#MokaleVha : पत्नीने न सांगताच घेतले कर्ज अन् आता...

Loan.jpg
Loan.jpg

पत्नीने न सांगताच घेतले कर्ज
माझी पत्नी खाद्यपदार्थविक्रीचा व्यवसाय करते. या व्यवसायास १५ वर्षे झाली. तिच्या खाद्यपदार्थांना चांगली मागणी असून, तिच्यासोबत ५/६ महिला काम करतात. मी नोकरी करीत असल्याने तिच्या आर्थिक व्यवहारात फारसे लक्ष दिले नाही. परंतु, दोन वर्षांपूर्वी आजारपणाच्या कारणाने मी सलग सहा महिने घरीच असल्याकारणाने तिच्याकडे वारंवार पैसे मागण्यासाठी काही लोक येत असल्याचे लक्षात आले. मी चौकशी केली असता तिने व्याजाने पैसे घेतले असून, व्यवसायासाठी वापरले, असे सांगते. ती १०-१२ लाख रुपये कर्ज ५ ते १० टक्के व्याजाने फेडत आहे. यामुळे माझ्यावर संकटच कोसळले. गंभीर आजारपणामुळे मी नोकरीला जाऊ शकत नाही. कर्जदार वारंवार पैशाची मागणी करतात. बायकोने हे सर्व व्यवहार मला न विचारता केले. एवढे पैसे कुठे वापरले, तर घरात व व्यवसायासाठीच खर्च केले, असे तिचे म्हणणे आहे. परंतु, व्यवसाय चांगला चालू असताना एवढे कर्ज होण्याचे कारणच माझ्या लक्षात येत नाही. बायकोच्या मूर्खपणामुळे मला प्रचंड मानसिक त्रास होत आहे. तिला घरातून निघून जा, असे सांगितले तरी ती जात नाही. मी तिच्याविरोधात पोलिस तक्रार करू शकतो का? तिच्या चुकीच्या व्यवहाराची मला शिक्षा का?
- कुटुंबातील एखादी व्यक्ती अचानक आजारी पडली, अॅडमिट करावे लागले; तर इतर घरातील व्यक्तींना तिची देखभाल करणे तसेच हॉस्पिटलचा खर्च कुटुंबातील व्यक्तींना झळ सोसून करावाच लागतो. त्याच पद्धतीने कुटुंबातील एखाद्या व्यक्तीमुळे आर्थिक नुकसान चुकले, व्यवहारात फसवणूक झाली, तर त्याची झळ कुटुंबातील सर्वच व्यक्तींना कळत-नकळतपणे सोसावी लागते. परंतु, वेळीच गोष्टी लक्षात आल्यास सतर्कतेने नेमके कुठे चुकले, हे शोधून काढणे महत्त्वाचे ठरते. १५ वर्षे संसार सांभाळणाऱ्या पत्नीला केवळ तिचे आर्थिक नियोजन चुकले, या कारणाने घरातून बाहेर काढणे योग्य ठरत नाही. त्या खाद्यपदार्थ बनविण्यात कुशल असल्याने पदार्थांना मागणी असावी. परंतु, व्यवसायाची घडी बसविताना त्यांचे आर्थिक नियोजन, खरेदी-विक्रीचा ताळमेळ, फायदा-तोटा याचा बारकाईने हिशेब मांडणे त्यांना जमले नसावे. बॅंकेतून कर्ज घेणे व सावकारी कर्ज, यातील फरक न कळल्याने सोप्या मार्गाने; परंतु त्यांचे नुकसान करणारे कर्ज त्यांनी घेतले. आर्थिक नियोजन, व्यवहारवृत्ती या गोष्टीबाबत त्यांना समजावून सांगणे तसेच काही काळ घरातील इतर व्यक्तीने त्यांची आर्थिक व्यवहाराची संपूर्ण माहिती लेखी ठेवणे, या संकटातून बाहेर पडण्यास उपयुक्त ठरू शकेल. आर्थिक संकटाच्या काळात घरातील केवळ गरजेच्या गोष्टींना प्राधान्य देणे, चैनीचे अनावश्‍यक खर्च टाळणे, काटकसर यातून उत्पन्नाच्या प्रमाणातच खर्च हा मेळ घालावा लागेल.

विभक्त झाल्यानंतरही नवऱ्याची कटकारस्थाने
मी ३५ वर्षांची विवाहिता असून, गेली दोन वर्षे नवऱ्यापासून विभक्त राहत आहे. नवऱ्याने माझी फसवणूक करून दुसरे लग्न केल्यामुळे मी कौटुंबिक हिंसाचार कायद्यांतर्गत केस दाखल केली. मी काहीही बोलू नये, यासाठी मला खूप त्रास दिला. घरखर्चासाठी काहीच न देणे तसेच शिवीगाळ, मारहाणीमुळे मला दुखापतही झाली होती. कायद्याने मला न्याय देत, दरमहा १५ हजार पोटगी चालू झाली. तसेच, त्यांनी मला त्रास देऊ नये, यासाठी त्यांना समजही देण्यात आली. नवऱ्यासोबत राहत असताना एकत्र खात्याच्या चेकवर त्यांनी माझ्या पूर्वीच सह्या घेतल्या होत्या. त्या चेकवर रक्कम टाकून अज्ञात व्यक्ती, ज्यांना मी पाहिलेले नाही त्यांनी माझ्याविरोधात फसवणुकीची खोटी केस कोर्टात दाखल केली. उसने घेतलेले पैसे मी परत न देता चेक न वटल्याने फसवणूक केली, अशी केस आहे. हे माझ्या नवऱ्याचे कारस्थान आहे. याबाबत मला खात्री आहे. ज्या व्यक्तीला मी ओळखतही नाही अशी व्यक्ती माझ्याविरोधात केस कशी दाखल करू शकते? 
आर्थिक फसवणुकीच्या उद्देशाने चेक देऊनही न वटता परत गेला. तसेच, त्या चेकवर तुमची सही आणि खातेधारकात तुमचे नाव असल्याने कोर्टाची नोटीस तुम्हाला आली आहे. अशा नोटिशीबाबत प्रत्यक्ष कोर्टात हजर राहून तुमचा निर्दोषपणा सिद्ध करणेच योग्य आहे. तुम्हा नवरा-बायकोतील वाद कोर्टापर्यंत गेलेले आहेत. त्याचे लेखी पुरावेही तुमच्याकडे असतील. ती कागदपत्रे घेऊन कोर्टात गेल्यास या खोट्या केसमागील नवऱ्याचा त्रास देण्याचा हेतू लक्षात येऊ शकतो. तसेच, चेकवर तुमची सही असली तरी खाते तुम्हा दोघांच्या नावाचे आहे. तुम्ही स्वतः नोकरी अथवा व्यवसाय करीत नसल्यास नवऱ्याच्या व्यवसायाचे खातेपुस्तक व चेकबुक असल्याचे तुम्ही कोर्टात सांगू शकता. ज्या व्यक्तीने तुमच्याविरोधात खोटी केस दाखल केली, त्याचा गुन्हा सिद्ध झाल्यास त्याला शिक्षाही होऊ शकते. त्यामुळे न घाबरता कोर्टात जाऊन स्वतःची बाजू सक्षमपणे, पुराव्यासह मांडणेच अधिक योग्य ठरेल.

मुलीच्या लग्नाचा जिवाला घोर
आम्ही दोघे पती-पत्नी सरकारी नोकरीत उच्च पदावर काम करीत आहोत. आम्हाला एकच मुलगी असल्याने तिला खूप लाडात वाढविले. ती २५ वर्षांची असून, शिक्षण पूर्ण करून नोकरी करते. उच्च मध्यमवर्गीय म्हणता येऊ शकेल असे घर व राहणीमान आहे. मुलीच्या लग्नाचा विषय निघाल्यानंतर तिने एकदा तिच्या मित्राचा उल्लेख केला. परंतु, त्याचे शिक्षण पूर्ण झालेले नाही. एकत्र कुटुंबात राहणारा तसेच चाळीवजा घर आहे. सर्व माहिती घेतल्यानंतर मी स्पष्टपणे लग्नास नकार दिला. परंतु, मुलगी नंतर काहीच बोलली नाही. लग्नाचा विषय गेली २ वर्षे आम्ही काढला नाही. काही काळ गेल्यानंतर तिचे तिला कळेल व तिचा निर्णय बदलेल, अशी अपेक्षा आहे. परंतु, माझ्या पत्नीला मुलीचे वेळेवर लग्न व्हावे, यासाठी घाई झाली आहे. मुलगी मात्र आमच्याशी वादही घालत नाही किंवा कोणतीच प्रतिक्रिया देत नाही. त्या मुलाशी लग्न करायचे आहे, असा उल्लेखही तिने केला नाही. परंतु, इतर मुले पाहण्यास ती तयार नाही. अशा परिस्थितीत काय करावे, असा संभ्रम आहे. तो मुलगा तिच्यावर दबाव टाकत असावा; जेणेकरून इतर स्थळे पाहू नये. 
- तुमची मुलगी उच्चशिक्षित आहे, तसेच आर्थिकदृष्ट्या देखील स्वतंत्र आहे. वयवर्षे २५ आहे. म्हणजेच, तिचा जोडीदार तिला निवडण्याचा हक्कही आहेच. आई-वडील या नात्याने तसेच एकच अपत्य असल्याने अधिक काळजी व प्रेमापोटी तुम्हाला तिचे आयुष्य विनाकष्टाचे, संपन्न असावे, अशी इच्छा असणे साहजिकच आहे. परंतु, तुमची मुलगी तुमचा आदर करते, या भावनेने तुमच्याविरोधात काही बोलत नाही किंवा भीतीदेखील, आदरयुक्त भीतीही असू शकते. अशा परिस्थितीत विरोधी मत मांडणे, वाद घालणे टाळले जाऊ शकते. परंतु, यातून तुम्हाला मुलीचे खरे मत लक्षात येणार नाही. या शक्‍यतांचा विचार करून मुलीला मोकळेपणाने बोलण्यास प्रेरित करा. आईकडे अधिक मोकळेपणाने बोलू शकत असल्यास आईच्या मध्यस्थीने तिचे नेमके लग्नाविषयी काय ठरले आहे, हे जाणून घ्या. तिने निवडलेला मुलगा केवळ आर्थिक परिस्थिती, शिक्षण या सद्य परिस्थितीचा विचार केंद्रित न ठेवता त्याचे वागणे, बोलणे, विचार समजून घेण्याचा प्रयत्न करा. भविष्याबद्दल त्यांचे काय नियोजन आहे, लग्न, करिअर, महत्त्वाकांक्षा, याबाबत दोघांमध्ये काही चर्चा झाली आहे का? इतर कौटुंबिक पार्श्‍वभूमी, या सविस्तर बाबींवर मुलीशी चर्चा केल्यानंतर तिला तिचा निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य दिले, तर स्वतःचा निर्णय स्वतःच्या जबाबदारीने पेलण्याचे सामर्थ्यही तिलाच कळेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com