
- डॉ. दिनेश कात्रे, dineshkatre2009@gmail.com
आत्तापर्यंत आपण शिक्षणात आणि व्यवसायात एकमेकांशी स्पर्धा करून जीवन जगत आलो आहोत, परंतु आता कृत्रिम बुद्धिमत्तेशी (Artificial Intelligence) स्पर्धा करून, आपल्याला स्वतःची व्यावसायिक उपयुक्तता सिद्ध करण्याची वेळ आलेली आहे. त्यासाठी ज्या गोष्टी कृत्रिम बुद्धिमत्ता करू शकते, त्या वगळून, स्वतःच्या गुण वैशिष्ट्यांवर लक्ष केंद्रित केले तरच या नैसर्गिक विरुद्ध कृत्रिम बुद्धिमत्तेच्या स्पर्धेमध्ये आपण विजय प्राप्त करू शकू.
या मागचे प्रमुख कारण म्हणजे स्मरणशक्तीवर आधारित अनेक तांत्रिक कामे आता संगणक माणसांपेक्षा अचूक आणि कमी वेळात करू लागला आहे. परिणामतः अशा कामांसाठी एखाद्या माणसाला पगारी नोकरीवर ठेवण्यापेक्षा कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करणे हे जास्त फायदेशीर ठरेल यात तिळमात्र शंका नाही!
चार पुस्तकं जास्त वाचलेल्या माणसाला आजवर आपण उच्चशिक्षित म्हणत आलो आहोत. अशी पुस्तकं पाठ करून स्मरणात ठेवणे आणि पुस्तकात दिल्याप्रमाणे प्रश्नांची योग्य उत्तरे देता येणे, याला आपण हुशारी समजत आलो आहोत. परंतु केवळ तोंडपाठ केलेल्या ज्ञानावर आता आपल्याला नोकरी / व्यवसाय करणे दिवसेदिवस अवघड होणार आहे.
कारण कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (Artificial Intelligence) क्षेत्रात प्रचंड प्रगती झालेली असून संगणक (Computer) आता कोणत्याही शैक्षणिक आणि पुस्तकी विषयावर अतिशय अचूक उत्तरे देऊ लागला आहे.
स्मरणशक्तीच्या साहाय्याने एखादा विद्यार्थी २५ वर्षे अभ्यास करून जे काही विषय समजावून घेऊ शकतो त्यापेक्षाही विश्वभरातील कितीतरी पटीने जास्त माहिती कृत्रिम बुद्धिमत्तेच्या प्रणालीमध्ये साठवली जाऊ शकते (Machine Learning Model Training) आणि तीही अत्यंत कमी वेळामध्ये.
अशा कृत्रिम बुद्धिमत्तेची प्रणाली इंटरनेटवर अतिशय सहज आणि सर्वांना मोफत उपलब्ध आहे. विशेष म्हणजे अशी प्रणाली जगभरातील लोक जेवढ्या जास्त प्रमाणात वापरतील तेवढी ती अतिशय कुशाग्र आणि अचूक होत जाते. यामध्ये, यंत्रबोध प्रक्रियेचा (Machine Learning) वापर करण्यात येतो.
कोणतेही उच्च शिक्षण घेण्यासाठी तयार करण्यात आलेल्या प्रवेश परीक्षांचे पेपर देखील संगणक, कृत्रिम बुद्धिमत्तेच्या साहाय्याने अतिशय अचूकपणे सोडवू लागला आहे. त्यामुळे अशा प्रवेश परीक्षा विद्यार्थ्यांचे मूल्यमापन करण्यास कितपत उपयोगी आहेत ? हा एक नवीन प्रश्न निर्माण झाला आहे.
थोडक्यात सांगायचे तर केवळ पाठांतर आणि स्मरणशक्तीवर (memory) आधारलेली शिक्षण पद्धती ही आता कालबाह्य झाल्यात जमा आहे ! याचा परिणाम म्हणून नजीकच्या काळात केवळ स्मरणशक्तीवर आधारीत कामांसाठी आता माणसांची गरज भासणार नाही. त्यामुळे केवळ पुस्तकी ज्ञानावर अवलंबून असलेल्या नोकऱ्या कमी होण्याची दाट शक्यता आहे!
निर्मितीशील कृत्रिम बुद्धिमत्ता
कृत्रिम भाषा निर्मिती (Generative Language Model) या पद्धतीवर आधारित Chat GPT प्रणाली इंटरनेटवर मोफत उपलब्ध आहे. या प्रणालीला आपण गणित, विज्ञान, इतिहास, भाषा, कायदा आणि व्यवहारातील इतर सर्व विषयांवर कोणतेही प्रश्न विचारून त्यांची उत्तरे तात्काळ मिळवू शकतो. Chat GPT आपल्याला लेखनामध्ये साहाय्य करू शकते. त्यामुळे साहित्य चोरी (Plagiarism) संदर्भात नवीन समस्या निर्माण झाली आहे.
तसेच कृत्रिम चित्र निर्मिती (Artificial Art Generator) करणाऱ्या अनेक प्रणाली उपलब्ध झाल्या आहेत, त्यांच्या साहाय्याने आपण केवळ सूचना देऊन हवी तशी चित्र निर्मिती करू शकतो. त्यात निर्माण होणारी चित्रे अतिशय फोटोग्राफिक असतात, त्यामुळे खरा फोटो कोणता आणि खोटा फोटो कोणता हे ओळखणे अतिशय कठीण जाते.
संयुक्त राष्ट्रसंघानं २०२३ मध्ये प्रकाशित केलेल्या जागतिक लोकसंख्येसंदर्भातील अहवालानुसार भारतामध्ये एकूण १४२ कोटी लोकसंख्येपैकी ६० कोटी लोकसंख्या ही वय वर्षे १८ ते ३५ या वयोगटात म्हणजे सर्वांत तरुण आहे तर आज भारताची २६ टक्के लोकसंख्या ही वय वर्षे १० ते २४ या वयोगटात आहे. पाश्चिमात्य देशांच्या तुलनेत भारत देश हा सर्वांत तरुण आहे. भारत देश या तरुण रक्ताच्या बळावर जागतिक बाजारपेठेमध्ये नवे स्थान मिळवू पाहात आहे.
पण या आकडेवारीवरून असाही ढोबळ तर्क काढता येऊ शकतो की वय वर्षे २५ च्या वरील विद्यार्थी हे मुख्यतः स्मरणशक्तीवरील आधारित शिक्षण पद्धतीमध्ये शिकलेले आहेत. त्यामुळे या कृत्रिम बुद्धिमत्तेच्या पार्श्वभूमीवर त्यांना आपली व्यावसायिक उपयुक्तता विशेष प्रयत्न करून सिद्ध करावी लागेल.
कृत्रिम बुद्धिमत्तेच्या आव्हानापुढे टिकून राहण्यासाठी आपल्याला शिक्षण पद्धतीमध्ये मोठा बदल करण्याची आवश्यकता आहे. जे विद्यार्थी सध्या शिक्षण घेत आहेत व खास करून जे अजूनही शालेय वयोगटात आहेत, त्यांना आपण नव्या पद्धतीचे शिक्षण देऊ शकतो, जेणेकरून ते आपली व्यावसायिक उपयुक्तता वाढवू शकतील.
कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे निर्माण झालेल्या नवीन आव्हानांना तोंड देण्यासाठी आपल्याला प्रचलित शिक्षणपद्धतीमध्ये काही मौलिक बदल करण्याची गरज आहे. यामध्ये विद्यार्थ्यांचे अंगभूत गुण आणि मानसिक कल ओळखून मग योग्य त्या विषयामध्ये नावीन्य निर्मिती (innovation), प्रत्यक्ष समस्या निवारण (real world problem solving), सृजनात्मक (creative) आणि रचनात्मक (design) निर्मिती, कार्यानुभव ( practical knowledge), हस्तकौशल्य (hands-on skills), व्यवसायिक ज्ञान (business skills), जीवनावश्यक कौशल्य ( life skills), प्रयोगातून ज्ञान ( experimental knowledge), आधुनिक विज्ञान आणि तंत्रज्ञान (Science & Technology) यावर पूर्ण भर दिला पाहिजे.
शिक्षण क्षेत्रातील कोणत्याही विषयामधील माहिती ही विद्यार्थ्याला सजग करण्यासाठी असावी परंतु त्याचे मूल्यमापन हे वर नमूद केलेल्या कौशल्यांवर आधारित असावे. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या आव्हानापुढे टिकायचे असेल तर केवळ पाठांतर आणि छापील प्रश्नोत्तरांवर कमी भर द्यायला हवा.
त्यासाठी आवश्यक त्या शैक्षणिक सुविधा (infrastructure and facilities) निर्माण करण्यासाठी व शिक्षणपद्धतीमध्ये बदल करण्यासाठी सरकारने ठोस पावले उचलावी लागतील. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या आक्रमणामुळे, सजग पालकांनी देखील आपापल्या पाल्याच्या शिक्षण आणि संगोपनामध्ये आवश्यक तो बदल करण्याची गरज निर्माण झाली आहे.
(लेखक मानव-संगणक- इंटरफेस या क्षेत्रातील संशोधक व सीडॅकचे माजी वरिष्ठ संचालक आहेत.)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.