मैंने ‘ब्रेक-अप’ कर लिया...

आपल्या नात्यांची काही वेळा अखेर होते... कुणाचं ‘ब्रेक-अप’ होतं आणि ते अतिशय वाईट प्रकारे होतं. ती अवस्था मी पाहिलीय मित्रांनो.
Break Up
Break UpSakal
Summary

आपल्या नात्यांची काही वेळा अखेर होते... कुणाचं ‘ब्रेक-अप’ होतं आणि ते अतिशय वाईट प्रकारे होतं. ती अवस्था मी पाहिलीय मित्रांनो.

- चेतन भगत chetanbhagat@gmail.com, @chetan_bhagat

नमस्कार मित्रांनो!

आपल्या नात्यांची काही वेळा अखेर होते... कुणाचं ‘ब्रेक-अप’ होतं आणि ते अतिशय वाईट प्रकारे होतं. ती अवस्था मी पाहिलीय मित्रांनो. ही गोष्ट तुमच्यासाठी, तुमची ऊर्जा, तुमचं मन यासाठी अजिबात चांगली नसते. ही गोष्ट भावनिकदृष्ट्याही अजिबात चांगली नसते; तसंच ती शारीरिकदृष्ट्याही अत्यंत हानिकारक ठरू शकते. त्याचा तुमच्या झोपेवर परिणाम होऊ शकतो, तसंच ते तुमच्या आरोग्यासाठीही अपायकारक ठरू शकतं.

त्यामुळे आज मला तुम्हाला ‘ब्रेक-अप विथ डिग्निटी’बद्दल आणि ते किती महत्त्वाचं आहे याबद्दल सांगायचं आहे. ‘ब्रेक-अप विथ डिग्निटी’ म्हणजे काय? मी एक सुंदर ट्‌विट वाचलं होतं, ते ट्‌विट होतं अनुपम खेर यांचं. त्यात त्यांनी म्हटलं होतं, ‘टूटे हुए रिश्‍तों की भी एक मर्यादा होती है..’ किती सुंदर वाक्‍य आहे पाहा. तुटलेल्या, मोडलेल्या गोष्टींबद्दलसुद्धा एक ‘डिग्निटी’ असते.

समजा, एक गर्लफ्रेंड - बॉयफ्रेंड आहेत, त्यांच्या नात्याचा गोफ अगदी घट्ट गुंफलेला आहे. ते दोघे वर्षभर... दोन वर्षं, तीन वर्षं एकत्र आहेत आणि अचानक त्यांचं नातं तुटतं... त्यांचं ‘ब्रेक-अप’ होतं, मग ते कुठल्याही कारणाने असेल, त्यात चूक कुणाचीही असेल... म्हणजे त्यात एक जण ‘ब्रेक-अपर’ असेल (ज्याच्यामुळे ते नातं तुटलं) आणि एक जण ‘ब्रेक-अपी’ असेल (ज्याला त्याची झळ बसली), किंवा ‘ब्रेक-अप’ला दोघंही कारणीभूत असतील किंवा एका कुणाची चूक असेल... किंवा दोघांपैकी कुणाचीच चूक नसेल... कारण काहीही असेल, त्याला जबाबदार कुणीही असेल, आत्ता आपल्याला त्याबद्दल चर्चा करायची नाहीये.

ब्रेक-अप अनेक गोष्टींमुळे होऊ शकतं आणि त्याला अनेक गोष्टी कारणीभूत असू शकतात. तसंच, प्रत्येकाची ‘केस’ वेगवेगळी असते. हा लेख ‘ब्रेक-अप कसं टाळावं’ हे सांगणारा नाहीये किंवा ब्रेक-अपचं समर्थन करणाराही नाहीये. प्रत्यक्ष आयुष्यात ‘सैयाजी से आज मैंने ब्रेक-अप कर लिया’ असं डिस्कोमध्ये गात-नाचत ब्रेक-अप होत असतील, असं मला वाटत नाही. समजा, कुणी ब्रेक-अपनंतर असं गात-नाचत असेल, तर ते ब्रेक-अपचं दुःख लपवण्यासाठी असेल... आपल्या मनातल्या खऱ्याखुऱ्या भावनांना तोंड द्यावं लागू नये यासाठी ते ड्रिंक्‍स घेत असतील, पार्ट्या करत असतील; मनातल्या खऱ्याखुऱ्या, अत्यंत यातनादायी भावना लपवत असतील. इथं आपण या सगळ्याचा विचार करायला नको.

मला तुम्हाला सांगायचं आहे की, तुमचं ब्रेक-अप होणारच असेल, तर ते ‘डिग्निटी’पूर्वक करा. तुम्हाला सांगतो, ब्रेक-अप फक्त रोमॅंटिक रिलेशनशिपच्याच बाबतीत होतं असं नाही... ते फक्त गर्लफ्रेंड- बॉयफ्रेंडमध्येच होतं असं नाही, तर ते मित्र-मैत्रिणींमध्येही होतं. तुमच्या ‘बेस्ट फ्रेंड’शीसुद्धा तुमचं ब्रेक-अप होऊ शकतं... तुमच्या मैत्रीची अखेर होऊ शकते. बिझनेसमध्येसुद्धा अनेकदा ब्रेक-अपला तोंड द्यावं लागतं. क्‍लायन्ट, ग्राहक, सर्व्हिस प्रोव्हायडर या कुणाशीही तुमचं ब्रेक-अप होऊ शकतं. ब्रेक-अप ही गोष्ट कुणाच्याही बाबतीत घडू शकते. मग प्रश्‍न असा येतो की, जेव्हा सगळीच दानं उलटी पडत जातात... मग ते दोन प्रेमींदरम्यान असो, वा व्यावसायिक संबंधांच्या बाबतीत, तेव्हा काय करायचं? ही परिस्थिती, ही अवस्था कशी हाताळायची?

इथं तुमची परिपक्वता आणि सुज्ञता कामी येते. अशा वेळी मला तुम्हाला आवर्जून सांगायचं आहे की, ऑलवेज ब्रेक-अप विथ डिग्निटी.

सामान्यतः ‘ब्रेक-अप’ हा शब्द गर्लफ्रेंड - बॉयफ्रेंड यांच्या नात्याच्या अखेरीबद्दलच वापरला जातो. आपणही असे ब्रेक-अप पाहत असतो... अगदी गंदेवाले ब्रेक-अप, त्यात एकजण दुसऱ्याला शिव्या देतो... दुसरा पहिल्याला देतो. त्यात फक्त शिव्याच नसतात (ते फारच सौम्य झालं!), तर ते एकमेकांना अतिशय दुखावणाऱ्या... ‘लागणाऱ्या’ गोष्टी बोलतात... मग त्यात एकमेकांचं व्यक्तिमत्त्व, चारित्र्य, वागणं, रूप, आई-वडील, बालपणी वाटणारी असुरक्षितता अशा कशाकशाचा उद्धार होतो.

हे का घडतं, तर ते तुमचे प्रियतम असतात आणि या सगळ्या गोष्टी त्यांना माहीत असतात. तुम्ही जेव्हा प्रेमात आकंठ बुडालेले असता, एकमेकांशी ‘डेटिंग’ करत असता, तेव्हा तुम्ही एकमेकांना तुमची अगदी खासमखास गुपितंसुद्धा सांगितलेली असतात, कारण त्या वेळी तुम्हाला ती व्यक्ती या पृथ्वीवरील सर्वांत ‘अमेझिंग’ वगैरे वाटलेली असते आणि तुम्ही त्या व्यक्तीशी सग्गळं सग्गळं शेअर केलेलं असतं. आता जेव्हा तुम्ही एकमेकांचे शत्रू बनता, तेव्हा तुम्ही ही गुपितं एकमेकांविरुद्ध शस्त्रं म्हणून वापरता. या माणसाचं त्याच्या वडिलांशी किंवा आईशी अमक्‍या बाबतीत पटत नाही, हे तुम्हाला माहीत असतं. आता तुम्ही जेव्हा एकमेकांचे शत्रू बनता, तेव्हा तुमचा पवित्रा ‘‘तुझं कुणाशीच पटत नाही. तुला तुझ्या आई-वडिलांशीही पटवून घेता आलं नाही, तर तू माझ्याशी काय पटवून घेणार,’ असा असतो. तुम्ही तुम्हाला माहीत झालेल्या गोष्टीला अशा प्रकारे शस्त्राची धार लावता.

याला ‘डिग्निटीवाला’ ब्रेकअप म्हणता येणार नाही. दोघांपैकी कुणीही अशा प्रकारच्या कॉमेंट्‌स करणं योग्य नाही. अशा वेळी तुमचं मन घायाळ असतं, परिस्थिती वाईट झालेली असते, तुमच्या प्लॅननुसार काहीही घडत नसतं. तुम्ही त्या व्यक्तीसोबत चांगल्या भविष्याची कल्पना केलेली असते, स्वप्नं रंगवलेली असतात; पण प्रत्यक्षात तसं घडत नाही, तरीही तुम्ही भान राखायला हवं. ब्रेक-अप करताना तुम्ही ‘डिग्निटी’ राखायलाच हवी.

आपण या व्यक्तीसोबत खूप चांगले क्षण अनुभवलेले आहेत आणि या क्षणांच्या मधुर स्मृती आहेत, ही गोष्ट तुम्ही विसरता कामा नये. या व्यक्तीवर आपलं खूप खूप प्रेम होतं... इतकं की, आपल्या मनात दुसऱ्या कशाचा विचारसुद्धा नव्हता, ही गोष्ट तुम्ही विसरता कामा नये. आता तुमच्यात ते बंध राहिले नाहीत, ती व्यक्ती तुमच्या आयुष्यातून दूर निघाली आहे, अशा वेळी तुम्ही एकमेकांना दुखावू नका. ना शब्दांनी, ना वागण्याने, ना शारीरिक हिंसेने... अशा कुठल्याही गोष्टी कधीही करू नका. समजा, असं काही केलं नाही, तर बरेचदा लोक एकमेकांना ‘ब्लॉक’ करतात. मी त्याला फेसबुकवर ब्लॉक केलं... इन्स्टाग्रामवर ब्लॉक केलं... ब्लॉक... ब्लॉक... ब्लॉक....

ठीक आहे, तुम्ही जर ब्रेक-अपमुळे अतिशय दुःखात असाल, ‘हर्ट’ असाल आणि त्यातून सावरण्यासाठी त्या व्यक्तीला ‘ब्लॉक’ करणं एवढाच एकमात्र मार्ग असेल, तर हरकत नाही. पण, जर तुम्ही त्या व्यक्तीला ‘हर्ट’ करण्यासाठी ते करत असाल, तर ते योग्य नाही, ही ‘डिग्निटी’ नाही.

तुम्ही ‘ब्लॉक’ कुणाला करता? पूर्णतः अनोळखी लोकांना, तुमचा पिच्छा पुरवणाऱ्या लोकांना; पण कधीकाळी तुम्हाला ज्या व्यक्तीसोबत आयुष्य व्यतीत करायचं होतं, तुम्ही तुमचं आयुष्य... तुमचं सर्वस्व जिच्यासोबत शेअर करत होतात, त्या व्यक्तीने तुमचं इन्स्टाग्राम पाहिलेलंसुद्धा आता तुम्हाला सहन होत नाही. इतर हजारो लोक जे पाहू शकतात, ते त्या व्यक्तीने मात्र पाहायचं नाही, हा काय प्रकार आहे? ही ‘डिग्निटी’ आहे... मॅच्युरिटी आहे... पोरकटपणा आहे... का आचरटपणा आहे, हे तुम्हीच ठरवा.

तुम्ही या दुःखातून बाहेर येण्यासाठी त्या व्यक्तीला ‘ब्लॉक’ करत असाल, तर ठीक आहे; पण तरीही ही कल्पना मला फार चांगली वाटत नाही. हे अतिशय मन दुखावणारं असतं... अत्यंत ‘हर्टफुल’!

ब्रेकअपनंतर तुम्ही एकमेकांचे मित्र बना असं मी म्हणणार नाही, ती अगदी आदर्श वगैरे गोष्ट झाली; पण प्रत्यक्षात असं होत नाही. जेव्हा नातं तुटतं, तेव्हा सगळं संपतंच. ‘ब्रेक-अप’नंतर काही जणांच्या बाबतीत ‘ओके फाइन, वी आर जस्ट फ्रेंड्‌स’ असं होत असेल; पण बऱ्याच जणांना ते शक्‍य होत नाही. पण तरीही तुम्ही ‘शांततेने’ जगू शकता. ही ‘शांती’ म्हणजे प्रेम नव्हे, ममत्व नव्हे... शांती म्हणजे शांती. याचा अर्थ - तू तुझ्या वाटेने जा... मी माझ्या वाटेने जातो. तुम्ही अशा प्रकारच्या शांततेने जगू शकता. ब्रेक-अप झालं म्हणून तुम्ही एकमेकांना ‘ब्लॉक’ करायचं, एकमेकांना शिव्याशाप द्यायचे, अपशब्द वापरायचे, एकमेकांना ‘हर्ट’ करायचं, हे योग्य नाही.

आयुष्याची वाट तशी मोठी असते, त्यात बरीच वळणं येतात. आणखी पाच-दहा वर्षांनी तुम्हाला ‘तीच’ व्यक्ती या वाटेवर पुन्हा भेटू शकते. विशेषतः बिझनेसच्या संदर्भात हे घडू शकतं. फिल्म इंडस्ट्रीमध्ये हे बरेचदा घडतं. एखाद्या गोष्टीवरून लोकांचं भांडण होतं, त्यांच्या वाटा वेगळ्या होतात; पण दोन-तीन वर्षांनी एखाद्या प्रोजेक्‍टसाठी ते पुन्हा एकत्र येऊ शकतात. पण जर त्यांचे संबंध अतिशय वाईट पद्धतीने तुटले असतील, तर मात्र त्यांनी पुन्हा एकत्र येऊन काम करणं अशक्‍य असतं. हेच तर ते ‘डिग्निटी’पूर्वक वेगळे झाले असतील, तर ते पुन्हा एकत्र येऊ शकतात.

हीच गोष्ट ‘एक्स’च्या बाबतीतही घडू शकते. कधीकधी ते पुन्हा एकत्र येतात; पण अगदी तसं घडत नाही, तरी किमान त्यांच्यात मैत्री राहू शकते किंवा किमान ते कुठल्या ना कुठल्या प्रकारे एकमेकांच्या उपयोगी पडू शकतात. जर तुमचा ब्रेक-अप ‘डिग्निटीवाला’ असेल, तर वर्ष-दोन वर्षांनी तुमची गर्लफ्रेंड तुम्हाला तुमच्यासाठी अनुरूप असलेली एखादी नोकरी सुचवू शकेल, कारण ती तुम्हाला चांगल्या प्रकारे ओळखत असते; पण जर तुमचा ‘गंदावाला’ ब्रेक-अप झालेला असेल, तर मात्र हा रस्ताच बंद होतो. तुम्ही जर एकमेकांवर शाब्दिक हल्ले चढवले असतील, शिव्याशाप दिले असतील, तर तुम्ही परतीचे दोर कापलेले असतात. हे काही बरं नव्हे.

जेव्हा तुम्ही त्या व्यक्तीला ‘ब्लॉक’ करता, तिला दुखावता, तेव्हा तुम्हाला स्वतःलाही त्रास होतो. तुमचं ज्या व्यक्तीवर प्रेम असतं, तिला दुखावणं तुमच्यासाठीही सोपं नसतंच.

दुसरी गोष्ट म्हणजे, आयुष्यात पुढे कधीतरी तुमची गाठ पडू शकते, तुमची एकमेकांना मदत होऊ शकते. आता तुम्ही एकत्र नसलात म्हणून काय झालं? आयुष्यात फक्त एवढंच आहे का? आयुष्यात इतर लोक, इतर गोष्टी नाहीत का? आयुष्यात तुमची काही ध्येयं असतील, तशी त्या व्यक्तीचीही असतील. अशा वेळी तुम्हाला ‘‘तुझ्या जाण्याचं खूप वाईट वाटतंय; पण तू जिथं असशील तिथं मजेत राहा, खूश राहा,’’ असं म्हणता येणार नाही का?

यामुळे तुमचं दुःख, तुमची वेदना कमी होणार नाही, तुम्हाला त्याचा त्रास होईलच; पण तुम्हाला जखम झाली म्हणून दुसऱ्याला दगड मारण्याने ती जखम बरी होत नाही हे लक्षात ठेवा. मुळात कुणाचं ब्रेक-अप होऊच नये; पण जर कुणाचं ‘ब्रेक-अप’ झालं (जे अगदी कॉमन आहे!), तर ते ‘डिग्निटी’ने करा.

(सदराचे लेखक तरुण पिढीचे आवडते साहित्यिक आहेत.)

(अनुवाद : सुप्रिया वकील)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com