कमालीचं वेगवान आयुष्य, स्पर्धेच्या युगातली असह्य धावपळ, शिक्षणातलं कथित अपयश, नोकरीच्या ठिकाणचे ताण-तणाव, अपेक्षित ध्येय गाठता न आल्यामुळं वाट्याला येणारी विफलता-अस्वस्थता-चिंताग्रस्तता, या सगळ्या दुष्टचक्रातून उद्भवणारे शारीरिक-मानसिक आजार...मोठमोठ्या शहरांतल्या-महानगरांतल्या तरुणवर्गाला व पौगंडावस्थेतल्या असंख्य मुलांना सध्या अशा परिस्थितीला तोंड द्यावं लागत आहे. याच चिंताग्रस्ततेतून आयुष्य संपवण्याचा टोकाचा निर्णय घेतला जाण्याच्याही अनेक घटना घडत आहेत. आत्महत्यांच्या विविध कारणांपैकी ‘चिंताग्रस्तता’ हे एक प्रमुख कारण असल्याचं एका पाहणी-अहवालातून नुकतंच पुढं आलं आहे. तेव्हा तरुणाईला आणि तरुणाईत प्रवेश करणाऱ्या कोवळ्या जिवांना वेळीच सावरणं अत्यावश्यक ठरतं. ‘मन सुद्ध तुझं, गोस्ट हाये पृथिवीमोलाची’, असं जुन्या काळातलं एक प्रेरक सिनेगीत आहे. त्यात थोडासा बदल करून असं म्हणता येईल की...‘मन घट्ट तुझं, गोस्ट हाये पृथिवीमोलाची.’ हा मन घट्ट करण्याचा पृथ्वीमोलाचा सकारात्मक जीवनमंत्र प्रतिकूल परिस्थितीतही आचरणात आणायलाच हवा.
फुलणाऱ्या कळ्या, उमलणारी व्यक्तिमत्त्वं अचानक कोमेजून जात आहेत. चिंताग्रस्ततेतून, वैफल्यातून तरुणांनी, पौगंडावस्थेतल्या मुलांनी आत्महत्या केल्याचं किंवा तसा प्रयत्न केल्याचं प्रमाण गेल्या काही वर्षात खूप वाढलंय. तीव्र नैराश्याचा आजार हे एक प्रमुख कारण या आत्महत्यांमागं असू शकतं.
चिंतेतून उद्भवणाऱ्या मानसिक आजारांचा परिणाम तरुणाईच्या सगळ्या वर्तनव्यवहारावर होत असल्याचं पुढं आलं आहे. ‘लॅन्सेट’ या नियतकालिकानं याविषयीचा पाहणी-अहवाल अलीकडंच प्रसिद्ध केला.
स्वतःला इजा करून घेणं किंवा थेट आयुष्यच संपवून टाकण्याइतपत टोकाचाही निर्णय अशा मनःस्थितीत घेतला गेल्याची अनेक उदाहरणं घडत आहेत. अशा वेळी प्रामुख्यानं पौगंडावस्थेतच मुलांच्या मनाची काळजी घेणं अत्यंत आवश्यक ठरतं; जेणेकरून पुढच्या काळात संभाव्य विपरीत प्रकार घडणार नाहीत.
अस्वस्थतेचा आजार आणि नैराश्याचा आजार, ही बाब आजकाल गंभीर स्वरूप धारण करत चाललेली आहे. पौगंडावस्थेतल्या मुलांमध्ये तसंच तरुणाईत हे प्रमाण चिंताजनक आहे. नैराश्याचा हा आजार जितक्या लवकर लक्षात येईल, तेवढ्या परिणामकारकरीत्या त्याच्यावर उपचार होऊ शकतात. त्यासाठी आजाराची लक्षणं समजून घेणं व वेळेवर तज्ज्ञांची मदत घेणं ही पालक आणि शिक्षक या दोघांचीही जबाबदारी आहे.
पौगंडावस्थेत व्यक्तिमत्त्वं उमलत असत. व्यक्तिमत्वाला या काळात अनेक पैलू पडत असतात. उत्साह खळाळून वाहत असतो; पण तरीही गोंधळात टाकणारे प्रश्न मुलांना पडत असतात, मनात घोंघावत असतात. उदाहरणार्थ ः ‘मी कोण आहे?’ ‘इतरांपेक्षा माझ्यात काहीतरी कमी आहे का?’ ‘या सगळ्या जगरहाटीत माझ काय स्थान आहे?’ ‘प्रत्येक गोष्टीत माझ्यावर पालकांचं वर्चस्व का?’ ‘स्त्री-पुरुष संबध म्हणजे काय?’ व इतर स्वरूपाचे लैंगिक प्रश्न...
अशा परिस्थितीत नुसताच मूड Upset आहे की अस्वस्थतेचा किंवा नैराश्याचा आजार आहे यातला फरक ओळखण्याचं काम फक्त तज्ज्ञ व्यक्तीच करू शकते.
बरं, पौगंडावस्थेतली/तारुण्यातली मुलं निराश किंवा दुःखी दिसतीलच असंही नसतं; त्यामुळं त्यांच्या नैराश्याच्या आजाराकडं, त्यांच्या अवस्थेकडं, त्यांच्या चिंताग्रस्ततेकडं दुर्लक्ष होऊ शकते. अशा स्थितीत बऱ्याच जणांमध्ये आक्रमकता, चिडचिडेपणा ही दिसू शकतो.
‘डायग्नोस्टिक अँड स्टॅटिस्टिकल मॅन्युअल ऑफ मेन्टल डिसॉर्डर्स’(DSM )नुसार तीव्रता, कालावधी आणि लक्षणं या तीन बाबींनुसार डिप्रेशनचे वेगवेगळे प्रकार आहेत. उदाहरणार्थ ः मेजर डिप्रेसिव्ह डिसॉर्डर, सायक्लोथिमिक डिसॉर्डर, मूड डिसॉर्डर ड्यू टू अ जनरल मेडिकल कंडिशन, सबस्टन्स-इंड्यूस्ड् मूड डिसॉर्डर, डायस्थिमिक डिसॉर्डर, मॅनिक डिप्रेशन ऑर बायपोलर डिसॉर्डर, पोस्टपार्टम डिप्रेशन, सीझनल ॲफेक्टिव्ह डिसॉर्डर (SAD), ॲटिपिकल डिप्रेशन, सिच्युएशनल डिप्रेशन ऑर रिॲक्टिव्ह डिप्रेशन, प्रीमेन्स्ट्रुअल डिस्फोरिक डिसॉर्डर, सायकोटिक डिप्रेशन...इत्यादी.या विषयाची व्याप्ती बरीच मोठी आहे. इथं सगळ्या गोष्टी मांडता येणं शक्य नसलं तरी मुख्य मुद्द्यांना स्पर्श करण्याचा प्रयत्न करू या.
पौगंडावस्थेतल्या मुलांच्या बाबतीत नैराश्याच्या आजारात साधारणतः पुढील लक्षणं आढळून येतात ः
मुला-मुलींमध्ये वरील लक्षणं किती काळ व किती तीव्रतेनं जाणवत आहेत हे पालकांनी, शिक्षकांनी व मित्रांनी जाणीवपूर्वक पाहायला हवं; त्याचबरोबर पौगंडावस्था हा एक सर्वार्थानं स्थित्यंतराचा कालावधी असतो; त्यामुळं काही वेळा ही लक्षणं ‘नॉर्मल’ही असू शकतात; ज्याला Growing Pains असं म्हणतात. मात्र, ती लक्षणं तशी आहेत की आजाराचा भाग आहेत, हे तज्ज्ञच ठरवू शकतात. बऱ्याचदा अती उत्साही वागणं किंवा दुराग्रही, बंडखोर वृत्ती ही आजाराची लक्षणं असू शकतात.
या वयातल्या नैराश्याचे परिणाम
पौगंडावस्थेतलं तसंच तरुणाईतलं नैराश्य दुर्लक्ष करण्यासारखं नक्कीच नाही. त्यामुळं, ‘सगळं आपोआप ठीक होईल’, ‘वयाचा दोष असेल’ वगैरे गैरसमजुतीत न राहणं चांगलं. शंका आल्यावर ताबडतोब तज्ज्ञांचं मार्गदर्शन घेणं कधीही उत्तमच. पालकांनी पुढील गोष्टी अवश्य कराव्यात ः सर्वप्रथम अतिशय विश्वासात घेऊन, प्रेमानं पाल्याशी बोलावं. त्याच्याविषयी/तिच्याविषयी काळजी, प्रेम वाटत आहे, हे त्यांना जाणवू द्या. विश्वासाचं वातावरण तयार करा. आवश्यकता वाटल्यास तज्ज्ञाची मदत तत्काळ घ्या. पाल्याच्या वर्तनातले बदल हे नैराश्याच्या आजारापोटी आहेत किंवा कसं हे तज्ज्ञाला ठरवू द्या. बदल कशाहीमुळं असले तरी पाल्याच्या भविष्याच्या दृष्टीनं ते दुरुस्त व्हायला हवेत. नैराश्याच्या आजाराचं मुख्य कारण म्हणजे मेंदूतले रासायनिक बदल/असंतुलन होय.
आजार ज्यानं बळावतो, बळावू शकतो, असे काही महत्तवाचे घटक ः
नैराश्याच्या आजारातील स्व-मदत
औषधं व सायकोथेरपी याबरोबरच आजारातून बाहेर पडण्यासाठी पुढील गोष्टी उपयुक्त ठरतात. त्या तज्ज्ञांच्या सल्ल्यानं कराव्यात.
‘वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन’च्या (WHO) अनुमानानुसार, सन २०२० पर्यंत डिप्रेशनचा आजार हा तीव्र स्वरूप धारण करेल आणि शारिरीक व मानसिक डिस्ॲबिलिटीच्या दृष्टीनं तो प्रमुख गंभीर आजार ठरेल. सध्याचं एकूण चित्र पाहता, हे अनुमान वास्तवात येत असल्याचं दिसून येत आहे. लहान मुलांपासून ते वयस्कर व्यक्तींपर्यंत डिप्रेशनच्या आजाराचा प्रादुर्भाव होत आहे. आत्तापासूनच, त्यापासून बचावाचे प्रयत्न प्रत्येकानं करायला हवेत. योग्य प्रयत्न केल्यास हे नक्कीच घडू शकतं. फुलणाऱ्या कळ्या, उमलणारी व्यक्तिमत्त्वं नैराश्याच्या आजारामुळं कोमेजून जात असली, तरी वेळेवर काळजी घेतली तर असं घडणं नक्कीच टाळता येऊ शकतं आणि त्यांना पुन्हा एकदा सुंदर, अर्थपूर्ण आयुष्य नक्कीच जगता येऊ शकतं. ‘मन घट्ट तुझं...’ हा मंत्र वडीलधाऱ्यांनी तरुणाईला द्यायला हवा!
-----------------------------------------------------------------------------------------
बोलतं करा; जीव वाचवा
आत्महत्येचा विचार करणारी व्यक्ती कशी ओळखावी?
कशी कराल मदत ?
मानसिक आधाराची गरज
भारतात पुरुषांच्या आत्महत्यांचं आणि युवकांच्या वैफल्यग्रस्ततेचं प्रमाण वाढत आहे. राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभागाच्या २०१४ च्या अहवालानुसार, तमिळनाडू हे राज्य आत्महत्यांबाबत पहिल्या क्रमांकावर होतं. त्याच विभागाच्या २०१५ च्या अहवालानुसार, महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आला आहे. युवकांमध्ये म्हणजे १५ ते ३५ वयोगटापर्यंत वैफल्यग्रस्ततेचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. यामध्ये प्रामुख्यानं विद्यार्थ्यांची संख्या लक्षणीय आहे. परीक्षा, प्रवेशप्रक्रिया, मानसिक नैराश्य, आर्थिक अडचण, प्रेमभंग, शाळा-महाविद्यालयांतलं रॅगिंग, घरगुती भांडणं यांमुळं वैफल्यग्रस्तता येते. ‘आत्महत्येचा प्रयत्न’ करणाऱ्यांमध्ये महिलांचं प्रमाण अधिक असून, प्रत्यक्षात ‘आत्महत्या करण्याचं’ प्रमाण पुरुषांमध्ये जास्त आहे. आम्हाला येणाऱ्या फोनमध्येही पुरुषांच्याच फोनचं प्रमाण अधिक आहे. वैफल्यग्रस्तेतून अनेक जण फोन करत असतात. त्यांचं म्हणणं ऐकून घेणं आवश्यक असतं. त्या काळात त्यांना कुणाच्या सल्ल्याची नव्हे, तर ‘आपलं म्हणणं कुणीतरी ऐकून घ्यावं’, अशी त्यांची अपेक्षा असते. घरातलं, कार्यालयीन ठिकाणचं वातावरण दिवसेंदिवस बदलत असल्यानं वैफल्यग्रस्ततेचं प्रमाण वाढत आहे. ताण-तणावांत वाढ होत आहे. आर्थिक कारणांमुळं, नातेसंबंधामुळं व्यक्ती वैफल्यग्रस्त होते आणि कालांतरानं आत्महत्येचा विचार तिच्या मनात येतो. यासाठी संबंधित व्यक्तीला मानसिक आधार देणं महत्त्वाचं असतं. मानसिकरीत्या हतबल झालेल्या व्यक्तीला योग्य पद्धतीनं हाताळावं लागतं. शासनानं यावर ठोस उपाययोजना केल्या पाहिजेत. ‘आत्महत्या प्रतिबंधक दिना’च्या निमित्तानं काही काळ यावर चर्चा होते आणि पुढं काहीच होत नाही. शाळा, महाविद्यालयीन पातळीवरच्या अनेक मुलांना खूप काही बोलायचं असतं; परंतु व्यक्त होण्यासंदर्भात त्यांच्या मनात भीती असते. अशा ठिकाणी समन्वयकाची नियुक्ती करणं आवश्यक आहे.- विक्रमसिंह पवार, समन्वयक, ‘कनेक्टिंग एनजीओ’, पुणे
केवळ ऐकून घेतलं गेल्यामुळं वाचले माझे प्राण...
‘‘मला मरायचं नव्हतं. जगायचं होतं. एकावर मी जिवापाड प्रेम केलं. आयुष्य एकत्र घालवण्याच्या आणा-भाका घेतल्या. मात्र, माझ्या प्रेमाचा त्यानं फायदा घेतला. काही वर्षं सोबत राहिल्यावर नातं आता नव्या वळणानं - म्हणजे अर्थातच विवाहाबद्ध होण्याच्या - जावं असं मला तीव्रतेनं वाटलं. आमचा साखरपुडा ठरला. आमच्या घरून लग्नाला विरोध असूनही केवळ माझ्यासाठी जोरदार तयारी सुरू झाली. मी सुखी संसाराची स्वप्नं पाहत होते. मात्र, साखरपुड्याच्या आठवडाभर आधी ‘तो’ गायब झाला. वारंवार फोन करूनही त्यानं कधी फोनच उचलला नाही. मी दिवसागणिक अस्वस्थ होत गेले. अखेर एके दिवशी त्यानं फोन उचलला आणि तो मला म्हणाला ः ‘‘आज माझा साखरपुडा आहे.’’ त्याचं ते बोलणं ऐकून काय करावं, मला काहीच सुचेना. घरात कुणाशी बोलावंसं वाटेना. आत्महत्येचा विचार प्रबळ झाला. हा विचार कृतीत उतरवायची तयारी मी केली.
शेवटची इच्छा म्हणून ‘कनेक्टिंग एनजीओ’च्या हेल्पलाईनला फोन केला. फोन केल्यावर पहिली दोन-चार मिनिटं मला अश्रू अनावर होत होते. काय बोलावं ते सुचतच नव्हतं. फोन घेणाऱ्या व्यक्तीनं माझी कैफियत ऐकली. मन शांत झालं. आपलं दु:ख ‘शेअर’ केल्यानं हलकं होतं, याचा प्रत्यय मला आला. फोन घेणाऱ्यानं माझी समजूत काढली. आयुष्यातला तो ‘चॅप्टर’ मी आता पूर्णपणे पुसून टाकला आहे. मी सुखात आहे.
- एकेकाळची वैफल्यग्रस्त युवती
आत्महत्येपासून परावृत्त होण्यासाठी काय कराल?
आत्महत्येचा विचार मनात आल्यावर शक्यतो आपलं म्हणणं जवळच्या व्यक्तीशी ‘शेअर’ करा. मन मोकळं करा. कुणी ऐकणारं नसेल तर ‘कनेक्टिंग इंडिया’शीही तुम्ही संपर्क साधू शकता.
- दूरध्वनी क्रमांक : १८००-२०९-४३५३ (टोल फ्री)
- ९९२२००११२२ (दुपारी १२ ते रात्री १०)
(संकलन ः आशिष तागडे)
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.