Independence Day : वाचा, पंडित नेहरुंचे स्वातंत्र्यानंतरचे पहिले भाषण

Independence Day : वाचा, पंडित नेहरुंचे स्वातंत्र्यानंतरचे पहिले भाषण

स्वातंत्र्यदिन : 15 ऑगस्ट 1947 या दिवशी जागतिक इतिहासाने एक नवे वळण घेतले. खंडप्राय असा भारत देश ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला. प्रदीर्घ संघर्षानंतर भारताला स्वातंत्र्य मिळाले.

14 ऑगस्टच्या मध्यरात्री संसदेच्या मध्यवर्ती सभागृहात शपथ घेण्यासाठी लोकप्रतनिधी जमले. या वेळी पंडित जवाहरलाल नेहरू यांनी केलेले "ट्रिस्ट विथ डेस्टिनी' (नियतीशी करार) हे भाषण म्हणजे केवळ काव्यच नव्हे, तर अव्वल दर्जाचे साहित्यही होते. त्याच रात्री पंडित नेहरू यांच्यानंतर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचे भाषण झाले.

खुद्द नेहरू यांनी त्यांना भाषण करण्याची विनंती केली होती. या भाषणात त्यांनी उपस्थित केलेले मुद्दे आजही सुसंगत ठरतील असे आहेत. नेहरू यांच्या संपूर्ण भाषणाचा, तर राधाकृष्णन यांच्या भाषणाचा संक्षिप्त भावानुवाद येथे देत आहोत. 

पंडित जवाहरलाल नेहरु :

कित्येक वर्षांपूर्वी आपण नियतीशी करार केला होता आणि आता वेळ आली आहे, जेव्हा आपली ही प्रतज्ञा- पूर्णपणे नसली, तरी काही अंशी- साकारणार आहोत. मध्यरात्रीच्या या प्रशांत समयी सारे जग झोपलेले असताना, भारत स्वातंत्र्याच्या युगात नवा जन्म घेत आहे. इतिहासात असा क्षण क्वचितच येतो, की जेव्हा आपण जुन्यातून नव्यात प्रवेश करतो, एक मोठे युग संपते आणि दीर्घ काळ दबल्या गेलेल्या देशाच्या आत्म्याला वाचा फुटते. अशा या गंभीर क्षणी आपण भारताच्या, भारतवासीयांच्या आणि त्याहूनही मोठ्या अशा मानवतेच्या कार्याला वाहून घेण्याची प्रतज्ञा करीत आहोत, हे यथार्थ आहे. 

इतिहासाच्या प्रारंभापासूनच भारताने न संपणाऱ्या अशा शोधाला सुरवात केली आणि कोणताही ठसा न उमटविणारी नंतरची शतके प्रयत्नांच्या आणि यशापयशाच्या भव्यतेने भारली गेली. चांगल्या आणि वाईट काळातदेखील भारताला आपल्या या शोधाचा; तसेच स्वतःला शक्ती देणाऱ्या मूल्यांचा कधीच विसर पडला नाही. एका दुर्दैवी कालखंडातील आपला प्रवास आज संपत आहे आणि भारताला पुन्हा एकदा स्वतःचाच शोध लागला आहे. एक मोठे यश आज आपण साजरे करीत आहोत. हे यश म्हणजे एक संधी आहे, जी आपल्या प्रतीक्षेत असणाऱ्या अनेक मोठ्या विजयांची आणि यशाची पायरी आहे. ही संधी घेण्याइतपत आणि भविष्याची आव्हाने पेलण्याइतपत आपण धैर्यशील आणि विचारशील आहोत काय? 

स्वातंत्र्य आणि सत्ता यांच्या जोडीने जबाबदारीदेखील येते. ही जबाबदारी आहे, ती स्वायत्त अशा भारतीयांचे प्रतनिधित्व करणाऱ्या या स्वायत्त सभागृहावर, म्हणजेच या घटना परिषदेवर. स्वातंत्र्याचा जन्म होण्याआधी आम्ही प्रसूतीच्या सर्व वेदना सहन केल्या आहेत आणि त्याच्या दुःखद आठवणींनी आमची मने जड झाली आहेत. यातील काही वेदना आपण आजही सहन करीत आहोत. परंतु आता हा इतिहास झाला आहे आणि भविष्यकाळ आपल्याला खुणावतो आहे. 

हा भावी काळ सोपा नाही किंवा आरामदायीही नाही. आतापर्यंत आपण घेतलेल्या अनेक प्रतज्ञांची आणि आज घेत असणाऱ्या प्रतज्ञेची पूर्तता करण्यासाठी अविरत झटण्याचा हा काळ आहे. भारताची सेवा म्हणजे भारतातील कोट्यवधी पीडितांची सेवा. म्हणजेच दारिद्य्र, अज्ञान, रोगराई, संधींची असमानता यांचे उच्चाटन. प्रत्येक नेत्रातील प्रत्येक अश्रू पुसला जावा, ही आपल्या पिढीतील सर्वांत थोर व्यक्तीची महत्त्वाकांक्षा आहे. हे काम कदाचित आपल्या क्षमतेच्या पलीकडील असेल; परंतु जोपर्यंत दुःख आणि अश्रू असतील, तोपर्यंत आपले काम संपणार नाही. 

आपली स्वप्ने प्रत्यक्षात उतरवण्यासाठी आपल्याला भरपूर कष्ट करावे लागतील; कठोर परिश्रम घ्यावे लागतील. 
ही स्वप्ने जशी भारतासाठी आहेत, तशी साऱ्या जगासाठीही आहेत. कारण सर्व देश आणि सारे लोक एकमेकांशी इतके जोडले गेलेले आहेत, की कोणा एकालाही इतरांपासून अलग राहता येईल, अशी कल्पनासुद्धा करता येणार नाही. शांती, स्वातंत्र्य, समृद्धी आणि संकटे हे सारे आजच्या अविच्छिन्न एकमय जगात अविभाज्य आहेत. 

आपण ज्यांचे प्रतनिधी आहोत, त्या भारतीय लोकांना या साहसात श्रद्धेने आणि विश्‍वासाने आमच्याबरोबर सहभागी होण्याचे आवाहन आम्ही करीत आहोत. ही वेळ क्षुद्र आणि विघातक टीकेची नाही; तसेच विद्वेषाची आणि आरोप-प्रत्यारोपांचीही नाही. स्वतंत्र भारताचा उत्तुंग असा महाल आम्हाला निर्माण करायचा आहे, ज्यात भारतमातेची सारी लेकरे सुखाने नांदू शकतील.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com