

Indian Cricket Pitch Analysis
esakal
फिन अॅलेन याने टी-२० विश्वकरंडकाच्या उपांत्य फेरीच्या लढतीत ३३ चेंडूंमध्ये नाबाद १०० धावांची खेळी साकारत न्यूझीलंडला दक्षिण आफ्रिकन संघावर दिमाखदार विजय मिळवून दिला. या देदीप्यमान विजयानंतर फिन अॅलेन याने यशाचे श्रेय खेळपट्टीवरील अनुभवाला दिले. तो म्हणाला, ‘‘विश्वकरंडकाआधी आमचा संघ भारतामध्ये टी-२० मालिका खेळला. या मालिकेत आम्हाला १-४ अशा फरकाने पराभव पत्करावा लागला; मात्र काळ्या मातीच्या खेळपट्ट्यांवर खेळण्याचा अनुभव आमच्यासाठी टी-२० विश्वकरंडकात धावून आला.’’
क्रिकेट या खेळामध्ये फलंदाजी, गोलंदाजी अन् क्षेत्ररक्षण या तीन महत्त्वाच्या बाबी सामन्यातील जय-पराजय फरक स्पष्ट करतात. हवामान, खेळपट्टी, दव, मैदानाचा आकार (काही वेळा एखादी बाजू लहान असल्यामुळे सीमारेषा जवळ असते) या गोष्टीही तेवढ्यात महत्त्वाच्या ठरतात, हेही वेगळे सांगायची गरज नाही. क्रिकेट या खेळ मैदानात लढला जात आहे. गेल्या काही काळामध्ये तो मैदानावरून संगणकापर्यंतही पोहोचला आहे. संगणकावर प्रतिस्पर्धी संघातील खेळाडूंचे कच्चे दुवे हेरले जाऊन योजना आखली जात आहे. तसेच हवामान, खेळपट्टीचा अंदाज बांधला जात आहे.