
विजय नाईक - editor@esakal.com
‘दलित पँथर्सचा झंझावात’ हे जयदेव गायकवाड यांचे पुस्तक महाराष्ट्रातील जातीय अन्याय, दलित चळवळीचा इतिहास आणि आजच्या विखुरलेल्या दलित नेतृत्वाचे वास्तव स्पष्टपणे समोर आणते. हे पुस्तक म्हणजे महाराष्ट्रातील दलित पँथर्स चळवळीच्या इतिहासाच्या उदयास्ताचा संक्षिप्त माहितीकोशच होय. जयदेवने, ‘‘आंबेडकर चळवळीला क्रांतिकारी वळण देणारा माझा भाऊ नामदेव ढसाळ’’ यास ते अर्पण केले आहे. ढसाळ हा जयदेव गायकवाड यांचा सख्खा मावसभाऊ. मनोगतात जयदेव गायकवाड म्हणतात ‘‘१९७२ ते १९८२ आमच्या आयुष्यातील या दहा वर्षांतील प्रत्येक दिवस पँथर्ससाठी होता.’’ पँथर्सची स्थापना का झाली, असा सवाल उपस्थित करून ते म्हणतात, ‘‘देशाच्या स्वातंत्र्याला २५ वर्षे पूर्ण होत असताना देशात अस्पृश्यांवर अत्यंत हीन स्वरूपाचे अत्याचार होत होते आणि नेमक्या याच वर्षात १९७२ मध्ये महाराष्ट्रात दलितांवर अत्यंत क्रूर स्वरूपाच्या अन्यायाच्या घटना घडल्या होत्या. परभणी जिल्ह्यात दोन बौद्ध महिलांना विवस्त्र करून त्यांची नग्न धिंड काढली होती.