

Marathi Bhasheche Vartaman Swarup
esakal
डॉ. नीलिमा गुंडी - saptrang@esakal.com
‘मराठी भाषेचे वर्तमान स्वरूप’ हे पुस्तक ज्येष्ठ समीक्षक डॉ. सुधीर रसाळ यांच्या अनेक वर्षांच्या सातत्यपूर्ण चिंतनातून सिद्ध झाले आहे. या पुस्तकात रसाळांमधील ध्येयवादी अध्यापकाची तळमळ आहे, विचारवंताची दूरदृष्टी आहे आणि साहित्यिकाची मर्मदृष्टीही आहे. मराठी भाषेच्या सद्यकालीन व्यवस्थेची मीमांसा करताना रसाळांनी स्वातंत्र्योत्तर काळापासून आजपावेतो बदलत गेलेल्या भाषा-संस्कतीविषयक धोरणांबाबत परखड भाष्य केले आहे. ‘व्रतस्थ माझी फक्त पापणी’ अशा वृत्तीने साहित्यव्यवहाराकडे पाहणारी यातील भूमिका वाचकांचे लक्ष वेधून घेते.
सात प्रकरणांमधून यात विषयाचे विविध पैलू रसाळ यांनी उजेडात आणले आहेत. स्वातंत्र्यपूर्व काळात स्वभाषा आणि संस्कृती यांचा विकास करण्याचे उद्दिष्ट ‘स्वातंत्र्य’ या संकल्पनेशी जोडलेले होते. मात्र, ‘आपल्या राजकीय नेतृत्वाने आपण मिळविलेल्या स्वातंत्र्याला सत्तातरांचा दर्जा दिला,’ असे स्पष्टपणे नोंदवले आहे. धोरण राबवताना भारतीय भाषा व संस्कृती यांचे आधुनिकीकरण करायचे की पाश्चात्त्यीकरण करायचे याविषयी निश्चितपणा नव्हता, त्यामुळे इंग्लिशचे वर्चस्व राहिले. जीवनव्यवहारातील महत्त्वाच्या स्थानांवरून मराठी दूर सारली गेली. वास्तविक १९६० नंतर मराठी भाषेच्या वापराबद्दल उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते; पण त्याचा उपयोग करून घेता आला नाही. सर्व ज्ञानशाखांचे अध्ययन-अध्यापन इंग्लिशऐवजी मराठीतून करणे व सर्व जीवनव्यवहारात मराठीचे उपयोजन करणे याकडे लक्ष दिले गेले नाही. रसाळ यांनी सुरुवातीलाच ही पायाभूत गरज कशी दुर्लक्षित झाली, ही बाब अधोरेखित केली आहे.