अस्वस्थतेची ही आहेत शारीरिक व मानसिक लक्षणे

अस्वस्थतेची ही आहेत शारीरिक व मानसिक लक्षणे

प्रत्येक व्यक्तीची स्वभावाची जडणघडण, तणाव पेलण्याची क्षमता, परिस्थितीला react होण्याची पद्धत, भावनिक समतोल वेगळा असतो. त्यामुळे शारीरिक व मानसिक दुष्परिणामांची तीव्रता वेगळी असू शकते. पण, शेवटी तणावांमुळे शरीरात होणाऱ्या cortisol, adrenalin व इतर घातक संप्रेरकांचे दुष्परिणाम होतातच. मेंदूतील काही घटकांमध्ये असंतुलन निर्माण होते. ज्यामुळे अस्वस्थतेच्या आजाराला निमंत्रण मिळतं. त्याची शारीरिक, मानसिक आणि वर्तणुकीतील लक्षणे दिसायला लागतात. ज्याची दखल वेळेवर घेणे गरजेचे असते.

तणावाचे स्रोत वेगवेगळे असले, समाजात सर्वचजण ताणतणावात असल्याचे पाहायला मिळते. ड्युटीच्या, जेवणाच्या अनियमित वेळा, जागरणे, सतत जागृत राहण्याची मेंदूची सवय आणि ताणाचा निचरा व्यवस्थित न होणे हे प्रश्न त्यामध्ये असतात. त्याचे परिणाम व्यक्तीगणिक बदलतात. यावर वेळीच उपाय न झाल्यास शारीरिक, मानसिक आजार होण्यात त्याची परिणती होते. 

सुरवातीची शारीरिक व मानसिक लक्षणे पुढीलप्रमाणे : सतत अस्वस्थ वाटत राहाणे, लहानसहान कारणांवरून चिडचिड. राग अनावर होणे, झोप न येणे किंवा जास्ती येणे, अनामिक भीती, भूक न लागणे किंवा अति लागणे, विनाकारण संशय येणे, एकाग्रता न होणे, विचारांमध्ये गोंधळ व निर्णय घेता न येणे, विलक्षण थकवा वाटणे, वारंवार पोट बिघडणे, निराश वाटत राहणे, आत्मविश्वास कमी होणे, जगण्यातला आनंद कमी होणे. 

त्याकडे दुर्लक्ष केल्यास नैराश्‍याचा आजार किंवा एखादा शारीरिक आजार होऊ शकतो. Cortisol आणि इतर ताणतणावाशी निगडित संप्रेरके अतिरिक्त प्रमाणात स्त्रवतात व त्यामुळे इतर शारीरिक अवयवांच्या metabolism वर विपरीत परिणाम होतो. त्यातून अतिरक्तदाब, हृदयविकार, पचनसंस्थेसंबंधातले विकार उद्‌भवतात. Neuroimmunologyया शास्त्र शाखेच्या निष्कर्षांनुसार बहुतेक शारीरिक आजारांचे मूळ हे खूप काळ सहन केलेल्या मानसिक ताणतणावात असतं.

या सर्व लक्षणांची रूपांतर कार्यक्षमता कमी होणं, व्यसनाधीनता, गैरहजेरी वाढणं यामध्ये होते. 

अस्वस्थतेची मानसिक लक्षणे : आत्मविश्वास आणि एकाग्रता कमी होणे, लक्षात न राहाणे, स्मृतिसंदर्भात अडचणी. निर्णयक्षमता कमी होणे. लहानसहान गोष्टीत गोंधळ उडणे, विचार करताना मूळ मुद्दा सोडून भरकटायला होणे. छातीत धडधड, अचानक घाम फुटणे, काल्पनिक भीती वाटायला लागणे, उतावीळपणा वाढणे, अचानक रडू येणे, अति राग येणे

अस्वस्थतेची शारीरिक लक्षणे : अजिबात झोप न येणे किंवा जास्त झोप येणे, पचनाच्या तक्रारी, डोकेदुखी, त्वचेचे विकार, अचानक थकवा, रक्तदाब वाढणे किंवा कमी होणे, लैंगिक इच्छा आणि क्षमता कमी होणे.

ताणतणावाचे नियोजन कसे करायचे, एक कणखर परंतु शांत, स्वस्थ मन:स्थिती निर्माण करता येईल का? त्यासाठी काय करावं लागेल? त्यासाठी पुढील पायऱ्यांमध्ये काम करावे लागते. 

ताण समजून घेणे व त्याची नोंद करणे 
आपल्यावर सध्या कुठले ताण आहेत? कशाची काळजी वाटते? कशामुळे राग येतो? तो ताब्यात राहतो का? कशामुळे वाईट वाटते? कुठला अपराधगंड वाटतो का? शारीरिक व मानसिक अस्वास्थ्याची लक्षणे. अशा अनेक गोष्टींची नोंद करावी. थोडक्‍यात हे एक प्रकारचे भावनांचे ऑडिट असेल. आपल्या लक्षात यायला लागेल की एकतर मुळात ताण निर्माण करणारी परिस्थिती मी बदलू शकतो किंवा तसं शक्‍य नसेल तर माझी नकारात्मक प्रतिक्रिया बदलू शकतो. 

स्ट्रेस मॅनेजमेंटमध्ये चार A’s महत्त्वाचे असतात. Avoid the stressor, Alter the stressor, Adapt the stressor, Accept the stressor.  तज्ज्ञांच्या सहाय्याने त्यावरचे उपाय शोधावेत. त्यांच्या तज्ज्ञांशी बोलल्यामुळे ताणाचा निचरा होईल.

उपाय योजना व आवश्‍यक असल्यास औषधोपचार, सायकोथेरपी करणे. समुपदेशन, तणाव नियंत्रणाची, मन:स्वास्थ्याची तंत्रे शिकणे व या सर्वांचा विशिष्ट कालावधीपर्यंत उपयोग करणे महत्त्वाचे आहे.

व्यायाम, योगासने, प्राणायाम, ध्यान व वर्तमान क्षणात राहण्याची तंत्रे  - रोज व्यायाम. म्हणजे ज्यायोगे नाडीची गती ठराविक मर्यादेपर्यंत वाढेल. म्हणजे तेवढ्या वेगात चालणे, धावणे, पोहणे इत्यादी. यामुळे शरीरात serotonin, endorphins तसेच इतर नैसर्गिक anti depressants स्त्रवतील. 

संगीत, कविता, छंद आणि मैत्र हे एक उत्तम औषध आहे. मन:स्थिती सुधारण्यासाठी रोज संगीताची साधना, आवडते संगीत रोज ऐकणे, कविता वाचणे, ऐकणे, आवडता छंद जोपासल्याने खूप मदत होते. तसेच, ज्याच्याजवळ मोकळे होऊ शकू, असे जिव्हाळ्याचे परंतु निर्व्यसनी मित्र जोडण्याचा छान उपयोग होतो.

सकारात्मक दृष्टिकोन व विचार - परिस्थिती कधीच एकसारखी राहात नाही. ती बदलेलच यावर विश्वास ठेवायला हवा. माझ्यात सकारात्मक बदल घडतीलच हा विश्‍वास ठेवायला हवा. सकारात्मक स्वयंसूचनेची तंत्रे, स्वतःला स्वस्थ करून स्वयंसूचना देणे हे सगळे शिकून घ्यायला हवे.

चौरस व पौष्टिक आहार - ड्युटीच्या अनियमित वेळा लक्षात घेऊनसुद्धा जीवनसत्त्वयुक्त, प्रथिनेयुक्त, आहार, दूध व दुग्धजन्य पदार्थ, कमी तेलकट व कमी मांसाहार, भरपूर पाणी पिणे आवश्‍यक आहे.

    आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन - मन:स्वास्थ्य कुठल्याही परिस्थितीत टिकवता येईल का ? याचे उत्तर निश्‍चित होकारार्थी आहे. त्यासाठी मुळात आपण आतून स्वस्थ व्हायला हवे. शांतपणे परिस्थितीचे निरीक्षण करायला हवे. कुठल्या गोष्टी आपल्या आवाक्‍यात आहेत. आणि कुठल्या नाहीत हे शांतपणे समजून घ्यायला हवे.

जे टाळणे अशक्‍य, दे शक्ती ते सहाया,
जे शक्‍य साध्य आहे, निर्धार दे कराया, 
मज काय शक्‍य आहे, आहे अशक्‍य काय 
माझे मला कळाया देई बुद्धी देवराया !

या प्रार्थनेतील मर्म समजून घेतले तर बरेच प्रश्न सुटतील. ‘मज काय शक्‍य आहे, आहे अशक्‍य काय?‘ हे केव्हा उमजेल, जर आपण आतून स्वस्थ झालो तर. स्वस्थ झाल्यावर आपण परिस्थितीचे नीट अवलोकन करू शकू आणि मार्ग काढू शकू. सर्वांच्याच संदर्भात आपले ‘आतले जग शांत राहिलं तरंच बाह्य जगासाठी आवश्‍यक असलेली स्वस्थता, भावनिक समतोल, कार्यक्षमता, निर्णय घेण्याची क्षमता, धैर्य, तणाव मग ते व्यक्तिगत असोत, कौटुंबिक किंवा नोकरीतले असोत ते सहन करण्याची क्षमता साध्य होऊ शकतील. मानसिक ताकद वाढेल. म्हणूनच ‘आतले’ जग शांत करण्यासाठी रोज काही वेळ ‘स्व’कडे पाहण्याची सवय व्हायला हवी.

- डॉ. विद्याधर बापट, मानसतज्ज्ञ व ताणतणाव नियोजन तज्ज्ञ

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com