इतिहास आणि भक्ती...

पवना नदीच्याकाठी चिंचवड नावाचं गाव वसलं आणि समृद्ध झालं. एके काळी चिंच आणि वड या वृक्षांच्या विपुल हिरवाईनं चिंचवड हे नाव गावाला दिलं असणार.
historical places and devotee chinchwad village pavana river morya gosavi
historical places and devotee chinchwad village pavana river morya gosaviSakal
Updated on

- अंजली कलमदानी

पवना नदीच्याकाठी चिंचवड नावाचं गाव वसलं आणि समृद्ध झालं. एके काळी चिंच आणि वड या वृक्षांच्या विपुल हिरवाईनं चिंचवड हे नाव गावाला दिलं असणार. चिंच आणि वडाच्या शांत वनराईत महासाधू मोरया गोसावी यांनी वास्तव्य केलं, समाधी घेतली आणि चिंचवडची भूमी पुण्यमय झाली.

मोरया गोसावी यांचे आई-वडील मूळचे कर्नाटकातल्या बिदर जिल्ह्यामधल्या शाली गावचे रहिवासी. श्री मयूरेश्वराच्या कृपेनं मोरयाचा जन्म झाला. अर्थातच मोरया हे सुद्धा मयूरेश्वराचे भक्त होते. वेदाध्ययन संपल्यावर योगिराज नयनभारती सारखे विद्वान गुरू लाभले.

त्यांच्या मार्गदर्शनानं मोरयानं मुळा-मुठेच्या काठी थेऊर इथं चिंतामणीची मनोभावे तपश्चर्या केली. ४२ दिवसांच्या तपश्चर्येला फळ आलं. मोरया गोसावी झाले. अष्टसिद्धी त्यांना वश झाल्या. मोरया गोसावी मोरगावी मयूरेश्वराच्या सेवेत रमले. त्यांच्या अष्टसिद्धी अडचणीत आलेल्यांच्या संकटाचं निवारण करू लागल्या. शांततेचा शोध घेत चिंचवडजवळच्या जंगलात ते पोचले.

दर चतुर्थीला मोरगावची वारी चुकली नाही. मोरगावच्या वाऱ्यांमध्ये मयूरेश्वरानंच मोरया गोसावींना ग्वाही दिली की, ‘मीच आता तुझ्याकडे येतो.’ कऱ्हा नदीकाठच्या गणेशकुंडात चतुर्थीच्या दिवशी मोरया गोसावींनी पाण्यात नेहमीप्रमाणं डुबकी मारली आणि हाती तांदळा आला. साक्षात मोरया हाती आला. याची स्थापना त्यांनी चिंचवडला मंदिरात केली. हेच आजचं मंगलमूर्ती-वाड्याचं स्थान आहे. हा काळ आहे, तेराव्या व चौदाव्या शतकातला.

त्यांचा कालखंड १३३० ते १५५६ असा मानला जातो. मोरया गोसावींचे गुरू नयनभारती गोसावी यांनी समाधी घेतल्यानंतर मोरया गोसावी यांनीही संजीवन समाधी घेण्याचं ठरवलं. अत्यंत समाधानी अवस्थेत त्यांनी जिवंत समाधी घेण्याचा निर्णय पुत्र चिंतामणी महाराज यांना सांगितला.

मार्गशीर्ष वद्य षष्ठी शके १४८३ इसवी सन १५६१ला पवनेच्या काठी श्री साधू मोरया गोसावी यांनी पवित्र ठिकाणी समाधी लावली. आत्मानंदात एकरूप होऊन आत्मरूपात समाधिस्थ झाले. श्री मोरया गोसावींच्या पवित्र समाधी स्थानावर श्री गणेशाची मूर्ती सिद्धी-बुद्धीसहित विराजमान आहे.

आजचं दिसणारं मंदिर हे १८५८ मध्ये चिंतामणी महाराजांचे पुत्र नारायण महाराजांनी बांधलं, असा उल्लेख असून, हे अत्यंत जागृत असं पवित्र देवस्थान आहे. चिंतामणी महाराजांची वारकऱ्यांना व संत तुकाराम महाराजांना (१५७७-१६८०) देवत्वाची प्रचिती आल्यावर त्यांचा उल्लेख देवा-देव असा होऊ लागला व घराण्याला देव असं नामाभिधान मिळालं.

श्री मोरया गोसावी यांचा जीवनप्रवाह, त्यांच्या आयुष्यातील घटना याबद्दल माहिती उपलब्ध आहे; पण सगळ्यांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे, त्यांच्या पुण्यमय अशा संजीवन समाधीची वास्तू आणि परिसर हा काळ्या पाषाणातील समृद्ध वारसा आजही पवनेकाठी दिमाखात उभा आहे.

चिंचवड देवस्थान ट्रस्ट अंतर्गत मोरगाव, थेऊर, सिद्धटेक तसेच मोरया गोसावी समाधी मंदिर व वाड्याचा गणपती अशा स्थानांचा गाणपत्य संप्रदायातील महत्त्वाचा भक्तीचा वारसा तसेच वास्तू-वारसा सांभाळणं व या देवस्थानांचं व्यवस्थापन सुसूत्र ठेवणं अशी फार मोठी जबाबदारी आहे.

वास्तू-वारशाबरोबरच परंपरागत साहित्य, पत्रव्यवहार हाही महत्त्वाचा ऐवज देवस्थाननं सांभाळला आहे. श्री मोरया गोसावी समाधी मंदिराची बांधणी कार्तिक शुद्ध चतुर्थी शके १५८० रोजी सुरू होऊन आषाढ शुद्ध चतुर्थी शके १५८१ मध्ये पूर्ण झाली (२७ ऑक्टोबर १६५८-१३ जून १६५९) १२ हजार ७८५ चौरस फूट क्षेत्रफळ असलेला समाधी मंदिर परिसर हलक्या उतारानं नदीकाठी उतरत जातो.

दरवर्षी पावसाळ्यात पवना नदी काही काळ दुथडी भरून वाहते आणि मंदिर परिसर व त्यालगतचा देऊळमळा या जागा पाण्याखाली जातात. गर्भगृह पाण्याखाली गेलं, की देव मंदिर परिसराच्या वरच्या पातळीवरच्या शेजगृहात येतात.

नदीकाठी वसलेल्या मंदिर समूहांच्या बांधणीची रचना ते पाण्याखाली जाणार, हे गृहीत धरूनच पुरापासून सुरक्षित पद्धतीनं केली आहे. बांधकाम शैलीत सामग्री, बांधणीचे इतर घटक व सामग्रीचं आकारमान यांचा सांगोपांग विचार करूनच नदीकडेच्या मंदिराच्या उभारणीचं शास्त्र परंपरागत विकसित झालं. पूर्वाभिमुख समाधी मंदिर परिसरात काळ्या घडीव दगडाची फरसबंदी असून, देव वंशातील सप्तपुरुषांच्या समाधीव्यतिरिक्त इतर दहा लहान-मोठी समाधी मंदिरं आहेत.

श्री मोरया गोसावी यांच्या ३०० चौरस फूट गर्भगृहाला ४०० चौरस फूट सभामंडप असून, दगडांचा आकारही मोठा आहे. पाण्याखाली जाणाऱ्या वास्तूसाठी जाड भिंती, कमीत कमी दरज या हिशोबानं चिरे १८ इंच उंच, १६ इंच ते अडीच फूट लांब आकाराचे आहेत.

भिंतींची जाडी चार फूट असल्यामुळे पाण्याच्या प्रवाहाला टक्कर देत चार शतकं इंचभरही न हलता मंदिर उभं आहे. गर्भगृहाचा अंतर्भाग अष्टकोनी असून, त्यापुढील सभामंडप चौकोनी आहे. गर्भगृहाचं छत ‘कोर्बेलिंग’ पद्धतीचं म्हणजे, एकावर एक दगड ठेवण्याच्या पद्धतीनं खालच्या दगडपेक्षा वरचा दगड बाहेर पुढे डोकावतो, त्याच्यावरचा त्याच्याबाहेर या पद्धतीनं वजनांच्या तोलात्मकतेतून बांधण्यात आलं आहे.

यादवकालीन पद्धतीच्या बांधकामाचा पगडा बांधकाम शैलीवर असल्यामुळे घुमटाकार बांधणी अस्तित्वात नाही; पण, सांधे जिथं जोडले जातात त्या ठिकाणच्या ‘स्क्विंचेस’वर बहामनी शैलीचा प्रभाव दिसून येतो. मंडपात उत्तरेला काळ्या दगडातील भव्य शिवलिंग आहे. या ठिकाणच्या पायऱ्यांवरून उतरून श्री मोरया गोसावी समाधीच्या स्थानाकडे गेले, असं सांगितलं जातं. मुख्य मंदिराच्या पूर्वेला मोरया गोसावी यांचे पुत्र चिंतामणी महाराज यांची समाधी आहे.

चिंतामणी महाराजांच्या समाधिमंडपात उभं राहून पश्चिमेला एका छोट्या खिडकीतून पाहिलं असता थेट मोरया गोसावी समाधी मंदिरातल्या गणपतीचं दर्शन घडतं. तसंच, खाली पाहताच पाच फूट खाली असलेल्या दहा फूट लांब व दहा फूट रुंद खोलीत चिंतामणी महाराज यांची उत्तर-दक्षिण झोपलेल्या अवस्थेतील मूर्तीची समाधी दिसून येते.

इथली समाधिस्थानं जमिनीखाली असल्यामुळे त्यावरील मंदिरं आणि समाध्या यांच्या वास्तुनिर्मितीत उंचीचा उंच-सखलपणा आहे. उंच-सखलपणा सांभाळताना वास्तूंच्या बाह्यरूपात फरक दिसत नाही; पण मंडपात प्रवेश केल्यावर उंचीचा फरक जाणवतो. थंडगार दगडी वास्तूच्या आत प्रवेश केल्यावर मानसिकतेवर नकळत परिणाम घडण्याची प्रक्रिया घडते.

देवस्थानच्या पायऱ्या उतरताना लगतच्या भागांत जुनी मठाची इमारत होती. ही जीर्ण इमारत उतरवून ती जागा आता भक्तांना विसावण्याकरता ठेवण्यात आली आहेत. मंदिर परिसराशी संलग्न ओवऱ्यांची निर्मिती करण्यात आली आहे. इथं दगडी कमान केल्यानं मंदिराच्या वास्तूंशी हा भाग मिळताजुळता दिसून येतो.

श्री मोरया गोसावी यांच्या कालखंडापासून अनेक शतकं इथल्या धार्मिक व सामाजिक कार्याचं महत्त्व होतं. शहाजीराजांच्या काळापासून मोरया गोसावी व पुढच्या पिढ्यांना आलेली पत्रं व सनदा हा ऐतिहासिक दस्तऐवज देवस्थाननं जपला आहे.

मोरया गोसावी हे शिवपूर्वकाळात होऊन गेले; पण, त्यानंतर शिवाजी महाराजांनी त्यांच्या कालखंडात लिहिलेली ४२ पत्रं उपलब्ध आहेत. शिवाजी महाराजांच्या २६० उपलब्ध पत्रांपैकी ४२ पत्रं ही मोरया गोसावी परिवारातील सत्पुरुषांना लिहिलेली आहेत.

शहाजीराजांनी इसवी सन १६२८ ते १६५१ या काळात दिलेली १५ इनाम पत्रं असून, १६१० ते १८५२ या अडीचशे वर्षांच्या काळातल्या ३४० महत्त्वाच्या पत्रांचं अभ्यासपूर्वक संकलन डॉ. अनुराधा कुलकर्णी व अजित पटवर्धन या अभ्यासकांनी केली आणि चिंचवड देवस्थान ट्रस्टनं ‘श्री महासाधू श्री मोरया गोसावी यांना मिळालेल्या सनदा व पत्रं’ प्रकाशित केली आहेत.

श्री महासाधू मोरया गोसावी मंदिर परिसराच्या जागेवरील अस्तित्वातील वास्तूंची तपशीलवार रेखाचित्रं ‘किमया’ या वास्तुविशारदांच्या उत्साही गटानं कोरोनानंतरच्या बंद काळात पूर्ण केली. नवीन इमारतीची निर्मिती करताना जेव्हा रेखांकनं केली जातात, तेव्हा कल्पकतेला भरपूर वाव असतो. परंतु, शतकांच्या अंतरानं निर्मिती झालेल्या वास्तूंची मोजणी रेखांकनं करताना त्यांची वास्तुशैली, बांधकाम शैली आणि बांधण्याचं प्रयोजन हे समजून घेणंही आनंददायी असतं.

नवीन तंत्रज्ञान विकसित होत असताना पारंपरिक बांधकाम शैलीचे फायदे समजून घेतले, तर त्यांच्या टिकाऊपणाचं मर्म उमजतं आणि कालप्रवाहात कालबाह्य होण्याच्या ऐवजी त्यांना नवीन तंत्रज्ञानात कसं सामावून घेता येईल, याचा विचारप्रवाह सुरू होतो.

मोरया गोसावी मंदिर परिसराचं रूपांतर नदीच्या पात्रालगत घाटांत होतं. काळ्या पाषाणाच्या चुन्यात बांधलेल्या पायऱ्या नदीपात्रात उतरतात, तेव्हा घाट हा वास्तुशिल्पाचा भाग, पाणी व जमीन यांना सांधणारा नुसता दुवा न राहता,

ते पूर संरक्षणाचं महत्त्वाचं व जमिनीची धूप थांबविण्याचं कार्य, ही महत्त्वाची भूमिका बजावतात. एखाद्या भौगोलिक जागेचं ऐतिहासिक, धार्मिक व आध्यात्मिक महत्त्व जाणून घेताना तिथल्या वास्तुशिल्पांच्या अंतरंगात डोकावण्याची संधी मिळते.

जिज्ञासा जागृत असेल, तर वास्तुशिल्पंही तुमच्याबरोबर आपल्या संरचनेच्या अध्यात्माचा संवाद साधू शकतात, हा अनुभव विलक्षण समाधानी असतो. झुळझुळणारी पवना तर गेली पाच शतकं या पवित्र स्थानाचं माहात्म्य शांतपणे अनुभवते आहे; म्हणूनच, दरवर्षी इथल्या वास्तुशिल्पांच्या अंतरंगात प्रवेश करण्याचा मोह तिलाही आवरत नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com