Indian Cricket Team Coach Strategy
esakal
Indian Cricket Team Coach Strategy : गंभीरनीतीने भारतीय संघाचा विजय: प्रशिक्षकांच्या भूमिकेवर चर्चा
शैलेश नागवेकर
टी-२० विश्वचषक जिंकल्यानंतर भारतीय संघाचे सर्वत्र कौतुक सुरू आहे. या विश्वचषक जिंकण्यापूर्वी याच संघातील काहींना अपयशाला सामोरे जावे लागले. त्यावरून प्रशिक्षक, संघ निवडकर्त्यांना टीकेचाही सामना करावा लागला. या सर्वांत गौतम गंभीर तर सगळ्यांच्याच निशाण्यावर असायचा. त्यात गंभीर यांनी माझी बांधिलकी सोशल मीडियाशी नाही, तर ड्रेसिंग रूममध्ये असलेल्या ३० सदस्यांशी आहे, असे सुनावले आहे. यालाच विश्वचषक जिंकण्यासाठीची ‘गंभीर’नीती म्हणायला हवे.
विश्वकरंडक जिंकल्यानंतर जवळपास मैदानावर तास-दीड तास जल्लोष सुरू होता. त्यानंतर नरेंद्र मोदी स्टेडियमच्या भल्यामोठ्या पत्रकार कक्षात सूर्यकुमार आणि गौतम गंभीर पत्रकार परिषदेसाठी आले. सूर्यकुमार हे एक विनोदी आणि बिनधास्त असलेले व्यक्तिमत्त्व. हा विश्वकरंडक त्याने खांद्यावर नाचवत आणला आणि पुढील टेबलवर ठेवला. त्याच्या बाजूला गौतम गंभीर एवढे मोठे भव्यदिव्य यश मिळवूनही धीरगंभीर चेहरा करून बसले होते. असतो एखाद्याचा स्वभाव; पण विश्वकरंडक जिंकण्याची मोहीम फत्ते झाल्यानंतर तरी हास्याची लकीर यावी, ही अपेक्षा होती; पण गौतम यांनी त्याला विचारण्यात आलेल्या प्रश्नांना तेवढ्याच गंभीरतेने उत्तरे दिली. स्पर्धा सुरू होण्यापासून ते विश्वकरंडक उंचावेपर्यंत गंभीरच्या मनात जे काही साचले होते, त्या सर्वाला त्याने वाट मोकळी करून दिली होती. गंभीर हे असे व्यक्तिमत्त्व आहे, की समोर सामना सुरू असताना त्याचा चेहरा निर्विकार असतो; पण सामन्याला आपल्या बाजूने कलाटणी देणारी घटना घडली तरच त्यांच्यातील भावना उफाळून येते. अशा प्रकारे व्यक्त होणाऱ्या व्यक्तींच्या मनात भले मोठे काहूर सुरू असते. फक्त ते क्षणाक्षणाला व्यक्त होत नसतात; पण कधीतरी भावनांची घागर रिती होतेच. त्या वेळेस या व्यक्तिमत्त्वाचा खरा चेहरा पुढे येतो.

