या दिवशी रात्री उशिरा गिलसाहेबांनी मला फोन करून ही बातमी सांगितली. ‘‘मी पुढच्या वेळी जेव्हा जालंधरला येईन तेव्हा आपण या ‘डर्टी ट्रिक प्लॅन’चं यश सेलिब्रेट करू,’’ असंही त्यांनी मला सांगितलं. आपल्या कथेच्या नायकानं दहशतवादाच्या वाटेवर पुन्हा पाऊलही ठेवलं नाही. यथावकाश एका कॉम्प्युटर ॲनालिस्ट तरुणीशी लग्न करून त्यानं संसार थाटला आणि आता ते दोघंही त्यांच्या मुलासह पंजाबमधल्या एका शहरात सुखात आहेत. 

(गेलं वर्षभर ‘साप्ताहिक’ असलेलं हे सदर नव्या वर्षी ‘पाक्षिकं’ असेल.)

(या कहाणीतल्या काही व्यक्तींची आणि स्थळांची नावं बदलण्यात आलेली आहेत.) 
(या लेखाचे बौद्धिक संपदा हक्क लेखकाकडे आहेत.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com