पुणे जिल्हातील इंदापूर तालुक्यातील बोरी गावामधल्या शेतकऱ्यांनी पद्मश्री डॉ. अप्पासाहेब पवार यांच्या मार्गदर्शनाखाली ठिबक सिंचनाचे धोरण स्वीकारून शेतीमध्ये बदल करण्यास सुरुवात केली. शेतकऱ्यांनी ठिबक सिंचनाच्या जोरावर माळरानावर अक्षरशः दगडधोंड्यामध्ये द्राक्षाचे मळे फुलवले.
गावामध्ये एके काळी अवघ्या ५० एकर क्षेत्रामध्ये असलेल्या द्राक्षबागा तीन हजार एकरावर झाल्या आहेत. ठिबक सिंचन, शेततळे व आधुनिक तंत्रज्ञानामुळे कुसळे उगविणाऱ्या जमिनीमध्ये द्राक्षबागा बहरल्या आहेत. द्राक्षामुळे शेतकऱ्यांचे आयुष्य बदलले असून बोरीची द्राक्षे जगामध्ये प्रसिद्ध झाली.