

Gupta Dynasty Art and Culture
esakal
शेफाली वैद्य - saptrang@esakal.com
मौर्य, शुंग आणि कुषाण साम्राज्यानंतर काळाने उलटलेले भारतीय इतिहासाचे एक सोनेरी पान म्हणजे गुप्त साम्राज्याचा काळ. या साम्राज्याची सुरुवात श्रीगुप्त आणि घटोत्कच या आद्य गुप्त राजांपासून साधारण कॉमन ईराच्या तिसऱ्या शतकात झाली. त्यानंतर समुद्रगुप्त आणि चंद्रगुप्त द्वितीय यांच्या कारकिर्दीत गुप्त साम्राज्य आपल्या सर्वोच्च वैभवाला पोहोचले. पुढे कुमारगुप्त पहिला आणि स्कंदगुप्त यांच्या काळात वायव्येकडून झालेल्या हूण आक्रमणांमुळे गुप्त साम्राज्याची हळूहळू घसरण सुरू झाली आणि अखेरीस साधारण सहाव्या शतकात गुप्त साम्राज्य लयाला पावले. पण जी तीनशे-साडेतीनशे वर्षे गुप्त साम्राज्य टिकले तो काळ म्हणजे भारताचा सुवर्णकाळ होता. ह्याच काळात कालिदासाने आपली काव्ये रचली, नालंदा विद्यापीठाच्या आवारात देशविदेशातल्या विद्वानांनी येऊन शास्त्रार्थ केले. मध्य भारतात मुबलक आढळणाऱ्या लाल वालुकाश्मात व उत्तर भारतात सापडणाऱ्या अभ्रकयुक्त चमकदार राखाडी पाषाणात शिल्पकारांनी सुरेख मंदिरे उभारली, शिल्पाकृती निर्माण केल्या आणि त्या काळच्या प्रचलित वस्त्रसंस्कृतीचा आज अस्तित्वात असलेला सर्वांत विश्वासार्ह दस्तऐवज निर्माण केला.
दगड कधी खोटं बोलत नाहीत. कवी किंवा लेखक वस्त्रांचे वर्णन भरमसाट विशेषणे वापरून करू शकतात, तसे शिल्पांचे नाही. दगड तेच नोंदवतो जे शिल्पकारांनी पाहिले होते, अभ्यासले होते. कापडाच्या दुमडलेल्या घड्यांच्या रेषा, निऱ्यांच्या लयबद्ध चुण्या, कमरेवर कसून आवळलेल्या कटिवस्त्राची गोलाकार रेघ, घोट्याजवळ रुळणाऱ्या धोतराच्या निऱ्या, वस्त्राची तलम, अर्धपारदर्शकता, त्यावर दिसणाऱ्या आकृत्या, हे सारे शिल्पकारांनी त्यांच्या आसपास प्रत्यक्ष पाहिलेले असते आणि तेच त्यांनी छिन्नी हातोड्याद्वारे दगडात अजरामर केलेले असते. म्हणूनच जगभरातले वस्त्रपरंपरेचे अभ्यासक नेहमीच साहित्याइतकाच शिल्पांचाही अभ्यास करतात. साहित्य व शिल्प यांचा हा संगम गुप्तकाळात इतका समृद्ध, इतका बोलका आहे, की त्याची तुलना दुसऱ्या कोणत्याही भारतीय कालखंडाशी होणार नाही.