

Indian Squash World Cup Victory
esakal
यंदाच्या वर्षातील अखेरच्या महिन्यात भारतीय क्रीडाक्षेत्रात संस्मरणीय घटना घडली. भारतीयांनी स्क्वॉश या खेळामध्ये ऐतिहासिक कामगिरी केली. जोश्ना चिनाप्पा, अनाहत सिंग, अभय सिंग व वेलावन सेंथीलकुमार यांचा समावेश असलेल्या भारतीय संघाने हाँगकाँगला नमवून विश्वकरंडकात जेतेपदावर मोहर उमटवली. भारताचे हे विश्वकरंडकातील हे पहिलेच अजिंक्यपद. २०२८मधील लॉस एंजेलिस ऑलिंपिकमध्ये स्क्वॉश या खेळाचा समावेश करण्यात आला आहे. याच पार्श्वभूमीवर भारतातही या खेळाच्या प्रसार व प्रचाराचा वेग वाढवायला हवा.
भारतामध्ये क्रिकेट या खेळाला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त आहे. क्रिकेट या खेळाव्यतिरिक्त बॅडमिंटन, कुस्ती, नेमबाजी, तिरंदाजी, टेनिस, टेबल टेनिस, बुद्धिबळ या खेळांमध्येही भारतीय खेळाडू कात टाकताना दिसत आहे. अॅथलेटिक्स, कबड्डी, खो-खो या खेळांमध्येही भारत अग्रेसर होत आहे. आता स्क्वॉश या खेळामध्येही भारत पुढे जाण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. ऑलिंपिकमध्ये या खेळाचा समावेश करण्यात आला आहे. ही भारतीयांसाठी आनंदाची बाब.