गुदमरलेल्या श्वासांची शहरं (डॉ. श्रीकांत कार्लेकर)

गुदमरलेल्या श्वासांची शहरं (डॉ. श्रीकांत कार्लेकर)

क्रिकेट खेळाडूंनी मास्क लावून खेळण्याचा अभूतपूर्व प्रसंग दिल्लीत घडला असला, तरी दिल्लीसारखाच जगातल्या अनेक शहरांचा श्‍वास घुसमटलेला आहे. काय आहेत त्याची कारणं, काय करायला हवं, कोणते प्रयोग करायला हवेत आदी गोष्टींवर नजर.

कसोटी क्रिकेटच्या १४० वर्षांच्या काळात आंतरराष्ट्रीय संघाच्या खेळाडूंनी मास्क लावून खेळ खेळण्याचा अभूतपूर्व प्रसंग नवी दिल्लीच्या फिरोजशहा कोटला मैदानावर भारत-श्रीलंका यांच्यातल्या तिसऱ्या कसोटीत तीन डिसेंबर रोजी घडला! खेळाच्या या दुसऱ्या दिवशी श्रीलंकेचे सर्व खेळाडू जेवणानंतर मास्क लावूनच खेळपट्टीवर आले. या वेळेआधीच दिल्लीवर तयार झालेल्या धूरधुक्‍यानं (स्मॉग) धोक्‍याची पातळी ओलांडली होती आणि ते धोकादायक झाल्याचं हवेच्या कमी झालेल्या दृश्‍यमानतेवरूनही (व्हिजिबिलिटी) कळत होतं. अमेरिकन एम्बसीच्या वेबसाइटवर दिल्लीत तरंगणाऱ्या सूक्ष्म प्रदूषकाचं (सस्पेंडेड मायक्रोस्कोपिक पोल्युटंट्‌स) संकेंद्रण (कॉन्संट्रेशन) वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशननं सांगितलेल्या उच्चतम पातळीच्याही खूप वर असल्याचंही म्हटलं गेलं. मैदानावरचा खेळ वीस मिनिटं थांबला. त्यानंतर सुरू झाला; पण श्रीलंकेचे दोन खेळाडू मैदानातून पॅव्हेलिअनमध्ये परतले. भारतानं डाव घोषित करून पुढचा अनर्थ टाळला. आजपर्यंत खराब हवामान, कमी दृश्‍यता, पाऊस अशा कारणांनी खेळ थांबण्याचे प्रसंग अनेक वेळा येऊन गेलेत; पण प्रदूषणामुळं खेळ थांबल्याचा हा प्रसंग केवळ एकमेव!

या प्रकारामुळं दिल्लीतील हवेच्या प्रदूषणाबद्दलचा खूपच वाईट आणि वेदनादायी संदेश सगळ्या जगात पोचला; पण तरीही या सर्व प्रकारात आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताची प्रतिमा मलिन होऊ शकण्याची शक्‍यता तशी अगदीच कमी आहे. कारण एकूण प्रकरण पाहता यात श्रीलंकेच्या खेळाडूंनी या गोष्टीचा बाऊ केल्याचंच सर्वांच्या लक्षात येऊ लागलंय. स्टेडियममधल्या वीस हजार प्रेक्षकांना आणि भारतीय संघातल्या खेळाडूंना मात्र या वाढलेल्या प्रदूषणपातळीचा त्रास झाल्याची तक्रार त्या दिवशी कुणीही केली नव्हती हेही तसं आश्‍चर्यकारकच! अर्थात खेळाच्या चौथ्या दिवशी मात्र भारतीय संघातल्या एका खेळाडूनं तशी तक्रार केली हेही विसरून चालणार नाही.
हे सगळं असं असलं, तरी राजधानीनं गाठलेल्या धोकादायक प्रदूषणाकडं डोळेझाक करणं अक्षम्य चूकच ठरेल. दिल्लीतल्या हवेच्या प्रदूषणाचा निर्देशांक दोन डिसेंबर रोजी ३३१ होता. तो तीन तारखेला ३९० झाला. तरंगणाऱ्या सूक्ष्मप्रदूषकांची पातळी उच्च होती. खरं म्हणजे २३ नोव्हेंबरपासूनच हा निर्देशांक हवेची प्रत ‘अतिशय खराब’ असल्याचं दाखवत होता.

सर्वाधिक प्रदूषित दिल्ली
दिल्ली हे आज जगभरात सर्वाधिक प्रदूषित शहर म्हणून ओळखलं जातं. एका अंदाजानुसार, दिल्ली शहरात दर वर्षी अकरा हजारपेक्षा जास्त लोक मृत्युमुखी पडतात. २०१३-१४ पासून वाहनांचं वाढतं प्रमाण, औद्योगिक उत्सर्जन, बांधकामं आणि शेतजमिनीत तृण जाळण्याच्या घटना यामुळं प्रदूषणाचं प्रमाण दिवसेंदिवस वाढतच आहे. दिल्लीत २.५ मायक्रोमीटरपेक्षा कमी आकाराच्या तरंगत्या घन पदार्थांचं (सस्पेंडेड पार्टिक्‍युलेट मॅटर) प्रमाण  एक घनफूट हवेत १५३ मायक्रोग्रॅम इतकं प्रचंड असतं. हे प्रमाण ६० मायक्रोग्रॅम एवढंच अपेक्षित आहे. यामुळं शहरात नागरिकांच्या श्वसनाच्या तक्रारीत मोठी वाढ तर झाली आहेच, शिवाय तापमानात चढ-उतार होत राहणं, दृश्‍यमानता कमी होणं, हवाई वाहतूक बंद पडणं अशा घटनांतही वाढ होतच आहे. भरपूर झाडांची लागवड, सीएनजीवर धावणारी वाहनं, पर्यावरणहितैषी दिल्ली मेट्रोची सुरवात असे प्रयत्न होऊनही शहरातल्या मोटरींची वाढती संख्या, वाढती बांधकामं आणि आजूबाजूच्या ग्रामीण भागाकडून शहराकडं वाहत येणाऱ्या धुराचं वाढतं प्रमाण यामुळं हे संकटं कमी होण्याची लक्षणं नाहीत.

इतरही शहरं प्रदूषणाच्या विळख्यात
दिल्लीप्रमाणंच ब्रिटिश कोलंबिया (कॅनडा), शांघाय, बीजिंग (चीन), लंडन (ब्रिटन), ग्लासगो, एडिनबर्ग (स्कॉटलंड), मेक्‍सिको सिटी, सॅंटियागो (चिली), तेहरान (इराण), लॉसअँजेलिस (कॅलिफोर्निया), उल्लून बाटर (मंगोलिया), कालीमंतान (इंडोनेशिया) अशी अनेक जागतिक शहरं आज या विळख्यात सापडली आहेत. भारतातही पाटणा, ग्वाल्हेर, रायपूर, अहमदाबाद, कानपूर, आग्रा अशी अनेक शहरंही या समस्येनं बाधित आहेत. महाराष्ट्रात मुंबई, पुणे, नाशिक आणि नागपूर इथंही परिस्थिती फारशी वेगळी नाही.

हवेच्या या प्रदूषणाचा इतिहास पाहता असं लक्षात येतं, की माणसानं आगीचा शोध लावला आणि आगीचा उपयोग लाकूडफाटा जाळण्यासाठी सुरू केला, तेव्हाच हवेच्या मानवनिर्मित प्रदूषणाला सुरवात झाली. त्यानंतर हळूहळू अशा जळण्यातून तयार झालेला धूर दाट लोकसंख्येच्या नागरी वस्त्यांवर तरंगताना दिसू लागला. औद्योगिक क्रांतीनंतर तर कोळसाही जाळला जाऊ लागल्यावर प्रदूषणाचं हे संकट आणखीनच गडद होत गेलं.

लंडनमध्ये ‘धूरधुकं’
इसवीसन १८५० च्या दरम्यान लंडन शहरावर कोळशाचा धूर आणि धुकं (पी सूप) यांच्या प्रचंड मोठ्या काळ्या दाट थरानं शहर काळवंडून जाऊ लागलं. यानं अनेकांचे बळीही घेतले. यावरूनच १९९१ च्या सुमारास या प्रदूषण प्रकाराला स्मॉग म्हणजेच ‘धूरधुकं’ असं नाव देण्यात आलं. धूरधुकं हे एक प्रकारचं दृश्‍य स्वरूपातलं प्रदूषण असून, ते नायट्रोजन ऑक्‍साइड, सल्फर ऑक्‍साइड, ओझोन, कार्बन मोनॉक्‍साईड आणि धूर यांचं मिश्रण असतं. आजकाल वाहनांतून बाहेर पडणाऱ्या धुरामुळं या प्रदूषणात मोठीच भर पडत आहे. औद्योगिक शहरांतल्या हवेत कारखान्यातील धुरामुळं जलशोषक अणूंचं प्रमाण जास्त असतं. यामुळं सांद्रीभवन होऊन मोठ्या प्रमाणात काळपट धूरधुक्‍याची निर्मिती होते. ज्वालामुखीच्या उद्रेकानंतरही बाहेर पडणाऱ्या सल्फर डायऑक्‍साइड व इतर सूक्ष्म कणांमुळं असं धूरधुकं तयार होतं. याला ‘व्हॉग’ असं म्हटलं जातं.

हे प्रदूषण कमी करण्याच्या अथक प्रयत्नांनंतर लंडन शहर कोळशाचा धूर आणि धुकं यांपासून मुक्त झालं; पण आधुनिक काळात वाहनांतून होणाऱ्या धुराच्या उत्सर्जनामुळं प्रदूषणाचं प्रमाण पुन्हा वाढू लागलं आहे. अमेरिकेतलं पिट्‌सबर्ग, पेनसिल्वानिया, सेंट लुई, मिसुरी अशा अनेक शहरांत आज दिवसाही वाहनं हेडलाइट लावून चालवावी लागताहेत. १९४८मध्ये पेनसिल्वानियातल्या डोनोरा शहरात आजूबाजूच्या डोंगरांनी बंदिस्त केलेल्या दरीत  पाच दिवस साठून राहिलेल्या धुक्‍यात शहरातले स्टील आणि झिंक वितळवणारे कारखाने आणि सल्फ्युरिक ॲसिडचे प्लॅंट यांनी हवेत सोडलेली प्रदूषकं मिसळली गेली आणि हजारो माणसं बाधित झाली. त्यानंतर आलेल्या ‘क्‍लीन एअर ॲक्‍ट’च्या सक्तीमुळं हे प्रमाण सगळीकडंच एकदम कमी झालं.

हवेच्या प्रदूषणाची पातळी प्रामुख्यानं कार्बन डायऑक्‍साइड, कार्बन मोनॉक्‍साईड, सल्फर डायऑक्‍साइड, सल्फर ट्रायऑक्‍साइड, नायट्रिक व नायट्रोजन ऑक्‍साइड, मिथेन, क्‍लोरोफ्लुरोकार्बन आणि हवेत तरंगणारे सूक्ष्म घन पदार्थ आणि द्रवरूपी थेंब यांमुळं वाढत असते.

मोठमोठया शहरांवर आजकाल प्रकाशरासायनिक धूरधुकं (फोटोकेमिकल स्मॉग) आणि औद्योगिक धूरधुकं (इंडस्ट्रिअल स्मॉग) अशा मुख्य प्रकारच्या धूरधुक्‍याचे प्रचंड थर आढळून येत आहेत. वर सांगितलेल्या सर्व प्रकारच्या प्रदूषकांत सूर्यप्रकाशामुळं होणाऱ्या परस्परक्रिया- ज्या धूरधुक्‍याच्या निर्मितीस कारण होतात- त्यास ‘प्रकाशरासायनिक धूरधुकं’ असं म्हटलं जातं. वाहनांतून बाहेर पडणाऱ्या धुरामुळं पिवळसर तपकिरी रंगाचा नायट्रोजन ऑक्‍साइड तयार होतो. मोठ्या शहरांत सकाळच्या स्वच्छ सूर्यप्रकाशानंतर दुपारपासूनच या पिवळसर तपकिरी धूरधुक्‍याचा थर दिसू लागतो. यामुळं डोळ्यांची आग होऊन ते चुरचुरू लागतात. भरपूर ऊन अनुभवणाऱ्या उबदार आणि कोरड्या हवेच्या नागरी वस्त्यांवर प्रकाशरासायनिक धूरधुक्‍याचा प्रभाव जास्त असतो.

थंडीच्या दिवसांत दिल्लीसारख्या औद्योगिक शहरांतल्या लोकांना सल्फर डायऑक्‍साइडमुळं तयार झालेल्या सल्फ्युरिक ॲसिडच्या तरंगत्या कणांमुळं; तसंच उडणारी राख, परागकण, सिमेंटची धूळ, गिरणीतले पीठ पदार्थ, कोळशाची राख आणि रंगद्रव्यं अशा सूक्ष्म तरंगत्या पदार्थांमुळं (एरोसॉल्स) तयार झालेल्या धूरधुक्‍याचा सामना करावा लागतो. चीन, भारत, युक्रेन आणि काही पूर्व युरोपिअन देशात जिथं प्रदूषणनियंत्रणाचा फारसा प्रयत्न केला जात नाही, तिथं मोठ्या प्रमाणावर कोळसाज्वलनामुळं अशा प्रकारच्या धूरधुक्‍याचं प्रमाण वाढलेलं दिसतं.

प्रदूषणाचं प्रमाण
शहराचा भूगोल, भूरूपिकी (जिओमॉर्फॉलॉजी), हवामान, लोकसंख्येची घनता, औद्योगिक संकुलांची संख्या, छोट्या मोटारी आणि ट्रक यांची संख्या आणि इंधनांचा वापर अशा सगळ्याच गोष्टींवर हवेच्या प्रदूषणाचं प्रमाण ठरतं. जिथं पर्जन्यवृष्टी किंवा हिमवृष्टी जास्त असते, अशी शहरं मात्र नैसर्गिकदृष्ट्या या प्रदूषणातून मुक्त असतात. समुद्रकिनारी असलेली शहरंही या बाबतींत थोडी जास्त नशीबवान असतात. कारण जमिनीकडून समुद्राकडं वाहणाऱ्या हवेतली तरंगती प्रदूषकं, समुद्राकडून येणाऱ्या खारट समुद्री हवेच्या फवाऱ्यामुळं नष्ट होतात. किनाऱ्यांवर उंच इमारती असल्या, तर मात्र हा परिणाम थोडा कमी दिसतो. जिथं वारे जास्त वेगानं वाहतात, तिथंही हवेतली प्रदूषकं इतरत्र वाहून नेली जातात. मात्र, ज्या दिशेनं ती वाहत जातात त्या बाजूकडची ठिकाणं प्रदूषणग्रस्त होतात.

मोठ्या शहरांतल्या उंच इमारतींमुळं वाऱ्याचा वेग रोखला जातो आणि हवेतली प्रदूषकं तिथंच घुटमळत राहतात. डोंगराळ प्रदेशातल्या नागरी वस्त्यांतही सखल भागात प्रदूषकं साचून राहतात. ती इतरत्र पसरू शकत नाहीत. तापमानाच्या विपरीततेमुळं (टेंपरेचर इन्व्हर्जन) धुकं आणि त्याबरोबर प्रदूषकंही दरीत साचतात आणि प्रदूषणपातळीत वाढ होते. अनेक पर्यावरणवाद्यांच्या मते नागरीकरण ही समस्या नसून, नागरी वस्त्यांची सर्व दिशांनी होणारी वाढ (अर्बन स्प्राऊल) ही समस्या आहे! यामुळं आजूबाजूच्या मोठ्या ग्रामीण, प्रदूषणविरहित, स्वच्छ परिसराचा ऱ्हास होण्याची शक्‍यता वाढत असते.

समस्येचं उत्तर कशात?
दिल्लीसारखी शहरं अधिक शुद्ध, स्वच्छ हवेची, प्रदूषणमुक्त आणि जगण्यासाठी योग्य बनवणं हे खरं तर या समस्येचं योग्य उत्तर आहे. यासाठी शहरांचं पर्यावरणहितैषी अशा ‘ग्रीन सिटी’मध्ये किंवा ‘इको सिटी’मध्ये रूपांतर करणंही आता गरजेचं आहे. अशा शहरांत मुख्य भर हा प्रदूषणावर पूर्ण नियंत्रण, कचरानिर्मितीत घट आणि सौरशक्ती वापरून त्याचा पुनर्वापर यावर असावा. शहरातल्या आणि आजूबाजूच्या प्रदेशातल्या जैवविविधतेचं रक्षण करणं आणि त्यात वाढ होण्यासाठी प्रयत्न करणं या गोष्टींनाही इथं प्राधान्य हवं. ही शहरं लोकाभिमुख हवी, ती वाहनाभिमुख नसावीत.

मुंबई, कोलकाता, चेन्नई यांसारख्या शहरांतल्या खाड्या, नद्या वारंवार स्वच्छ करून, त्यांच्या पर्यावरणाची सुधारणा किंवा पुनर्निर्मिती; तसंच दिल्ली, मुंबई, पुणे, बंगळूर अशा शहरांच्या नदी पर्यावरणात सुधारणा, वृक्षांची भरपूर लागवड, टेकड्यांच्या पर्यावरणाची सुरक्षितता आणि शहराच्या सर्व दिशांनी वाढणाऱ्या सीमेवर नियंत्रण असे अनेक उपाय प्रदूषणनियंत्रणाच्या संदर्भात अभ्यासकांनी
मांडले आहेत.

‘इको सिटी’चे प्रयोग
‘इको सिटी’चे यशस्वी प्रयोग याआधीही अनेक ठिकाणी झालेत. ब्राझिलमधलं क्‍युरिटिबा, न्यूझिलंडमधलं वैताकेरी, फिनलंडमधलं टॅपिओला, ओरेगॉनमधलं पोर्टलॅंड आणि कॅलिफोर्नियातलं डेव्हिस अशी अनेक शहरांची उदाहरणं देता येतील. यातल्या अनेक ‘इको सिटीज’मध्ये प्रदूषण नष्ट करण्यात उत्तम सार्वजनिक वाहतूकयंत्रणेचा खूप मोठ्ठा हातभार आहे. स्वच्छ, स्वस्त, सोयीस्कर, सक्षम आणि पुरेशी सार्वजनिक वाहतूकयंत्रणा शहराला हवेच्या प्रदूषणापासून किती चांगल्या प्रकारे मुक्त करू शकते, याचं  उत्तम उदाहरण म्हणजे ब्राझिल या विकसनशील देशातलं

क्‍युरिटिबा हे शहर!
दिल्ली, कोलकाता, चेन्नई, मुंबई, पुणे, बंगळूर अशा सर्वच शहरांतल्या वाढत्या प्रदूषणसमस्येवर अशा तऱ्हेचाच उपाय करणं योग्य ठरेल. शहरातल्या प्रदूषणनियंत्रणासाठी जगात इतरत्र झालेले प्रयोग आपल्याकडं जसेच्या तसे लागू करता येतील असं मुळीच नाही. आपल्या शहरांचा भूगोल, इतिहास, वाढ आणि विकास व पर्यावरण हे सगळं इतकं वेगळं आहे, की त्या प्रत्येकाचा विचार करूनच आपल्याला अल्पकालीन व दीर्घकालीन उपाय शोधावे लागतील  परदेशांतून आणून आपल्याकडं सुरू केलेल्या अनेक वाहतूक योजनांचा आपल्या शहरांतून कसा बोजवारा उडाला आहे, ते आपण पाहतोच आहोत! आपल्याकडची बरीचशी शहरं मुळातच कुठलंही नगरनियोजन नसताना वाढली. वेडयावाकडया पद्धतीनं आणि जागा मिळेल तशी आणि तिथं वाढलेल्या शहरांतून मार्ग काढून उपाय शोधण्याची गरज आहे आणि ते शोधायला निश्‍चितच अजूनही अनेक संधी आहेत. वर्षागणिक वाढणारी वाहनसंख्या आणि पर्यावरणाचा ऱ्हास करणारी अनिर्बंध बांधकामं यावर नियंत्रण ठेवलं, तरी दिल्ली आणि अर्थातच पुणे, मुंबईसारख्या शहरांतल्या समस्या कमी करता येतील. लोकांची मानसिकता बदलणं आणि त्यांचं सहकार्य शहरविकासाच्या व प्रदूषणनिर्मूलनाच्या सर्व चांगल्या योजनांना मिळणं हे सगळ्यांत महत्त्वाचं. ते झालं तर भविष्यात आपणही अनेक प्रदूषणविरहित, स्वच्छ, सुंदर ‘इको सिटीज’ नक्कीच तयार करू शकू.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com