काव्याचा वेधक धांडोळा

मूलतः कवितेची चर्चा, कवितेची मीमांसा करणारे मराठीतील लेखन; ही सातत्यशील घडणारी घडामोड आहे.
kavyasvya book
kavyasvya booksakal

मूलतः कवितेची चर्चा, कवितेची मीमांसा करणारे मराठीतील लेखन; ही सातत्यशील घडणारी घडामोड आहे. एखादे पक्के सूत्र आखून, कधी भाषिक, सामाजिक व्यूह घेऊन तर कधी व्यक्ती अथवा प्रवाह निवडून काव्यांची मीमांसा होत असते. म. सु. पाटील, वसंत पाटणकर, सुधीर रसाळ, अक्षयकुमार काळे, चंद्रकांत पाटील अशी काही सहज सुंदर परंतु ठळक स्वरूपाची नावे काव्यसमीक्षेत मौलिकतेच्या पातळीवर आठवतात.

आलोचनेचा हा या प्रकारचा प्रदेश मराठीत विस्तारशील आणि गुणवत्ताधिष्ठता म्हणूनही स्वाभाविकच महत्त्वाचा आहे. काव्यसमीक्षेचा एक महत्त्वाचा उल्लेख म्हणून विश्वास वसेकर यांच्या ‘काव्यस्व’ समीक्षाग्रंथाची नोंद स्वाभाविकच करता येईल.

ग्रंथशीर्षकापासूनच उत्कंठा वर्धित करणारा हा ग्रंथ अगदी कमीअधिक पावणेतीनशे पानांचा असून त्यातील काव्यचर्चा ही ‘काव्यस्व’, ‘काव्यप्रवाह’, ‘उर्दू कविता’, ‘समीक्षेची समीक्षा’ अशा विस्तृत चार भागांमध्ये वाचावयास मिळते.

खरं तर या एका पुस्तकाची दोन पुस्तकंसुद्धा सिद्ध करता येणं शक्य होतं. कारण अतिशय वाचनीय अशा ‘उर्दू कवितेसंबंधी’ स्वतंत्र पुस्तकही वसेकरांची नवी ओळख सिद्ध करू शकणारे ठरू शकले असते.

कारण उर्दू विभागातील मिर्जा गालिब, गुलजार किंवा गजल, नवीन गजल ह्या लेखशीर्षकांखाली ग्रंथामध्ये प्रविष्ट झालेला मजकूर पुष्कळसा आशयसमृद्ध आणि नावीन्यपूर्ण आहे. उर्दू काव्यमीमांसेमुळे या ग्रंथाचा ‘मुलुख’ भारतीय काव्यचर्चेच्या दृष्टीने जास्त उन्नत, जास्त उत्तमच झाला आहे. वसेकरांची ही मांडणी ग्रंथाचा परिघ रुंदावणारी म्हणायला हवी.

हे खरेच की, मराठी कविता विविध वाटा, वळणांनी सतत समृद्ध होत गेलेली कविता आहे. आशय, शैली, भाषा, प्रतिमा, प्रदेश, विचार, भाव, कल्पना या आणि अशा इतरही किती तरी संदर्भात मराठी कवितेची समृद्धी निरंतर वाढत राहिली.

वा. ल. कुळकर्णी यांच्या भाषेतच नोंदवायचं झालं तर ‘कविता- नवी, जुनी’ असे म्हणतानाही कवितेचा प्रांत, कवितेचे काळ आणि त्या त्या काळातील संपन्न स्वरूपाची मराठीची कविता ही वाचनसंस्कृतीला कायम लोभस वाटत राहिली. शिवाय, अशा जुन्या, नव्या कवितांची/ काव्यआलोचनेची आनंददायक मैफल म्हणूनही ‘काव्यस्व’ ग्रंथाचा विचार करता यावा.

या ग्रंथातील गद्य ओवी, भास्कर भट्टांची कविता, बी. रघुनाथांची कविता इथपासून ते आरती प्रभू, शांताबाई, सुरेश भट, ग्रेस, फ. मुं. शिंदे, उद्धव कानडे, भालेराव यांच्या काव्यप्रतिभेसंबंधी वसेकरांनी केलेले या ग्रंथातील विवेचन नक्कीच वाचनीय झालेले आहे. शिवाय नव्याने काव्यसंशोधनाकडे वळणाऱ्या अभ्यासकांनाही एक संदर्भसाधन म्हणूनही ‘काव्यस्व’ हा ग्रंथ जसा आधार देईल आणि आनंदही देईल.

ग्रंथातील आरंभीचा विभाग हा वस्तुतः ‘कवी’ केंद्रवर्ती ठेवत गतिमान काव्यचर्चा घडविणारा असून `काव्यप्रवाह’ ह्या दुसऱ्या भागातून प्रवाहनिष्ठ साहित्याची अधिक मीमांसा आलेली आहे. काव्यप्रवाह- या भागातून एकंदरीत जाणवणारी सैद्धांतिकता आणि सूत्रबद्धता अधिक अशी गोळीबंद म्हणावी, अशा स्वरूपाची आहे.

त्यातील मूलतः बालकविता, प्रेमकविता, ग्रामीण कविता, विडंबन कविता किंवा स्त्री जाणिवांच्या कविता, आदिवासी कविता हे आठ लेख प्रवाहनिष्ठ असून समकालीन एकूण मराठी काव्यक्षेत्राच्या दृष्टीने ते वाचनीय झालेले आहेत. तथापि, ‘मराठी ग्रामीण कविता’ हा लेख पूर्वसूरींच्या मांडणीप्रमाणे होत गेला असल्यामुळे त्यातील नावीन्य किंवा निराळेपण हे फारसे जाणवणारे नाही.

उर्दू कवितेचा विभाग मात्र अर्थात खूपच समृद्ध झालेला असून ‘काव्यस्व’ या ग्रंथाचा बाज त्यामुळे अधिक ढळढळीत सिद्ध होत गेलेला आहे. कारण खुद्द वसेकरांचाही उर्दू साहित्यासंबंधीचा व्यासंग आणि त्यांचे या क्षेत्रातील दीर्घकालीन चिंतन हे मराठी वाचकांना विदितच आहे.

शिवाय या ग्रंथातील ‘समीक्षेची समीक्षा’ हा सुद्धा ग्रंथाअखेरीस समाविष्ट केलेला भाग वाचनीय आहे. या भागातील एकूण सात लेख अभ्यासदृष्टी म्हणून शिवाय, पायाभूत, ठळक मुद्यांना धरून झालेली लेखांची मांडणी म्हणूनही ते वाचकलक्ष वेधून घेणारे लेख आहेत.

काव्यतत्त्व आणि काव्यमहत्त्व यासंबंधीची चर्चा मराठीत आणि मराठीला नवी नाही. समीक्षा क्षेत्राला काव्यप्रवाहांनी सतत भुरळ पाडली. तद्वतच आव्हानही दिले; हे नव्याने सांगण्याची गरज नाही. ही एकूण घडामोड समीक्षेत सततच होत राहिली; होत राहातेच.

मराठीच्या आलोचना- परंपरेत अनेक महत्त्वाच्या ग्रंथांची सतत भर पडतच गेली आहे. त्यात दुर्लक्ष होऊ नये इतपत ‘काव्यस्व’ या काव्यसमीक्षा ग्रंथाची भर विचारात घ्यावी, अशी निश्चितच आहे. अंतर्बाह्य निर्मिती म्हणूनही हा ग्रंथ मजबूत आणि सौंदर्यपूर्ण असाच झाला आहे.

पुस्तकाचं नाव : काव्यस्व

लेखक : प्रा. विश्वास वसेकर

प्रकाशक : संस्कृती प्रकाशन, पुणे

(०२० -२४४९७३४३, ९८२३०६८२९२)

पृष्ठं : २६४ मूल्य : ४०० रुपये.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com